सलाला………….ओमान मधील निसर्ग.

‘हिरवे हिरवे गार गालिचे……..’ अस म्हंटल कि डोळ्यासमोर येतो तो नितांत सुंदर असा निसर्ग. भारतातील पावसाळी अनुभव घ्यायचा असेल तर ओमान मध्ये पण निसर्ग आहे. हिरवा कच्च….. डोंगरावरून धोधो पडणारे धबधबे…….अगदी आपल्यासारखी लाल माती सगळे कसे जणू काही फार पूर्वी भारताशीच भूमी म्हणून जोडले असावे. इथे जून ते सप्टेंबर’ खरीप हंगाम’ असतो. येथील लोक खरीप सिझन असेच म्हणतात. रब्बी आणि खरीप ह्या दोन हंगामाची भूगोलात घट्टपणे साथ असतेच. ह्या हंगामात आपल्यासारखा मान्सून पण आहे.

मस्कत शहरानंतर ओमान मधील हे दुसरे मोठे शहर. मस्कत पासून दक्षिणेला आहे. साधारण पणे रात्री बस मध्ये बसले तर पहाट उजाडे पर्यंत सलाला येते. वाळवंटाची टेकाडे, वादळे, शुष्क आणि कोरडे हवामानात प्रवास करताना छान लाल माती व हिरव्या निसर्गाचा दरवळ आपल्याला ‘ने मजसी ने……ची आठवण करून देतो.

हा निसर्ग पाहताना लक्षात येते कि, आपण कोकणच्या भूमीत जणू काही प्रवेश करत आहोत. इथल्या पावसाळी पर्यटन करता अतिशय लोकप्रिय आहे. विमान व रस्ता दोन्ही मार्गे येथे पोहचता येते. अरेबिक राष्ट्रातून ह्या पर्यटन स्थळा करता फार मोठा ओघ असतो. रस्त्याच्या दुतर्फा व नजर जाईल तिथ पर्यंत हिरवळ, जंगल आणि पाऊस.

ईद च्या सुट्टीत सलाला येथे भेट म्हणजे उपवास संपलेला आणि हिरव्या निसर्गात ताजेतवाने होऊन मस्त पैकी वातावरण आणि खाणे आणि आराम करणे हे प्रमुख आकर्षण आहे. केळीच्या बागा, नारळ, पानाचा मळा(विड्याची पाने) फक्त सलालात पाहण्यास मिळतात. विड्याच्या पानांना मस्कत मध्ये बंदी आहे. सर्व प्रकारची फळझाडे, विविध फुलझाडे आणि येथेच ओमान चे प्रसिद्ध बखुर म्हणजे धुपाचे झाड पाहण्यास मुबलक मिळते.

पर्यटन स्थळे म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात टेकडी वर चढणारी कार. अर्थात गाडी न्युट्रल ला करून फक्त स्पीड नियंत्रित करावा लागतो. येथे गाडीचा स्पीड ४० च्या हि पुढे जातो. ह्या ठिकाणावर पण खूप गर्दी असते.

समुद्र किनारी ‘सिंक होल’ आहेत. खडकातून समुद्राच्या लाटे बरोबर पाणी फार मोठ्या तुषार स्वरुपात वर येते. सिंक होल चे वैशिष्ट्य म्हणजे खूप खोल अशी विवरे आहेत. लाटेची गाज धीरगंभीर आवाजात आपल्या अंगावर प्रचंड प्रमाणात पाणी उधळून आपले सामर्थ्य प्रकट करते.ह्या सिंक होल च्या भोवती भक्कम असे ग्रील आहे बऱ्याच अंतरावरून आपल्याला उभे राहावे लागते. पाण्याचा खळखळ आवाज माधुर्य निर्माण करतो पण हा आवाज म्हणजे शरीरास व मनास देखील कापरे भरवतो. जीवन क्षणभंगुर आहे तसेच सुंदर हि आहे ह्या दोन टोकाच्या परिसीमा अनुभवायच्या असतील तर ह्या सिंक होल शिवाय सलाला पाहणे म्हणजे अपूर्ण ठरेल. चुनखडी चे प्रमाण लक्षणीय असल्याने खडकात विविध आकार. रंग छटा पाहण्यास मिळतात.

