पुन्हा आठवला एक चांगला माणूस……….

आपला रोजचा प्रवास हा रिक्षाने केल्याशिवाय दिवस पार पडत नाही. रिक्षा कधी खडखड आवाज करणारी असते, तर कधी उंच अशा सीट च्या पाठीमुळे अवघडून बसावयास भाग पाडते. वळणावर तर आपण अलगद पणे डाव्या हाताला असलेल्या कॅटरीना च्या फोटोला धडकतो तर उजवीकडचा ऐश्वर्या ला खेटून बसतो. मीटर कडे लक्ष ठेवत एव्हढी आपटाआपटी व्हायचीच. असले कोण बघते. खरय पण ह्याच रिक्षाचा अनुभव जर आपण वाहतुकीच्या कोंडीत सापडलो तर वैतागवाणा होतो. वेळ कसा जाणार? बाहेर तरी किती डोकावून बघणार. त्यातून पाऊस असेल तर वैताग येतो. आपला कान बरा व आपले कानाला लावून ऐकण्याचे गाणे बरे असे म्हणावेसे वाटते.

पण अशी एखादी रिक्षा मिळाली की जी तुम्हाला प्रवास अगदी मीटर च्या भाड्यासाहित, सुखद करवून आणेल. आवडेल न ही कल्पना! मी काही रिक्षाचे नवीन मॉडेल येणार आहे का ते नाही सांगत तर मला असा सुखद अनुभव मिळाला आहे. जो मला आज पुन्हा आठवला.

मला एक विरोप आला त्या मुळे मला पुन्हा मी केलेल्या प्रवासाची आठवण झाली. मुंबईत तर रिक्षा ने केलेला प्रवास हा काही फारसा उत्तम नसतो. मी काही कामा निमित्ताने बांद्र्याला जाण्यासाठी रिक्षाला हात दाखवीत होते. रिक्षात बसल्यावर लक्षात आले ही अनोखी रिक्षा आहे. सर्व अत्याधुनिक सोई आहेत. खर पाहिलं तर बिन दाराचे हे वाहन जोखमीच्या सोईनी पाहून आश्चर्य वाटले होते.

प्रवाश्यांसाठी वृतपत्रे होती, विमानात मासिक व वृतपत्र ह्या करिता जसा पाऊच असतो त्याच पद्धतीची खास सोय वाचन साहित्य ठेवण्यासाठी केलेली आहे. दूरदर्शन दाखविणारा टीव्ही पण होता. हसणे म्हणजे सर्व ताणांचे निरसन होय. मग हेच हसणे ‘पैसे’ म्हणजे मीटर चे भाडे देताना व घेताना असले तर…… सामंजस्य व मैत्री आणि प्रकृती ह्यांचा विचार कल्पकतेने लिहिलेला होता.

आपली गाडी वेगवेगळ्या अत्याधुनिक सोयीने सजावट करून अभिमानाने फिरवणे हे काही अप्रूप राहिले नाही. परंतु आपण किती जण आपल्या गाडीत आठवणीने प्रथोमपचार ठेवतो? प्रश्न केल्यास बऱ्याच जणांकडून अरे! हो आम्ही विसरलोच! असे उत्तर सहज मिळते. हा तर रिक्षावाला, ह्याने आवर्जून प्रथमोपचार रिक्षात खास सोय करून ठेवला आहे. औषधे ठेवली होती कापूस, डेटोल व काही. ह्या वरूनच कळत होते की, सुशीक्षितपणा हा शिकलो म्हणून नसतो तर तो मुळातच अंगी असावा लागतो. ही एक खास रिक्षा आहे हे ओळखायला वेळ लागणार नाही.

दिनदर्शिका होती. सर्व धर्मीय करिता त्या त्या धर्मातील त्यांची शुभ चिन्हे होती. इस्लाम, बुद्ध, शीख, हिंदू असे सर्व धर्म चिन्हांनी सामंजस्याने राहत होते. सर्व धर्मा करिता त्याचा आदर व्यक्त होत होता. काही फोटो पण आपली वंदना स्वीकारत आपल्याला त्यांनी देशाकरिता केलेल्या बलिदानाची आठवण करून देत होते. २६/ ११ चे कामटे, साळसकर, उन्नीकृष्णन ह्यांचे फोटो आहेत. ह्या सर्वांचे फोटो त्यांनी आपण त्यांना खेटून बसावे असे लावले नसून रिक्षाच्या काचेवर प्रथम दर्शनी दिसतील असे आहेत. आदर कसा असावा ह्याचे भान जाणवते. त्यावरून नुसती रिक्षाच खास नाही तर रिक्षावाला पण विशेष खास होता. आगीपासून बचाव करणारे उपकरण होतेच, रेडीओ, घड्याळ पण होते.

प्लॅस्टिक कंपनीत हा रिक्षावाला नोकरीला होता. कंपनी बंद पडल्यावर गेल्या आठ ते नऊ वर्षापासून हा रिक्षाचा व्यवसाय सुरु केला होता. घरी बसून टीव्ही पाहून काय मिळणार त्या पेक्षा रिक्षा चालवूया असे त्याने ठरविले. शाळेत जाणारी दोन मुले आहेत. दोन पैसे मिळाले तर भाविष्याकरिता उपयोगी पडतील हा विचार पक्का करून रिक्षा सुरु केली. सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत हा रिक्षा चालवतो. ह्यात काय विशेष आहे? हे तर सर्वसाधारण पणे हमखास असणारे दाहक सत्य आहे. जर तो आजारी पडलाच तरच रिक्षाचा खाडा होतो. त्याला ह्या दिवसभरच्या रिक्षा मुळे फारसा वेळ मिळत नसावा म्हणून त्यांनी ह्या सोई करून घेतल्या असतील. ह्या सर्व सोई प्रवासी मजेत असावेत म्हणून केल्या आहेत. हे त्याचे छोटेसे घर आहे व येणारा प्रवासी हा त्याचा अतिथी आहे

अजून काही व्यवसाय आहे का? वेळ फारसा मिळत नाही पण एक गोष्ट मात्र आवर्जून करतो. अंधेरीच्या एका महिला वृद्धाश्रमात हा जातो. तिथे रोजच्या गरजेच्या वस्तू म्हणजे टूथब्रश. टूथपेस्ट, साबण, केसाचे तेल वैगरे गोष्टी तेथील महिला वृद्धाना देतो. प्रत्येक आठवड्याला हा वस्तू देतो कारण त्याच्या कडे त्याच्या गरजेपेक्षा जास्त पैसे जमा झालेले असतात. एव्हढेच नव्हे तर मीटर च्या आकारणीत २५% सवलत अपंगाना त्याने देऊ केली आहे तसे मीटर च्या खाली व्यवस्थित लिहून ठेवले आहे. अंध व्यक्तींना रुपये ५० पर्यंत मोफत प्रवास देऊ केला आहे.

