सध्या टीव्ही वर बातम्या पहिल्या कि भेसळीची बातमी हटकून असतेच. प्रत्येक पदार्थात भेसळ करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवस सुरु होतो तोच भेसळीच्या चहाने, दुधाने… नायाहारीला सांजा, उपमा करण्याचे ठरवले तर रव्याच्या शुद्धतेची खात्री नाही. जेवणास भाजी हा तर अपरिहार्य घटक आहे. हीच भाजी रंगाच्या इंजेक्शन ने छान टवटवीत केलेली आहे का?? हाच संशय मनात येत राहतो. फळांची वाढ, त्यांचे पिकवणे हे रसायनाच्या मदतीने तर झाले नसेल न? किती किती म्हणून अस्वथता झेलायची? कुटुंबाचे, आपले स्वतःचे आरोग्य असेच उधळून टाकायचे? अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवले. स्वयंपाक घरात जाण्याचे मनच होईना.
प्रत्येक वेळी भेसळ पकडली जाते. गुनेह्गाराना अटक होते. आपण हळहळत बसतो कि कशातच आता शुद्धता राहिली नाही. असेच फक्त विचार करतो, ह्यावर चर्चा होते, परिसंवाद होतात. पुन्हा पहिले पाढे पन्नास ह्या उक्ती प्रमाणे पुन्हा भेसळीची बातमी येत राहते. ज्या गोष्टी आहार म्हणून घेतो त्यात अशी भेसळ म्हणजे आयुष्य कमी करून घेणे होय. ज्या गोष्टी आपल्या कडून हाताळल्या जातात त्यात पण भेसळ असली तर स्पर्शाने पण आपल्याला कातडीचे आजार उद्भवतात. दिवाळीचे रंग. होळीचे रंग. कुंकू, बुक्का इत्यादी घटक आपल्या सणाचे व संस्कृतीत असतातच. ह्या सर्व गोष्टी तर हानिकारक ठरतातच.
आपण काही करू शकत नाही का? हा अत्यंत प्रारंभीचा विचार आला. आपले स्वतःचे ह्या मध्ये काही योगदान होऊ शकत नाही का? नुसती चर्चा करून उपयोगाचे नाही. प्रत्येक गोष्टीची भेसळ आपण नाही थांबवू शकत. भेसळीला अटकाव करणे हे तर पोलिसांचे काम आहे. मी घरातून काय म्हणून यात सहभाग घेऊ शकेन. ह्या प्राथमिक विचारांनी हैराण झाले. माझी, माझ्या कुटुंबाची. समाजाची आरोग्य व आहार सुरक्षा अशी वेशीवर टांगलेली सहन करण्या पेक्षा काही विचार मला सुचले. इथे हि मस्कत मध्ये मॉल मधून हायब्रीड असलेल्या भाज्या मिळतात. त्यांना विशेष अशी रुची म्हणजे चव नसते. चकचकित भाज्या, फळे अत्यंत आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या असतात. ह्या फळ भाज्यांची शुद्धता म्हणजे त्यांची वाढ हि रसायनाच्या मदतीशिवाय झाली आहे हे ओळखण्याचे मापदंड कोणते आहेत?
नेट वर शोधाशोध केली, काही जणाकडे चौकशी केली तर घरच्या घरी पण आपण भेसळ शोधू शकतो. हे उपाय आहेत तरी मुळ प्रश्न कायम राहिला कि शोध घेण्याची रसायने सहज उपलब्ध आहेत का? ह्या उपायाच्या मदतीने भेसळ ओळखणे प्रत्येक वेळी लक्षात राहिल का? माझ्या घरच्या वयस्कर मंडळीना हे जमेल का? असे अनेक उप प्रश्न पण निर्माण झाले. कठीणच वाटले. ह्या चा स्वंतंत्र अभ्यास करावा लागेल का? आधीच रोज काय नाविन्य पूर्ण बनवायचे हा महिला वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहेच, त्यात आत्ता भर पडली भेसळीची परीक्षा करत स्वयंपाक बनवायचा.