येथेच शहरात एक मुस्लीम पीर दर्गा आहे. त्यांची उंची चाळीस फुट होती. हा दर्गा सर्व पर्यटकांसाठी पाहण्यास ठेवला आहे. हा टोम्ब मेरी म्हणजे जिझस ची आई तिच्या वडिलांचा आहे. ह्याचा कुराणात उल्लेख आहे असे कळले. ‘टोम्ब ऑफ नबी इम्रान’ गर्दी नेहमीच असते.

येथीलच पण काहीसा दूर असणारा दुसरा दर्गा म्हणजे ‘जॉब्स टोम्ब’ ह्यांची पण उंची सर्वसाधारण उंची पेक्षा जास्तच आहे. ह्यांच्या पावलाचे ठसे दर्ग्या समोर खडकात उमटलेले आहेत. आकाराने बराच मोठा असा हा ठसा आहे.प्रत्येक धर्मात असे ‘अजानबाहू’ गुरु किंवा धर्मोपदेशक आहेत हे मनोमन पटले.

रस्त्यावरून जाताना किंवा बाजूला हिरवळीत आपल्यासारखीच गाई, गुरेढोरे, मेंढ्या चरताना दिसतात जणू काही भारतातून स्थलांतरित झाल्या असाव्यात. पण त्यांच्या बरोबर गवत चारणारे उंट पहिले कि मात्र मन भानावर येते. आजूबाजूला आपल्यासारखी कौलारू घरे फारशी नाहीत, तेथून धुरांड्यातून येणारा भाकरीचा दरवळ मात्र आसमंतात नाही. दुधाची तहान ताकावर भागवावी लागते हे हि काही प्रमाणात तथ्य नक्की आहे. येथे येणारे युरोपिअन, सौदी लोक मात्र ह्या वातावरणावर खूप खुश होतात. जर पावसाळ्यात भारतात जाणे झालेच नाही तर इथेच हा जवळ प्रती भारत आहे. अर्थात सलाला मस्कत सोडण्याआधी नक्की बघावे. असेही फिरण्यास खूपच छान आहेच.

रस्त्याची वाट हि गच्च अशा आमराईतून, केळीच्या पोपटी बागामधून, विड्याच्या पानाच्या मळ्यातून जाते. झुळझुळ वाहणारे पाटाचे पाणी आहे, नाही ती मराठी वाहिनी बाय……मालकी हक्क फक्त ओमानी लोकांकडे आहे आणि हे सर्व सांभाळणारे आपले मल्याळी….. शहाळी, ताजी ताजी फळे अगदी बागामधून झाडावरून काढून पण देतात. अशा टपरी रस्त्याच्या दुतर्फा आहेत. गोवा पण आपल्याच जवळ आहे असे वाटते

पुरातन काळात एक गाव होते, त्या गावात एक धर्म गुरु राहत असे. लोकांचे स्वैराचार वाढले होते. वारंवार सांगून देखील लोकांनी आपले वर्तन सुधारले नाही म्हणून गावातील लोकांना व सर्व गावाला त्याने शाप दिला कि तुमची सर्वांची घरे उलटी होतील. घराचे छत खाली, दरवाजा पण उलटा आणि घराचा चौथरा वरती होईल. असे एक आख्खे गाव आज पुरातन जागा म्हणून पाहण्यास मिळते. हि गोष्ट आम्हाला तिथल्या गाईड ने सांगितली आणि ह्या गावचा असा उल्लेख कुराणात आहे. सध्या पूर्ण पणे ढासळत हे उलटे गाव चालले आहे. ह्या जागी फिरण्यास आपल्याला एक छोटी गाडी घेऊन फिरते. त्याच प्रमाणे कालौघात नष्ट झालेली पण खांबाचा पुरावा ठेवलेले असे अल बलिद सारखी पण गावे उत्खानात सापडलेली दिसतात.