हा असा रिक्षावाला आहे की जो मुंबईचे प्रतिनिधित्व जपतो. मुंबई ची जिद्द, चिकाटी, संकटे आली तरी न डगमगता मुंबई पुन्हा जोमाने कामाला सुरवात करते. अडचणींना कवटाळून बसत नाही. संकटात सर्वाना मदत करते. कामाचा उत्साह, चैतन्य व सामाजिक जाणीव अशीच मुंबईत अनुभवयास मिळते. हा रिक्षावाला निस्वा:र्थी मदत करीत आहे. स्वता:च्या गरजा ओळखून जास्तीचे पैसे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी वापरतो. हा स्वता:शी, समाजाशी प्रामाणिक आहे. असे कितीसे उत्पन्न मिळत असेल पण त्यात पण हा दान धर्म हा माणुसकी करिता करतो. आपल्यालाही आराम देतो, अपंगाना ही पैशात दिलासा देतो. ह्या रिक्षातून प्रवास केला तर नकळतपणे आपणही त्याचा आदर करून सलाम कराल.

मला ह्याच रिक्षावाल्याचा विरोप मिळाला. विरोपात टायटन कंपनीचे ‘सुवेंदू रॉय’ ह्यांनी ह्या अनोख्या रिक्षातून प्रवास केला. रिक्षावाल्याची अनोखी कहाणी त्यांनी विरोपातून सगळ्यांना पाठवली असावी. मला विरोप आमच्या ‘बापू परिवारातून’ पाठविला आहे. हाच रिक्षावाला आज मला त्याच्या रिक्षातून मी पण प्रवास केला होता त्याची आठवण करून देता झाला.

श्री. संदीप बच्छे ( Mr sandeep bachhe ) असे नाव रिक्षावाल्याचे आहे. रिक्षाचा नंबर MH -02 -Z -8508 असा आहे.

मला आता नीटसे आठवत नाही कारण मलाही ह्या रिक्षाने प्रवास केलेल्याला जवळजवळ तीन वर्ष झालीत. पण ह्या रिक्षात प्रवाश्यांसाठी पाण्याची बाटली असावी तसेच त्या रिक्षात असलेल्या खाकी रंगाच्या बॅगेत पण नक्कीच काहीतरी प्रवाश्यांच्या करिता उपयुक्त असावे असे वाटते. आपण जर ह्याच रिक्षातून प्रवास केलात तर मला जरूर कळवा. जमला तर त्याचा मोबाईल नंबर मला पाठवा. मी भारतात जाईन तेंव्हा पुन्हा एकदा आवर्जून त्याच्या ह्या छोट्याशा घरात अतिथी प्रवासी म्हणून प्रवास करेन.

आपणाला जर संदीप बच्छे रिक्षावाले मिळाले तर माझाही पुन्हा एकदा नमस्कार कळवा. आपला प्रवास निश्चित छान होईल याची खात्री आहे. तसेच आपणही आपल्याला जमेल तसे नव्हे तर आवर्जून जेव्हढी मदत करता येईल तेव्हढी निश्चित करण्याचे ठरवूया. सलाम माझा अशा चांगल्या माणुसकीला. येथे मी श्री. सुवेंदू रॉय तसेच माझ्या परिवाराचे आभार मानते.

कारण मला पुन्हा चांगल्या माणसाची आठवण करून दिली.

झाम्प्थ……जेंव्हा विहीर गाते

zampth हा एक पारंपारिक ओमानी खेळ आहे. पूर्वी विहिरी ह्या पाण्याकरिता एक प्रमुख स्त्रोत म्हणून असायच्या. ओमान मध्ये सुद्धा विहिरी आहेत. पण बऱ्याच विहिरी आता कोरड्या पडलेल्या आहेत. ‘झाम्प्थ’ हा खेळ विहिरीच्या रहाटाचा, पाणी विहिरीतून काढण्यासाठी मोट असते. अनेक सुंदर गाणी, काव्य रचना ह्या मोटेच्या नाद मधुर तालावर आहेत.
इथे ही ओमान मध्ये विहिरीच्या रहाट वरती हा खेळ खेळला जातो. फक्त रहाटाला गाडगी नसतात. लाकडाचे चाक, अत्यंत सुबक कोरीव काम केलेले एका मोठ्या आडव्या खांबावर अडकवले जाते. त्याला दोरखंड लावला जातो. निदान दहा जण सहभागी असतात. दोघे विहिरीवर खांब पकडून उभे असतात.आठ जण जाडजूड दोरखंड ओढून चाक ओढून घेतात. लाकडावर लाकूड घासले जाते त्याचा आवाज परिसरात गुंजतो.

प्रत्येक आठवड्याच्या वीक एंड ला ( गुरवारी )रात्री खेळाला सुरवात होते. पहाटेपर्यंत हा खेळ खेळत असतात. बुधवारी ह्या खेळाची तयारी केली जाते. हा खेळ दोन जवळच्या विहिरीवर म्हणजे दोन विहिरीत खेळला जातो. प्रत्येक गट आपापली चाके घेऊन येतो. रात्रीच्या शांत वेळेत हा खेळ रंगतो. अनावश्यक बोलणे बंद करायचे असते. भला मोठ्ठा दोर व प्रचंड चाक व आडवा ठेवलेला खांब ह्यांच्या घर्षणाचा नाद जेव्हढा मोठ्ठा तो गट विजयी होतो.

ह्या खेळाकरिता बक्षीस नसते. सर्वात मोठ्ठा नाद कुठल्या गटाचा आला ते पाहण्या करिता एक पंच असतो पंचाला काही रक्कम आदराने दिली जाते. वयस्कर व्यक्तींना पंच म्हणून खूप महत्व असते. हा खेळ महागडा आहे. चांगल्या प्रतीचे लाकूड कि जे ‘पुली’ करिता म्हणजे चाका करिता वापरले जाते. ते साधारण पणे अडीच लाख ते पाच लाख पर्यंत महाग असते. त्या लाकडातून कोरीव काम करण्यास दोन ते तीन महिने लागतात.