जाऊ दे काय होईल ते होईल, कशाला डोक्याला ताप करून घ्या. चांगल्या कंपनीचे उत्पादन घेऊया आणि मनस्ताप कमी करूया. सध्याच्या काळात आयुष्याची काय भ्रांत आज आहोत तर पुढच्या क्षणाला नसू. इथ पर्यंत विचाराची मजल जाऊ लागली. शेती उत्पादना करता मोजमापे, कायदे आहेत का? शेती अधिकाऱ्यांकडून तपासून पहिली जाते का? ह्या बाबत घरात बसून शोध घेणे अवघड आहे. शेती खात्यात पण भ्रष्टाचार बोकाळला असेलच. शेतीत आपल्या उत्पादनाकरता रासायनिक खतांचा वापर केला जातोच पण फळांवर, भाज्यावर इंजेक्शने दिली जात आहेत का ह्याचा पाठपुरावा करणे म्हणजे समुद्रातून सुईचा शोध घेण्यासारखे होईल.
भेसळ हि शेतातून आणि विक्रीच्या माध्यमाद्वारे होत असते. आयुर्वेदिक औषधे पण ह्या भेसळीच्या तडाख्यात सापडली आहेत. बाहेरचे शत्रू बरे पण हे भेसळ करणारे अस्तनीतले निखारे रोजच्या जीवनात पण मृत्यू सापळ्यात प्रत्येकाला नेत आहेत. कुठून आणि कसा बंदोबस्त ह्या भेसळीच्या किडीचा करायचा हा पुरून उरणारा गहन प्रश्न बनला आहे. प्रत्येक बाबत जागरूक राहणे हे धकाधकीच्या जीवनात सहज सोप्पे नाही. जागरूक राहून व्यवहार जरी केला तरी पोटाकरता निवांत खाणे हे हि महत्वाचे आहे. इथेही भेसळ आहेच मग अस्वस्थता आलीच.
१) शाळेत भेसळ ओळखण्याचा तास ठेवला तर?
२) ज्या प्रमाणे गलोगल्ली वैद्यकीय तपासण्या करणाऱ्या प्रयोगशाळा आहेत त्याच प्रमाणे भेसळीच्या पण प्रयोगशाळा असाव्यात. आपल्याला जर शंका आली तर त्वरित तो पदार्थ तपासणी साठी नेता आला पाहिजे.
३) दुकानदार करता कडक कायदे केले पाहिजेत. काही काळा करता त्यांचा विक्री परवाना रद्द केला पाहिजे. दुकानाला इथे भेसळ सापडली आहे असे सील लावले गेले पाहिजे.
४) घरगुती स्वरुपात जर पदार्थाच्या तपासण्या करता येत असल्या तर त्याला लागणारी रसायने जवळच्या औषधाच्या दुकानात उपलब्ध असली पाहिजेत.
५) जनजागृती करावयास हवी.
६) स्थानिक पक्षाकडून नागरिकांसाठी अशी केंद्रे उघडली पाहिजेत.
७) भेसळ ओळखण्याची व्यवसायभिमुख प्रशिक्षण केंद्रे सरकार कडून सुरु व्हावीत.
८) भेसळीच्या तक्रारीसाठी ग्राहक निवारण मंच ची विशेष त्वरित न्याय प्रणाली असावी.
९) भेसळी मुळे नुकसान झाले तर त्याची जलद भरपाई मिळावी.
१०) धाडी मोहिमा करून, प्रत्येक वेळी तक्रार असली तरच कारवाई होईल इथपर्यंत प्रकरणे विलंबित ठेवू नयेत.
असे अनेक पर्याय आहेत पण सुरवात कोण करणार?’ शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात’, हि वृतीच फक्त वैचारिक खल, निष्कर्ष पर्यंतच मजल करते. पण आशावाद अजूनही संपला नाही मी माझ्या कडून छोटीशी सुरवात केली आहे. इथल्या शेती चे भारतीय मान्यवर अधिकारी ह्यांच्याशी विचारविनिमय सुरु केला आहे. ह्या बद्धल जनजागृती आणि माहितीच्या अधिकार करता लवकरच सर्वांशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. इथे पण खूप शेती आहे त्याबद्धल पण माहिती मिळवता येईल. सेंद्रिय शेती हा एक पर्याय आहे पण त्याची उत्पादने इतर उत्पादनाच्या तुलनेत महाग मिळतात.