असे हे निसर्गरम्य आणि प्रदूषण विरहित सलाला म्हणजे ओमान मधील आशिया होय. हिरवा निसर्ग हा भोवतीने……. राजस्थान मधील वाळवंट आणि सह्याद्रीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. salalah हा शब्द अरेबिक सूची मध्ये आहे. वाढ होणारे बी किंवा आर्च ऑफ द वूड असा अर्थ आपण घेऊ शकतो. जिथे निसर्ग मुक्त पणे बहरतो ते सलाल्लः होते.

.

पन्नासावी ओवाळणी………….डॉ. मंजिरी नानिवडेकर.

डॉ. मंजिरी नानिवडेकर. माझी सख्खी नणंद. माझे लग्न झाले तेंव्हा काहीशी अबोल मला वाटत होती कदाचित मी जास्तच बडबडी असल्याने असेल हि…. पण हळू हळू सहवास वाढत गेला. अबोल वाटणारी मंजिरी प्रसन्न हसली कि तिच्या हसण्यानेच बोलण्याचे काम कमी केले असायचे. अभ्यासू असणारी मंजिरी कुठल्याही विषयवार अत्यंत समग्र पणे मत प्रदर्शित करत असे.

१६ ऑगस्ट ला भारतातून रात्री १२ वाजता दिराचा फोन आला. फोन घेण्याची हिम्मत होत नव्हती. माझी सख्खी नणंद व माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे कराड च्या डॉ. मंजिरी नानिवडेकर हिचा संध्याकाळी पाठीमागून स्कोर्पिओ ने धडक मारल्यामुळे मृत्यू झाला आहे. तिच्या बरोबर असणाऱ्या दोन डॉ. मैत्रिणी पैकी एकीचा डॉ. शामल जोग ह्यांच्यावरहि काळाने घाला केला.

१७ वर्षाचा मुलगा वडिलान बरोबर बसून गाडी शिकत होता. हलगर्जी पणा, बेजवाबदार वृत्ती आणि नियमांचे उल्लघन ह्या मुळे आज आमच्या कुटुंबावर तर अवकळा आली पण कराड शहराला हि दोन डॉ चा मृत्यू हि लाजिरवाणी बाब आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज चे अपरिमित नुकसान ह्यांच्या मृत्यू मुळे झाले आहे.

माझी नणंद डॉ. मंजिरी नानिवडेकर हिचे अनेक थिसीस आज नेट वर उपलब्ध आहेत. दहावी पासून ते मेडिकल पर्यंत सर्व शिक्षण गोल्ड मेडल घेऊन पूर्ण केले होते.

http://www.ojhas.org/issue31/2009-3-14.htm हि एक लिंक मी देत आहे.

आपल्यापैकी जे कोणी डॉ. होत असतील त्यांना तिचे लिखाण नक्की उपयोगी पडेल म्हणून हा बझ्झ तिच्या साठी केवळ तिच्या रक्षाबंधनाच्या ओवाळणी साठी…….

आजचा माझा बझ्झ वरचा ‘बझ्झ परिवार’ बरोबर झालेला संवाद मी येथे पोस्ट मध्येच देत आहे. सर्वांच्या सदभावना ह्या मनास उभारी देणाऱ्या आहेत.
धन्यवाद!!!!

सुहास झेले – ओह्ह्ह खूप वाईट झाल

झम्प्या झपाटलेला – खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.. गाडी शिकण्यासाठी ह्या माजखोराना मुख्य रस्तेच मिळतात का? आणि हे आर टी ओ वाले १७ वर्षांचा मुलगा गाडी चालवत असतो तेंव्हा काय झोपा काढतात काय… हलगर्जीपणामुळे आपल्या समाजाचे, देशाचे किती नुकसान आपणच करत असतो… आणि फक्त १५ ऑगस्टला म्हणतो” मेरा भारत महान”

आ का – देव त्यांचा आत्म्यास शांती देवो..