सोळा आऱ्या असलेले हे चक्र असते. गावाकडून ह्याची रक्कम भरली जाते. दोर म्हणजे वेताचा नसतो तर पांढरा असतो. आवाज जास्त येण्यासाठी लाकडाचे चाक म्हणजे पुली गरम करतात. लाकूड गरम झाले कि जास्त आवाज येतो. ठराविक तालात, नादात हा आवाज वाढवत न्यायचा असतो. ह्या करिता दोर कसा ओढावा ह्याचा अनुभव लागतो. घर्षणाचा आवाज नाद मधुर पण निदान ५०० मीटर ते एक किलोमीटर च्या परिसरात ऐकू येतो. इथे असा समज ओमानी लोकात आहे की, पूर्वज मदत करतात. ह्याला काही शास्त्रीय आधार नाही. एक लोक समज एव्हढेच. हा आवाज अरेबिक म्युझिकल नोट सारखा असतो.

दोन गट एकमेकांना मदत करतात. विशेषतः पुली गरम करण्या साठी व जागेवर आणण्यासाठी. रोप खेचण्यासाठी खास टेक्निक लागते. हा खेळ पुरुष खेळतात. रात्रभर चालणारा हा खेळ वेगवेगळ्या गटाच्या पुली लावून खेळला जातो. मस्त थंड हवा, निरभ्र आकाश, स्वच्छ चंद्र प्रकाश, शांतता आणि गरमागरम बार्बेक्यू, खजूर, ओमानी स्वीट्स, बिन दुधाचा छोट्या कपमधून प्यायला जाणारा kahwa चहा. अशी जय्यत तयारी प्रामुख्याने स्त्रिया करतात. ही जागा कुटुंबांनी एकत्र येऊन कॅम्प सारखी करतात. परिसरातले नातेवाईक आवर्जून रात्री येतात. हा खेळ खेळल्या शिवाय त्यांचा आठवडा पूर्ण होत नाही.

चाक किंवा पुली बनविणे हे काम परंपरेने केले जाते. पिढ्यान पिढ्या ह्याचा अभिमान बाळगतात. पुली म्हणजे चाक त्याला ओमानी भाषेत ‘मंजूर’ असे म्हणतात. हे खूप जुन्या परंपरेची असते. १५० वर्ष जुनी ‘मंजूर’ येथे आहे. हा खेळ म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती करिता महत्वाचा मानतात. तसेच गुंजत मोठा मोठा होत जाणारा आवाज म्हणजे जीवनाचे गाणे आहे असे मानतात.

हा पारंपारिक खेळ ‘बरका’ म्हणून टाऊन आहे. तेथील Al Muraisy ह्या ठिकाणहून सुरु झाला असे येथील वयोरुद्ध व्यक्तींचे म्हणणे आहे. आत्ता ओमान मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अफेअर्स ने नोंदवले आहे की, सेन्चुरीस पासून हा खेळ खेळला जातो. पण ह्याची सुरवात आमच्या गावापासून झाली. असे पुरावे देत इथले स्थानिक लोक आग्रही आहेत. ओमान मध्ये साधारणपणे ९८ खेळ हे पारंपारिक खेळ म्हणून मिनिस्ट्री ने सर्वे करून नोंदवले आहेत. अजूनही काम सुरु आहे. आतापर्यंत २५ खेळ हे पूर्ण माहितीनिशी आहेत. कोंबड्यांची झुंज, बैलांच्या झुंजी, उंटाची, घोड्यांची शर्यत असे पारंपारिक खेळ ओमान मध्ये अजूनही खेळले जातात.

zampth म्हणजे शब्दशः अर्थ ‘ध्वनीची शर्यत’ असा आहे. इथे जाचक नियम नाहीत. परंपरा जपण्याची आवड व त्यातून मिळणारा कुटुंबाचा एकत्रित आनंद हे महत्वाचे आहे. पूर्ण रात्र चालणारा शांत वातावरणातला हा खेळ खरच एकदा तरी आनंद घेण्यासारखा आहे.

येथील लोकांचे म्हणणे आहे की आम्ही ह्या पुली किंवा हे चक्रे पुढच्या पिढी करिता जपून ठेवली आहेत. त्यानाही कळू दे की, विहिरीतून पाणी कसे काढले जात होते. आता हा खेळ कोरड्या पडलेल्या विहिरीत खेळला जातो. पुढची पिढी पण नवीन चक्र बनवण्याकरिता वयस्कर व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन पुली बनवीत आहे. विहिरीतून पाणी काढणे हे कधीकाळी आवश्यक होते. परंतु ही परंपरा मानून जीवनाचे गाणे असे सुरेल पद्धतीने पुढच्या पिढी करिता आवर्जून ऐकवले जाते. सर्व कुटुंबीय, आप्त, मित्र परिवार एकत्र येऊन हा खेळ खेळतात. खेळा नंतर एकमेकांची खुशाली, निरोप, आपसातील विचारांची देवाण घेवाण करतात. लहान थोर एकत्र असतात. ह्यातूनच समाज बांधला जातो. नाती दृढ होतात. मने कलुषित न राहता निकोप प्रकृती राहते. असे हे जीवनाचे गाणे म्हणजे विहिरीने म्हंटलेले एक शब्दांवाचून असलेली सुरेल लय, ताल आपल्याला ही नकळतपणे शेतातल्या विहिरी कडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन देते.

हा खेळ म्हणजे आवाजाचा, तो ही नादमधुर अशा संगीतासारखा आहे. विशिष्ठ कोनात दोर खेचला जातो, त्यामुळे आवाजाची लय वाढत जाते. एक पूर्ण गाणे विहिरी कडून म्हंटले जाते.