इथले एकच उदाहरण देते कि, जे मी नेहमी पाहते मग घेते. रोज लागणारी अंडी. आपण दुकानात जातो आणि घेतो. इथे मिळणाऱ्या प्रत्येक अंड्यावर उत्पादन कधी घेतले आहे त्याची तारीख आणि कुठल्या तारखेपर्यंत ते वापरावे ह्याचा छाप असतो. तसेच क्रेट मधल्या अंड्यांचा जन्म म्हणजे कोंबडीचे खाणे सेंद्रिय आहे का ह्याचा उल्लेख सरकारी नोंदिनिशी प्रत्येक क्रेट वर असतो. काही वेळेला कोंबडीला काही औषधे दिले जातात त्याचा उल्लेख पण इथे बंधनकारक आहे. प्रत्येक उत्पादनासाठी सरकारकडून नियंत्रक असतो आणि आंतरराष्ट्रीय परिमाणे काटेकोर पणे अमलात आणली जातात.
सेंद्रिय उत्पादने घरच्या घरी घेऊ शकता. अनेक विद्यापीठांनी किवा खाजगी संस्थांनी उद्यान कला, बागकाम असे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. आम्हाला गच्ची नाही. असली तर ती सगळ्यांची आहे. तिथे परसबाग केली तर नियंत्रण कोण ठेवणार? घरी ग्यालरीत लावली तर उपद्व्याप कोण वाढवणार? रोजचे काम करायला वेळ मिळत नाही. अशी अनेक कारणे समोर येतात. हि कारणे पण वस्तुस्थिती दर्शवणारी आहेत. जेष्ठ नागरिकांनी जर अशा बागांचे व्यवस्थापन पहिले तर…… सोसायटीची गच्चीची चावी त्यांच्या कडे ठेवू. काही सभासदांच्या मदतीने गच्चीत घेतलेले उत्पादन घरोघरी वाटप केले जाईल. निदान काही अंशी तरी भेसळीच्या भाज्या खाण्याचे टाळता येईल. असे अनेक पर्याय आहेत……
सुरवात तर करायला हवी. कोणाची कशाला वाट पहायची?? शिवाजीचा जन्म शेजारच्या घरी झाला तरी निदान एक मावळा तरी आपल्या घरचा असेल हा दृष्टीकोन ठेवला तर भेसळीची सरमिसळ कमी कमी होत त्याला कायमचा आळा घालता येईल.
सप्टेंबर 02, 2010 @ 19:07:51
ताई,
तू खूप मूलभूत मुद्द्यावर लिहिलंयस…खरंच छान…धन्यवाद!
सप्टेंबर 03, 2010 @ 07:55:26
विद्याधर,
तुझा अभिप्राय वाचून खरच खूप आनंद झाला. इतक्या वेळा हा विषय चर्चिला आणि लिहिला गेला आहे कि मला वाटत होते मी पण उगाचच पोस्ट टाकली. आज तू प्रतिक्रिया दिलीस. पोस्ट डिलीट करणार होते पण आता नाही करत. भेसळीच्या सारख्या बातम्या पाहून मन उद्विग्न झाले होते, अस्वथता लिहावी म्हणून लिहिले….
सप्टेंबर 06, 2010 @ 16:21:54
अगदी खरं, भाज्यांच्या कृत्रीम रंगाबद्दल वाचून तर आश्चर्याचा धक्काच बसला होता…..
सप्टेंबर 08, 2010 @ 15:23:02
आनंद, भाज्यांना कृत्रिम रासायनिक रंग लावतात हे बातम्यात दाखवले होते. माझी पण अस्वस्थता वाढली आणि हि पोस्ट लिहिली.
नोव्हेंबर 01, 2010 @ 11:00:22
Thanx, yaar aap bohot acha likhte ho, hum bhi is sub. per kuch padhna chahte the, or aaj padh liye, aapne khuch suzav bhi is per diye hai, wo hume pasand aaye. naye naye sub. per or likha karo.