@सुहास खरोखर भयंकर मानसिक धक्का आम्हाला आहे.
@झम्प्या झपाटलेला…..आपण म्हणता तशीच प्रतिक्रिया आमची पण झाली. आज आख्खे कराड तीव्र प्रतिक्रया देत आहे. असल्या माजोरड्यांना शिक्षा व्हायलाच हवी.
@ आका…..काय लिहू रे!!!! ८५ वर्षाचे सासू सासरे अखंड अश्रू ढाळत स्वतःचा मृत्यू मागत आहेत… सगळे भारतात सोडून आले आणि धाव घेतली बझ्झ वर आपल्यांसाठी…. –

Vidyadhar Bhise – ताई… खूपच दुःखद घटना आहे गं! आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत!

विद्या…… संध्याकाळी रोजचे चालण्यासाठी अगदी जवळच्या आणि आतील रस्त्यावर नेहमी ह्या तिन्ही मैत्रिणी जायच्या……..अशाच निघाल्या आणि दोघी घरी परत आल्याच नाहीत..एक मात्र बचावली ती पण मानसिक धक्क्यातून सावरली नाही. पोलीस खटल्यातून त्यांना कधी शिक्षा मिळणार???? रस्त्याच्या कडेने गटाराच्या बाजूने चालत होत्या मागून गाडी आली ब्रेक च्या ऐवजी ऐक्सिलेटर केला आणि दोघेही पळून गेले. गाडी पलटी होऊन गटारात पडली. बाहेरून काहीही जखम नव्हती. बरगड्या तुटून शरीराच्या आतील बाजूस घुसल्या त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन……

आनंद पत्रे – ताई… आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत!

सा बा – आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत!

Kanchan Karai – ताई, आम्ही तुझ्या दु:खात सहभागी आहोत

महेंद्र कुलकर्णी – वाईट झालं. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

हो रे आनंदा, आज तुमच्या साठीच बझ्झ वर आले. धनंजय ला धीर देताना मी मात्र एकटी पडते म्हणून बझ्झ वर सगळ्यांना भेटण्यासाठी आले… कोणी कोणाची कशी समजूत काढायची??? तिची मुलगी अदिती अमेरिकेत एम डी करत आहे. आज मला मामी ची भूमिका पार पडताना तारांबळ उडते…. नणंदेचे मिस्टर डॉ. रवींद्र पण सर्जन असल्याने लेक व वडील खूपच समजूतदार आहेत. हि घटना कोणाच्या तरी गाडी वर हात साफ करण्याच्या हट्टापाई……..आम्ही सर्व भोगतो आहोत.

सारिका खोत – खुप वाईट झालं.

महेंद्रजी, तुमची मच्छर दाणीतील कुजबुज तिला फार आवडलेली पोस्ट होती. आताच्या सुट्टीत पण तिने भेटल्यावर मला सर्व ब्लॉग परिवार बद्धल आवर्जून विचारले होते. ती आपल्या सर्व ब्लॉग्स ची नियमित वाचक होती. तिच्या प्रतिक्रिया कधीही मला हि नव्हत्या मी विचारले तर म्हणाली होती…… ब्लॉग मित्र मैत्रिणी इतके छान लिहितात कि मी एकेक पोस्ट सर्वांच्या वाचत असते.

योगेश मुंढे – अनुजा ताइ…खुप वाईट झालं…देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो….आपल्या सर्वांच्या दुःखात आम्ही सामील आहोत….परमेश्वर आपणास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

Akhil Joshi – ध्यानीमनी असा काही नसताना असा आघात पचवण किती कठीण असत नाही? तुमचे दु:ख तर फारच आकस्मिक आहे… त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

सारिका, कांचन, साबा, योगेश….
आपल्या सर्वांच्या भावना ह्या आम्हाला निश्चितच खूप आधाराच्या आहेत. आपण सर्वाना भेटण्यासाठीच आज आले. आनंदात तर आपण एकत्र आहोतच पण एकमेकांचे दुखः सुद्धा वाटून घेतो. हीच भावना आपल्याला एकमेका करता ओढीने सतत एकत्र ठेवते.
श्रेया रत्नपारखी – हे फारच भंयकर आहे. काय लिहावे कळत नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला यातून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती मिळावी ही सदिच्छा.