अमीर ची शाळा…….. शिक्षकांची शाळा

थ्री इडीयट, एकदाचा पहिला. हा सिनेमा पाहावा का? कुठल्या वयाला हा सिनेमा पाहणे योग्य आहे? वास्तव जग असेच असते का? ह्या वर अनेक ठिकाणी चर्चा झालेली आहे. प्रत्येकाचे मत,आवड वेगवेगळी असते. माझा मुद्दा असा आहे की, अमीर ला शाळा, किंवा कॉलेज ज्या पद्धतीने असावे असे वाटत होते. त्या ‘त्याच्या शाळेचे’ चित्रीकरण फार कमी दाखवले आहे. सायकल वर मोटर चालवून गिरणी दाखवली आहे, असेच काहीसे सायन्स वर आधारित त्याच्या शाळेचे प्रयोग फार घाईने दाखवले गेले. लहान मुले दिव्याची वायर सोडून खाली सोडतात, तिथल्या उभ्या व्यक्तीला आरोग्याच्या दृष्टीने काही घातक परिणाम तर होत असेल का? ह्याचे प्रयोग पण लहान मुलांनी अनुकरण करण्याची भीती वाटते.

अमीर ज्या होस्टेल ला राहत होता तेथील रेक्टर कधीच दिसले नाहीत? होस्टेल ला दारू सहज उपलब्ध असते? अजिंक्य चे पुढे येणारे प्रश्न मला भेडसावू लागले आहेत. मुले आत्महत्या करतात, पोलीस चौकशी नाही? घरी आल्यावर आम्ही अजिंक्य शी चर्चा करायचे ठरविले, तोच आपणहून म्हणाला, आई मला जगात वाईट काय आहे ह्याची कल्पना आहे. मी असले सीन कधी मनावर घेत नाही. पण छोट्या मुलां करिता अवघड आहे. असे बरेच वादादीत मुद्दे आहेतच. मी शिक्षिका असल्याने मला शाळेचे चित्रीकरण ह्या मुद्द्या वर जास्त भर असावा असे वाटले असावे.

अमीर च्या शाळेने जे काही ओझरते प्रयोग दाखवले, त्यावरून मी माझ्या पूर्वीच्या शाळा जगतात मनाने गेले. प्रत्यक्ष असे अनेक प्रयोग मी स्वतः शाळेत राबविले आहेत. जेंव्हा वार्षिक शास्त्र प्रयोग प्रदर्शन असते तेंव्हा शास्त्र शिक्षक व वर्ग शिक्षक ह्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी प्रयोगाचे सादरीकरण करतात. मला मुळात स्वभावतः प्रतिकृती बनवण्याची विशेष आवड आहे. माझ्या शाळेने मला पूर्ण संधी दिली. मी प्रदर्शनाची तारीख कळली की, मुलांच्या घोळक्यात कायम असायचे, त्यांच्या कल्पना, काही माझे बदल असे करीत मी ज्या मुलांना मार्गदर्शन केले ते विद्यार्थी आंतर शालेय पासून ते राष्ट्रीय स्तरावर बक्षीस पात्र ठरायचे.

मला मात्र कधीच मार्गदर्शक शिक्षक म्हणून खात्या तर्फे प्रमाण पत्र मिळाले नाही. कारण मी शास्त्र विषयाची शिक्षिका नाही. असे आपले शिक्षण खाते नियम बद्ध आहे. शाळेने, माझ्या सहकारी शिक्षकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी कायम माझा गौरव करून मला नेहमीच प्रोत्साहित केले. तुम्ही ज्या विषयाच्या शिक्षिका म्हणून सरकारी नोंदीत आहात त्या विषय पुरतेच पहा. असा नियम असल्याने शिक्षकांची इतर विषयाची आवड खुंटली जाते. आपल्याला काही मिळणार नसेल तर का करा? असा प्रश्न काही सहकारी मला विचारायचे. ज्याचा तो पाहून घेईल. साहजिकच आपल्या आवडीला आपणच कुंपण घालणे होय. माझ्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळते, आपल्या शाळेचे नाव आज राष्ट्रीय स्तरावर घेतले जाते हि माझ्या सन्माना पेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही करा, आम्हाला ह्यात घेऊ नका. असे ही सल्ले मी पचवलेत. पण स्वभावानुसार असलेली मूळ आवड मला धडपड करावयास भाग पाडते.

मी सायकल च्या सीट मागे असलेल्या कॅरिअर वर पाणी ओढ्ण्याकरिता असलेली मोटर ठेवली. ह्या मोटर ची जोडणी सायकल च्या चाकांशी केली. विजेची मदत न घेता, जसे सायकल ला पायडल केले जाईल तशी मोटर कार्यान्वित होऊन पाणी साठवलेल्या टाकीतून ओढून बागेत ठिबकसिंचन पद्धतीने पाठविता येईल. ही प्रतिकृती प्रत्यक्ष चालवून दाखविता येत होती.आपल्या संकुलाच्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवताच खालच्या टाकीतले पाणी वरच्या टाकीत येऊन पडेल. अशी रचना पायरीची करून दाखविले होती. जेणे करून विजेची बचत होऊन पाणी सुद्धा मिळेल.

आता सुद्धा अमीर ने दाखवलेली स्कूटर वरची गिरणी स्टार माझा ने गेल्या वर्षी जळगाव च्या पेंटर व्यक्तीने केली आहे म्हणून बातमी दाखवलेली होती. तीच गेल्या वर्षीची बातमी पाहून तर अमीर ला चित्रपटाची कथा सुचली तर नसेल. असो शाळा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्याचे फोटो शाळेत कदाचित असतील. मिळतील तेंव्हा दाखवीन. पण पोस्ट लिहिण्याचे अडू नये म्हणून लिहिले. आपल्या आठवणी ह्या फोटो पेक्षा खूप जवळच्या असतात. आता सुद्धा मी वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिकृती बनवीत असते. मला बी.एड. महाविद्यालयात असताना मुंबई विभागाचे प्रथम पारितोषिक मिळाले. शिक्षणाच्या अध्ययन प्रक्रियेत प्रतिकृती द्वारा उलगडा सहज सोपा होतो.

माझा विषय पर्यावरण, भूगोल मग शास्त्र विषयात लक्ष घालण्याचे काम नाही असा सरळ धोपट मार्ग अवलंबिला जातो. पण मी प्रतिकृती म्हंटले की कुठल्याही विषयात सहभागी होत होते. बक्षीस, पुरस्कार हा विचार मनात येऊन दु:खी कधीच झाले नाही. माझी शाळा, माझे शास्त्र विषयाचे सहाध्यायी शिक्षक नेहमीच मला प्रोत्साहन देत होते. सगळ्यात महत्वाचे होते की, मला विद्यार्थ्यांबरोबर काम करावयास मिळायचे. नामांकन, लोकप्रियता याची गणिते माझी आयुष्यात कधी उत्त्पन्न झालीच नाहीत. माझा विषय शास्त्र शाखेशी पण जवळचा आहे. प्रोजेक्शन करून प्रतिकृती बनविणे हे तर माझ्या आवडीचे काम आहे. माझा विषय पूर्ण जगात कुठे ही नोकरी देऊ शकतो.

भूगोल विषय हा प्रात्यक्षिक केल्याशिवाय पूर्ण करता येत नाही. दूरस्थ शिक्षण याचे घेता येत नाही. सर्वांनी दुर्लक्षिलेला हा विषय पण मला कधीच नोकरी शिवाय घरी बसावे लागले असे झाले नाही. सरकारी नोकरी, शाळेपासून ते महाविद्यालयात अध्यापक म्हणून सहज काम करता येते. कंपनी मध्ये पण पर्यावरणाचे मापदंड सांभाळावे लागतात. अशा कंपनीत पण नोकरी मिळते. जगमान्य विषय पण त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. पण आपल्या शिक्षण खात्याने माझ्या सारखे असे अनेक शिक्षक असतील. त्यांना विषयानुसार गृहीत धरल्याने काम करण्यास मर्यादा घातल्या आहेत. हा दृष्टीकोन जर खात्याने बदलला तर अशा प्रायोगिक गोष्टींवर भर देणारे अमीर सारखे शिक्षक आपसूकच तयार होतील. नुसता अभ्यास क्रम बदलून ताण विरहित अभ्यास होणार नाही त्यासाठी शिक्षक म्हणून सरकारने घातलेल्या मर्यादांचा पण पुनर्विचार करावयास हवा.

ठराविक पठडीतून शिक्षक जात असतात. त्यांच्या कौशल्यांना, आवडीला वाव मिळाला पाहिजे तरच अध्ययन हे खाते वाटपासारखे साचे बंद होणार नाही. विषय हे एकमेकांना पूरक असतात. शिक्षकाच्या काम करण्याऱ्या क्षमतेला संधी अधिकृत पणे द्या तरच निकोप वातावरणात शिक्षक पण राहतील. एखाद्या शास्त्र शिक्षकाला जर कलेची आवड असेल तर शाळेत व शिक्षण खात्यात त्याला योग्य ती संधी मिळणे आवश्यक आहे. किती वर्ष आपलेच विषय कवटाळून बसणार? मग अध्ययन व अध्यापिकता ही कंटाळवाणी होते.

साचेबंद काम हे सरकारी नोकरीत, खाजगी नोकरीत करावे लागते. शिक्षण खात्यात अशी मनोभूमिका अमीर च्या चीडचीडेला कारणीभूत ठरते. आज अमीर च्या ठिकाणी अनेक शिक्षक आहेत. कंटाळवाणी अभ्यास पद्धती विद्यार्थ्यांची आहेच पण शिक्षका करिता पण आहे. विषय ज्या त्या शिक्षकाने शिकवणे योग्य आहे. काही स्पर्धा ह्या शिक्षंका करिता असतात. परंतु गणिताच्या सरांनी जर चित्रकलेच्या स्पर्धेत मुलांना मार्गदर्शन केले तर ते ग्राह्य धरले जात नाही.

मी वर्गशिक्षक असल्याने मी जर गणिताच्या काही स्पर्धा करिता मार्गदर्शन केले तर त्या विद्यार्थ्यांना स्पर्धेला पाठवताना गणित शिक्षकाचे नाव घालावे लागते. असे शिक्षण खाते नियमात कटी बद्ध आहे. मग कोणता शिक्षक अशी फुकटची कामगिरी करेल. शिक्षक पण माणूस आहे. विद्यार्थ्यांकरिता करणे हे खूप त्यागाचे लक्षण आहे अशी झळाळी, अशी लेबले म्हणजे आपले टॅग लावणे सोपे आहे पण ज्याचे जळते त्यालाच कळते. खऱ्या, सच्च्या शिक्षकाला मान सन्मान काय महत्वाचा? माझी मनोभूमिका सगळ्यांनाच पटणारी नक्कीच नव्हती. आपले नाव नसले म्हणून काय झाले? प्रश्न विचारणे सोपे होते पण आजच्या काळात व्यवहार्य नक्कीच नव्हते.

अशी अमीर ची शाळा सर्व शिक्षकांना नक्कीच आवडेल. पण त्यातील काही प्रयोग मात्र टाळले तर चांगले होईल. कारण मुलांबरोबर शिक्षकांचा पण साचेबंद शिक्षण पद्धतीत कोंडमारा होतोच आहे. विषय आपल्या शिक्षणा प्रमाणेच शिकवावा पण इतर विषयांशी त्याची जोडणी ही काळाची गरज आहे. ज्या ठिकाणी शेती हा प्रमुख व्यवसाय तेथील भागाचा आहे तिथे शेती विषय अभ्यासास असावाच. शहरी भागात छोटे व्यवसायभिमुख विषय असावेत.

असे बदल झाले तर ऑल इज वेल….आपण सुद्धा म्हणू शकू. अमीर ची शाळा खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या मनातील शाळा होय.

मी उद्योजिका…….. व्यवसाय मराठी मनाचा.

माझ्या वडिलांनी एक छोटासा व्यवसाय सुरु करायचे ठरवले, त्याप्रमाणे व्यवसायाच्या सर्व मिटींग्स आमच्या घरी होत होत्या. मी कॉलेज ला होते. प्रत्येक मिटींग्स न मला आवर्जून वडील तिथे बसवायचे. आईला पटायचे नाही, मुलीची जात संसार करायला लागणार, असे वातावरण नाही मिळाले तर? पण तेंव्हाच व्यवसायाचे आकर्षण मला वाटू लागले. वडिलांनी विचारांची बैठक तयार केली. लग्न होवून सासरी आले. मिस्टर पण इंजिनीअर झाल्यावर त्यांच्या वडिलांचा कारखाना सांभाळू लागले. वय व अनुभव, शिक्षण यांचे त्रैराशिक कमी पडले व नोकरी करू लागले.