श्रेया,अखिल,

वाहतुकीच्या गलथान कारभार मुळे, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, नियमांचे सहज उल्लघन ह्या मुळे जीवित हानी होऊन व्यक्ती, कुटुंब व समाज ह्यांचे अपरिमित नुकसान होते. पुणे, कोल्हापूर. कराड च्या सर्व मुख्य वर्तमान पत्रात हि बातमी आलेली होती. आजची माझी पन्नासावी पोस्ट हि असणार…. असे वाटले पण नव्हते. बझ्झ वर तर आहेच पण पोस्ट पण टाकते कारण तिच्या अनेक थिसीस चा उपयोग अभ्यासाकरता कोणाला तरी झाला तर खरी ओवाळणी झाली.

आजचा बझ्झ म्हणजे पोस्ट म्हणून टाकणार आहे. पुन्हा हे सर्व टाईप करणे शक्य नाही. तिच्या थिसीस ची लिंक अभ्यासूना, विद्यार्थ्यांना…..जरूर पाठवा. हीच आपल्या सर्वांकडून डॉ न सदभावना ठरेल. मंजीरीचे थिसीस परिपूर्ण ज्ञान आहे जे कधीच व्यर्थ जाणार नाही…

माझी पन्नासावी पोस्ट तिच्या साठीच……

श्रावण मासी हर्ष मानसी…………

अजूनही आठवणारी हि छान कविता!!! कविता म्हणायचे का? निसर्गाचे गाणे का? मनाचा आवाज!!! हा संभ्रम कधी पडलाच नाही. शाळेत ओळख झाली आणि जीवनाचे गाणे हे प्रत्येक टप्प्यावर जाणवू लागले. बालपणीचा रम्य काळ हा ह्या श्रावणाच्या अनेक दिवसांशी घट्ट पणे अजूनही नाते जोडून आहे. श्रावण हा सर्वांशी निगडीत असा आहे. चातुर्मासाच्या ह्या कहाण्या आज्जी च्या भोवती रुंजी घालू लागतात. नात का नातू हा भेदभाव नाही, श्रावणात आजी चे राज्ज्य असायचे आणि आई सर्व गोष्टी काटेकोरपणे अमलात आणायची.

श्रावण महिन्याचा पहिला दिवस कोणत्या वारी येतो ह्या करता कालनिर्णय पाहत नव्हते तर श्रावण प्रथम दिवसा ची चर्चा, हितगुज घरी केंव्हाच सुरु झालेले असायचे. आषाढ महिन्याचा प्रथम दिवस हा ‘मेघदूत’ म्हणून साहित्यात बराच परिचित आहे. आषाढी एकादशी, आषाढ अमावस्या ह्या पुढे घरी फारसा सहसंबंध आषाढ महिन्याशी नव्हता. कौतुकाचा, मायेचा, व्रतवैकल्याचा, देवळात खूप वेळा जाण्याचा हा एकमेव महिना म्हणजे श्रावण आला….श्रावण आला.

श्रावणात जेवणाची गम्मत काही औरच असायची. रोज कुठल्यातरी देवाचा वर असतो आणि त्या प्रमाणे जेवण केले जायचे. सोमवारी शंकर देव ते शनिवारी हनुमान इथपर्यंत चंगळ, रविवारी काय बेत असायचा ते मात्र आता अंधुकसे पण आठवत नाही. परिचित, नातेवाईक , स्वतःच्या घरी नेहमी पूजा असत. नवीन कपडे, नटणे, सजणे म्हणजे धम्माल!! असे समीकरण दृढ होते. हा महिना म्हणजे होली मंथ का? असे आताच्या पिढीला समजावून सांगावे लागते.

निसर्गाच्या बदलाप्रमाणे आहार, विहार, विचार ह्यांना सुसंगत अशी जीवन शैली बनविणे म्हणजे श्रावण. हा महिना बऱ्याच जणांकडून मांसाहार , आणि मद्य वर्जित करून पाळला जातो. खूप जणांना हा महिना जवळ आला कि धस्स होते कारण महिनाभर भाजीपाला खाऊन दिवस ढकलणे कठीण होते.