मुलगा आता मोठा होउ लागला आहे. त्याचे विश्व वेगळे आहे. मुंज केल्यावर आई म्हणून मी वेगळी पडले ह्या धक्क्याने मी मुंज लागताना एकटीच हॉल च्या बाहेर येऊन खूप रडले. माझ्या बाळाचे मुंडावळ्या लावलेले गोंडस रूप मी अक्षता हाती घेत पाहू शकत नव्हते. तिथूनच मला जाणवले की, बच्चा मोठा झाला आहे, हे मला समजून घ्यायला हवे. मन मानेल तर न.

आता पण तो सुट्टी करिता आईकडे भारतात गेला आहे. एक आठवडा घर सफाई करण्यात गेले. बरे वाटत होते, त्याची लुडबुड नाही. त्याचे कपाट तर मनसोक्त आवरले. नंतर मात्र पसारा नाही म्हणून रडू येऊ लागले. करियर करण्याची वर्ष पिल्लू करिता मी अशीच उधळली. अर्थात त्याचे दुखः कधीच नव्हते. कारण त्याच्या करिता ते गरजेचे होते. पण आता त्याचे विश्व तयार होवू लागले आहे. शिक्षण व पुढील करिअर ह्या करिता तो कदाचित दूर देशी पण जाईल. मग मी काय करू? बायकांचा वेळ घरात जातो पण पुरुषांना मात्र मन खायला उठते. नको ती दुखणी मन आजारी असल्याने मागे लागतात.

माझ्या करिता व ह्यांच्या करिता काहीतरी उद्योग सुरु करावयास हवा ह्या मनात रेंगाळणाऱ्या विषयांनी पुन्हा जोर धरला. ह्याचे श्रेय माझ्या सासू ला जाते. मुलांचे संसार मार्गी झाल्यावर त्यांनी सासऱ्यांच्या मदतीने स्वता:ची दुध डेअरी चालू केली. दोघेही मजेत व्यवसाय करतात. संसारात राहूनही स्वःताचे अस्तित्व त्या दोघांनी जपले. जो पर्यंत तब्येत साथ देईल तिथ पर्यंत करूच. असा निश्चय त्यांचा आहे. वयाच्या ८० नंतर ही मजेत कोणाच्या ही भानगडीत न पडता व्यायाम तर होतोच पण चार माणसे ही भेटतात. मी पण तसाच विचार फार पूर्वी पासून करीत होतेच. योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. मुलाच्या विश्वात अडकून त्याला पण मर्यादा घालायच्या हे पटत नाही.

आतापासूनच प्लान्निंग केले तर १५ वर्षात मी नक्कीच उद्योग जगतात माझे नाव मिळवू शकेन. ह्यांच्या आवडीचे इंजिनीअरिंग विश्व व तेथील अनुभव हे माझे पाठबळ होते. म्हणून हेच क्षेत्र निवडले. मी तर इंजिनीअर नाही परंतु मला मार्केटिंग मधील भरपूर अनुभव आहे. प्रत्येक प्रोडक्ट मी अभ्यासले, पूर्ण माहिती मिळवली. माझ्या स्किल वर मी हा व्यवसाय करू शकते हा विश्वास मला आहे. अर्थात ह्यांचे मार्गदर्शन ह्या शिवाय हे शक्यच नव्हते. ह्यांनी रोजचा होमवर्क दिला. मी व्यवसाय करणार, हे माझे स्वप्न म्हणून कधीच नव्हते तर संसाराला सुरवात केल्यावर आपला व्यवसाय योग्य वेळ आली कि नक्की करायचा हे ठरवून ठेवले होते.

अचानक साक्षात्कार झाला असे नसते तर आधी अभ्यासून व्यवसाय केला तर रिस्क मॅनेज करणे बरेच सोईचे होते. परिश्रम खूप आहेत. स्वप्न म्हणून नव्हे तर एक ध्येय म्हणून माझ्या सर्व स्कील च्या मदतीने मी पूर्ण करणार. मला टाटा व बिर्ला एका रात्रीत व्हायचे नाही पण जे काही करेन त्यात पूर्ण समाधानी नक्कीच असेन. सातत्य व नियोजन ह्यावर माझा विश्वास आहे. ही माझी सेकंड रिव्हर्स एन्ट्री आहे. तो मोठा होतोय. आई, मला करिअर करता कदाचित तुझ्या पासून लांब जावे लागेल. माय मॉम इज अ ब्रेव्ह अशी समजूत माझी काढतो.

एक संधी मला खुणावू पाहते. ज्यात मला ह्यांचे व माझे छोटेसे जग पुन्हा दिसते. संसाराची जवाबदारी पेलवत बरेच वर्षे आम्ही आमचा विचार केला नव्हता. आतापासून काही सुरवात केली तर लोनली पिपल म्हणून राहणार तर नाही. आमच्या दोघांच्या वडिलांनी एक मार्ग आम्हाला शिकवला, हेच वय आहे अजिंक्य चे संस्काराचे, व्यवसाय कसा असतो हे आम्ही त्याला शिकवले पाहिजे. भले तो छोटासा असेल पण त्यातूनच कदाचित मराठी मुलाचा व्यवसाय असे समीकरण जमेल.

नोकरीच्या रहाट गाडग्यात छंद म्हणू काही जोपासता आले नाही. अशा आवडीच्या विषयाचा पण व्यवसाय होतो. आमची आवड उद्योग जगात रमायचे अशी आहे. ह्या आवडीला साजेसा व्यवसाय सुरु करते. मराठी माणसाने व्यवसाय करावा हे सांगणे आजकाल एक पद्धत पडली आहे. भांडवल हा मोठा प्रश्न असतो. आम्हालाही आहे. पण अनेक योजनामधून आपण पैशांचे पाठबळ मिळवू शकतो. आता तर रिसेशन सुरु आहे. नोकऱ्या सुद्धा गेल्यात मग हे व्यवसायाचे खूळ काय झेपणार?

दैनदिन गरजा भागवणारे पण व्यवसायच असतात. ठाण्याला एक गुजराती व्यक्ती चिरलेली भाजी विकायला घेवून बसते. हातोहात सर्व संपते.एक दिवस मी उत्सुकता म्हणून विचारले तर त्याच्या मागे असलेली बंद पडलेली कपड्याची कंपनी त्याचीच आहे. धंद्यात खोट आली म्हणून कोर्टाने कंपनीच्या जागेला सील केले. तिथेच समोर बसून हा भाजी विकतो. मी म्हटले तुम्हाला खूप दुख: झाले असेल. त्याने उत्तर दिले, कंपनी बंद पडली म्हणून दुख: नकीच झाले. पण तेच कामगार घेवून आज भाजी कापण्याची मशीन मी ठेवली आहेत. आता बिल्डर मोठे संकुल बांधणार आहे.मी पण एक दुकानाचा गाळा विकत घेतला. ह्याला म्हणतात जिगर..

हि जिगर मराठी माणसात नक्की आहे. फक्त हवे आहे नियोजन व्यवसायाचे. मी आमच्या शिक्षण व अनुभव धरून व्यवसाय नक्कीच करणार. कुठलाही व्यवसाय हा पूरक उत्पन म्हणून पण उपयोगी पडतो. नोकरीचा पगार हा सेफ असतो पण छोटासा एका होईना एक व्यवसाय कुठल्यातरी पिढीने सुरवात म्हणून तरी करावयास हवा.

माझ्या प्रत्येक पावलाच्या पुढे माझा जीवन साथीदार उभा आहे. माझ्या पाठीमागे “भिऊ नकोस…….असे म्हणत माझे गुरु आहेत. मला जे उचित आहे तेच मला निश्चित देतील हि खात्री माझ्या सदगुरूनी मला दिलेली आहे. हेच माझे विश्व आहे. मला खुणावणारी उद्योग जगताची संधी हीच मला नवीन प्रकारे ब्रेव्ह बनवेल.

लेकाकरिता संगणक माहिती करून घेतला, त्याच्या भविष्यात पण आई वडिलांच्या खुणा, संस्कार हेच पाठबळ असेल. मराठी माणसाचा व्यवसाय असाच तर सुरु होत असेल. पिढीजात व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचे मापदंड वेगळे असतात. पण आमचा छोटासा व्यवसाय मुलाला हे ही कार्यक्षेत्र आहे असे नक्कीच शिकवेल असा विश्वास आहे.

आमच्या वडिलांनी जे स्वप्न पहिले, ते आमच्या पिढीचे ध्येय होते व पुढच्या पिढीचे सत्य असेल. मराठी माणूस व्यवसायात स्थिरावतोय ह्या आशेवर आमचा प्रयत्न……

“मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…”

……….खेळ मांडला….मांडला……मांडला…!!!!!!!!

एक महिनाभर अजिंक्य पुण्याला बहिणीकडे गेला होता. आज परत येतोय. काल रात्री त्याचा फोन आला. आई इथे बातमी आलीय की, सातवी च्या मुलाने सूसाईड केले. तो स्टडी मध्ये वीक होता. आजीने काय सांगितले लक्षात आहे ना? अजिंक्य, ला रागवत जाऊ नकोस म्हणून. मम्मी, तुला छान वागता येते ना? अरे, अभ्यास वेळेवर केला की, टेन्शन रहात नाही. तू कशाला एवढी काळजी करतोस. असे माझे विचारणे सुरु झाले.

अग, इंडियात एक मराठी मुव्ही आलाय त्यात दाखवले आहे की, पेरेंट्स नीट वागत नाहीत. क्रिकेट मध्ये त्याला करिअर करून देत नाहीत. एजुकेशन सिस्टीम चेंज करायला पाहिजे. कशाला मी ह्याला भारतात पाठवले असे मला झाले. तो इकडे मराठी बातम्या फारशा पाहत नाही. ह्या आत्महत्येच्या बातम्या म्हणून दूरच राहतात. पण पळणार तरी कुठे? व किती काळ? कधीतरी ह्या सर्वाना त्याला सामोरे जावेच लागेल. आठवीच्या अर्धवट वयाचा हा माझी रात्रभर झोप उडवून गेला. आणि म्हणतो कसा सहावी पर्यंत पेरेंट्स शांत असतात पण नंतर ते टेन्शन मुलांना देतात. मम्मी तू आता चेंज होणार नाहीस ना? आजी समोर माझ्या स्वभावाची कबुली चाललेली होती.

ह्या वयाच्या मुलांना गळफासाची गाठ कशी जमते? साधी बुटाची लेस धड बांधता येत नाही. हा स्काउट व गाईड मध्ये शिकलेल्या गाठींचा दुष:परिणाम तर नसावा???? तसेच फास टांगण्यासाठी हात एवढ्या उंचीवर पोहचतात कसे? नाडीची घट्ट गाठ ह्यांना सोडवता येत नाही मग हे ट्रेनिंग मिळते कुठून???? सिनेमात देह लटकलेले दाखवतात. गाठी कशा बांधतात हे अजून तरी पाहण्यात आले नाही. माझ आतापर्यंत एवढूस असलेलं बाळ कसले प्रश्न विचारू लागलं आहे.

मला पेरेंट्स कौन्सलिंग नवीन नाही. पण माझ्या शिक्षणाच्या मागे व अनुभवाच्या पुढे माझ्यातली आई, आज हादरली आहे. सामंजस्याने, लेकाशी गप्पा करून सुसंवाद मी करणार आहेच. पण किती स्फोटक व टोकाचे विचार ह्या पिढीत आहेत. मुलांच्या स्वातंत्र्याच्या सीमारेषा, आई वडीलांचे स्पर्धात्मक जीवन जगण्यासाठी चाललेली धडपड हे एक कारण आहे.

तमाशा डान्स फॉर्म वर पण एक मुव्ही आहे. तो हिरो पण खूप स्ट्रगल करतो. आई, मग इथल्या नेहा सावंत ला डान्स मध्ये करिअर करायचे होते तर पेरेंट्स ने रिफ्युज का केले? तिने पण सूसाईड केले. तुम्हा मोठ्या माणसाना असे मुव्ही आवडतात ना, मग चिल्ड्रन ना परमिशन का देत नाहीत? अरे तिची परीक्षा जवळ आलेली असेल, किंवा अजून दुसरे कारण असेल म्हणून तिला रिफ्युज केले असेल.

आपल्याला पूर्ण माहिती आहे का? माझे समजावून सांगणे चालू होते. बाळा, अभ्यास महत्वाचा असतो रे!! रिफ्युज केले नाही तर फक्त स्टडी कडे लक्ष दे असे पेरेंट्स ने सांगितले. आधी अभ्यास महत्वाचा, साईड बाय साईड हॉबी पूर्ण करता येते. बेसिक एजुकेशन कॅम्पलीट पाहिजे. काय करणार पालक?? आपल्या पाल्यांना ह्या चकमकत्या दूनिया पासून कसे दूर ठेवणार?