श्रावणातील जिवत्या, घरातील पूजेचा मस्त सुगंध, पुरणपोळी, पापड कुरडया,अळूवड्या ह्या ह्याच दिवसात छान वाटतात. जसे दिवाळीतील फराळ दिवाळीतच मस्त वाटतो. असा हा श्रावण कोणाला हवासा, कोणाला नकोसा वाटतो. आता ह्याच दिवसात फक्त देव असतो का? तो आपल्या मनात कायम असावयास हवा तरच मनाचा श्रावण सगळीकडे हिरवळ दाटे चोहीकडे असा निसर्गाने परिपूर्ण असलेला अनुभव देता होईल.

श्रावणाची प्रकर्षाने आठवण होण्याचे कारण कि मस्कत मध्ये होली मंथ ‘रमादान’ च्या खुणा जाणवायला लागल्या आहेत. आपल्या भारतीय शाळा सुद्धा एक तास आधी सोडतात. अरेबिक शाळांना तर सुट्टीच असते. ऑफिस मध्ये ओमानी लोकांना सुट्टी नाहीतर अर्धा दिवस काम ठेवतात. दिवसभर बाहेर कुठे हि खाण्यास मिळत नाही. काही हॉटेल मध्ये पार्सल दिले जाते पण तिथे बसून खाण्यास बंदी आहे. येथे दिवसा मोकळ्या जागी तुम्ही खात असाल तर तुम्हाला कायद्याने शिक्षा आहे. संध्याकाळी ‘अजान’ म्हणजे प्रार्थना झाल्यावर मात्र जवळ जवळ रात्रभर ओमानी कुटुंबीय समुद्र किनारे, बागा इत्यादी ठिकाणी जमून एकत्रितपणे होली मंथ चा आहार घेतात. मॉल मधून फार मोठ्या प्रमाणात सेल असतात, ते सुद्धा रात्री खूप वेळ चालू असतात.

दिवसभर प्रचंड शांतता जाणवते. येत असतो तो फक्त दिवसभरच्या त्यांच्या प्रार्थनेचा आवाज, तो पण ऐकावासा वाटतो कारण आंम्ही सुद्धा त्यांच्या देवाला सुद्धा मनोमन नमस्कार करतो. ओमानी संस्कृती भारतीय संस्कृतीला आदर व्यक्त करते. होळी, गणपती सार्वजनिक पणे साजरा करण्यासाठी इथे खिमजी कुटुंबीयांनी मोठी मोठी दोन देवळे बांधलेली आहेत. त्या ठिकाणी मनसोक्त सण साजरा करता येतो. परिचयात नवविवाहित जोडपे असल्यास आम्ही येथे मंगळागौर सुद्धा मैत्रिणी एकत्रित पणे येऊन साजरी करतो. शंकराच्या मंदिरात आवर्जून जातो.

भारता पासून दूर राहूनही जेव्हढे म्हणून करता येईल तेव्हढे मनापासून सण मनापासून साजरे करतो. कालनिर्णय पाहत बेत बनवतो. आईच्या घरातील ‘तो तिच्या पदराचा’ श्रावणी दरवळ इथून मिळतो का याचा खटाटोप करतो. पण मन मात्र हिरवळ होऊन कधीच सैह्यांद्री च्या कुशीत सामावले गेले असते.

निसर्गातील ताजेतवाने पणा, मनाची प्रसन्नता, आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावण असणे होय. समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्या करता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला एक छोटासा ब्रेक दिला आहे. विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा हि पोषक पणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. शेतकऱ्याला सन्मान व प्राण्यांना आराम मिळण्यास जणू काही श्रावण येत राहतो.

असा श्रावण पोथ्यात शोधून त्याची पारायणे करण्या पेक्षा आधुनिक जीवनाशी सांगड घालून जीवनभर नुसता………. आला ग वनी, असे न म्हणता ………आला ग मनी असे झाले तर श्रावण वाळवंटात पण अनुभवता येतो. घराघरातील दरवळ समुद्रा पलीकडे पण पोहचवतो.