तू कशाला विचार करतोस? मम्मा, आमच्या जनरेशन चा क़्वेशचन आहे. बर तू उद्या येतोस ना मग आपण बोलू या. मी विषय टाळण्याचा प्रयत्न करीत होते. एक महिना अजिंक्य शिवाय राहणे मला कर्म कठीण होते. उद्या येणार म्हणून कसली खुश होते तर हे महाशय प्रश्न विचारून झोपून गेले. मी मात्र हैराण झाले. ही बातमी कालच्या पेपर मध्ये होती. माझ्या हाती कालचा पेपर आज मिळाला. बातमी पूर्ण वाचल्याशिवाय मला ही सुचत नव्हते.

पुन्हा दहा मिनिटांनी अजिंक्यचा फोन आला, मम्मी अजून एक सॅड न्यूज आहे. मेडिकल च्या एका गर्ल ने पण सुसाईड केले. ती हुशार होती पण टू सब्जेक्ट मध्ये फेल झाली. मम्मा, मग मी कशात करिअर करू? ह्या वयात करिअर चा विचार स्पष्ट झालेला नसतो. मुलांच्या मनात खूप गोंधळ असतो. असे काही कळले की त्यांना त्या विषयात इनसीक्यूअर्ड वाटायला लागते. त्याच्या मनातला गोंधळ तो आताच माझ्याशी शेअर करीत होता. माझ्याशी बोल्याशिवाय चैन पडले नसते. तू इकडे आल्यावर आपण बोलू असे समजावत वेळ तात्पुरती निभावून नेत होते. पण हा विषय त्याच्या डोक्यातून जाणार नाही जो पर्यंत समाधान त्याला माझ्या कडून मिळणार नाही याची पूर्ण जाणीव मला आहे.

मम्मा आत्ता एक चांगली न्यूज देतो. पुण्यात थंडी खूप होती म्हणून मी पण चहा प्यायला लागलो. आता तिकडे आल्यावर तू मला रोज चहा करून दे. मुलांनी दुध प्यावे बुद्धीवर्धक असते. हा माझ्या वर ठाम पणे झालेला संस्कार आहे. दहावी नंतर ठीक पण आताच योग्य नाही. बरेच जण चहा लहानपणापासून घेतात. मोठे झाल्यावर चहा ढोसणे असतेच.

हे वय ग्लास भरून दुध घेण्याचे आहे. बाहेरचे कोणी कधी ही घेऊ देत. मला पटत नाही व पटवून घेण्याची गरज पण नाही. आई,त्याला समजावून सांगत होती. मला फोन वर तिचा आवाज ऐकू येत होता. थंडी होती म्हणून दिला. तिकडे एसी असतो ना मग नाही घ्यायचा. आजी चहा छान करते तिच्या कडून रेसिपी शिकून घे. हा सल्ला ही द्यायला विसरला नाही. मी चहा घेते पण कुठल्याच गोष्टी करिता टोकाची आवड, त्या करिता ऍडीक्ट होणे माझ्या स्वभावात नाही. माझा बोलण्याच्या आवाजाचा अंदाज घेऊन मग म्हणाला, कधी तरी देशील का? बर ठीक आहे. मी पुन्हा विषय क्लोज करण्याचा प्रयत्न करू लागले.

माझ्या घरात चहा सकाळी एकदाच होतो. ह्यांना ऑफिस मध्ये बऱ्याच वेळेला घ्यावा लागतो. हे पण बिन दुधाचा, बिन साखरेचा ‘सुलेमानी’ चहा घेतात. घरी आल्यावर कधी ही चहा घेत नाहीत. मला चहा आयुष्यभर घेतला नाही तरी चालेल. माझा सकाळचा चहा मी उद्या पासून बंद केला. अगदी कायमचा हे ठरवून टाकले आहे. त्याला मोह कसा टाळावा हे शिकवण्याचे आताचे वय योग्य आहे. एकेक गोष्टींचा विचार करत रात्र उलटून पहाट झाली हे कळेलच नाही.

लहान होता तेंव्हा माझ्या हाताला घट्ट पकडून चालायचा. आता माझ्या बाळाचा हात माझ्या हातापेक्षा मोठा झालाय. कसे समजावून सांगू? प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण हवे असते. मी ही समजावून सांगत असते पण आई जगापेक्षा लहान आहे. त्यालाच अनुभव घ्यावा लागणार आहे. मी कुठ पर्यंत पोहोचणार?

जीवन म्हणजे खेळ नाही. जिंकणे व हरणे हे आयुष्य करिता नसते. जीवनाला सामोरे जायचे असते. खेळ म्हणून आयुष्य मानले नाही तर हार कुठली? व जीत कसली राहणार?. सर्व आयुष्य हे एक रोज वेगळा अनुभव देणारे ठरेल. त्या आयुष्यात निराशा नसेल, यश मिळावे म्हणून जीवघेणी स्पर्धा नसेल. तसेच यशाची धुंदी ही नसेल.

जीवनाकडे स्पर्धा म्हणून आपल्या पाल्याला बघायला शिकवू नका. आयुष्य म्हणजे रिअलिटी शो नाहीत. स्वप्न पाहायला मुलांना जरूर शिकवा पण सत्य पण कानी घाला. हार किंवा जीत ह्या करिता जन्म नाही. अवास्तव अपेक्षांना वेळीच नियंत्रण करणे हे पालकांच्या कौशल्याचे काम आहे. मुलांच्या मनात चाललेले विचार त्यांच्याशी बोलून समजून घेणे गरजेचे आहे. आयुष्य हे खेळ आहे. असे समजल्यामुळे आशा, निराशा पदरी येते. जीवनाकडे एक अनुभव म्हणून पहिले तर बरेच पालक चिंता मुक्त होतील.

माझ्या लिखाणाद्वारे मी प्रयत्न केला, मुलांच्या मनातील खेळ मी मांडला…. मांडला…

ओमान च्या मातीतील कलाकृती….

ओमान मध्ये गावांच्या ठिकाणी मातीच्या आकर्षक वस्तू तसेच वेताच्या वस्तू अशानी दुकाने ठासून भरलेली असतात. अनेक लहान लहान दुकाने रस्त्यालगत असतात. अशा ठिकाणचे फोटो देत आहे. मला काही आवडलेल्या मातीच्या कलाकृती आपणालाही आवडतील.