परवा अजिंक्य ला सर्वपित्री म्हणजे काय ते सांगत होते. आकाशात आपले मृत्यू झालेले आप्त ह्या दिवशी मुक्त संचार करत असतात. ते ‘आत्मा’ ह्या स्वरुपात असतात. सर्वपित्रीला त्यांना जेवण ठेवतात. ह्या गोष्टीना पुरावा काही नाही परंतु ह्या दिवसा करता आमच्या लहानपणापासून भीती घातलेली होती. असे काही नसते, समजावून पण सांगत होते. कितीही न पटले तरी त्याचे चौदा वर्षाचे वय अशा गोष्टीत रमते. सध्या सी आय डी सारख्या सिरीज आमच्या कडे भक्तिभावाने बघणे होते. खून कसा झाला? का केला ह्या पेक्षा तो कसा शोधला हे खूप आवडते.
माझ्या लहानपणच्या गोष्टीत बाळ रमत गेले, बघता बघता रात्र झाली. जेवणे होतात न होतात तोच साडे आठ च्या सुमारास चक्क लाईट गेले. इथे हा अनुभव जवळ जवळ नाहीच. त्यामुळे घरात टोर्च पण एखादीच… सतत लाईट असल्याने इन्व्हरटर पण माहित नाही. मेणबत्ती चे दिवे गेल्या वर्षीचे दिवाळीचे घरात होते म्हणून बरे. हळू हळू अजिंक्य सोफ्यावर माझ्या जवळ जवळ सरकत होता.
आमच्या लहानपणीच्या अंधारात आम्ही कसे कसे वागायचो ह्या गोष्टीना सुरवात केली. घरात रात्री चिमणी, किंवा कंदिलाच्या उजेडात सर्व कुटुंब एकत्र बसायचो. आई रामरक्षा म्हणण्यास सुरवात करायची. आईचा शांत, अंधाऱ्या रात्रीतला एका लयीत येणारा गहिरा उच्चार पण किती आश्वासक असायचा.
‘चिमणी’ च्या उजेडात तिने केलेला गरमगरम स्वयंपाक. ताटात पोळी वाढताना मेणबत्तीचा तिच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश, राजा रवी वर्मा च्या चित्रासारखा वाटायचा. तेंव्हाच्या काळात सारखे लाईट जात नसायचे पण एकदा गेले कि खूप वेळ येत नसत. मग सोसायटीच्या गच्चीत आपल्या गाद्या, उशा घेऊन घरातून प्रत्येक जण यायचा. आई कधी यायची नाही ती छोट्या बहिणीला घेऊन घरात. मी, भाऊ आणि बाबा गच्चीत.. सगळे जमत मग काय अंधाऱ्या गच्चीत पण चांदण्याच्या उजेडात भुतांच्या गप्पांना जोर येत असे. तेंव्हा आम्हाला पण सकाळची शाळा होती पण आठवत नाही कधी ह्या गोष्टीचा कोणी बाऊ केल्याचे.. कसे मस्त होते ते लाईट चे जाणे.
माझ्या लहानपणी ब्ल्याक आउट होत असे. पोलिसांचे सायरन वाजायचे… पाकिस्तानी हल्ले होत. अशा वेळी वडील मिलिटरी मध्ये इंजिनिअर म्हणून काही काळ होते, त्या जीवनाचा त्यांना अनुभव असल्याने लाकडी खिडकीच्या काचांना काळा कागद आमच्या कडे बरेच दिवस टिकून होता, भीती कधी वाटली नाही पण लाईट आले आणि संकट टळले म्हणून निदान निम्म्या ठाण्यातून तरी उत्साहाच्या आरोळ्या ऐकू येत.
भावाचा ‘राजू’ चा चेहऱ्यावर टोर्च चा उजेड पडून भुताचा चेहरा आम्हाला दाखवायचा हा उद्योग व्हायचा. धाकटी ‘अंजू’ किंचाळली कि, हा टोर्च फक्त बाबा सांभाळायचे. मग वडील कॅरम काढायचे. अहाहा, मेणबत्ती चा प्रकाश बोर्ड वर पडला कि, राणी सोंगटी पण कशी लाल व्हायची. मुद्दामहून कॅण्डल लाईट डिनर, असे अंधारात खेळणे ह्या करता कुठेलेही हॉटेल, किंवा क्लब लागत नव्हते कारण तेंव्हा इन्व्हरटर नव्हते. आज गावाकडे सुद्धा अशी धम्माल कमी होत आहे असे वाटते. पत्ते तर आई लवकर ये न….. अशी आरोळी ठोकून वाटण्यास सुरवात करायचो.
रात्री ‘रम्मी’ खेळण्यास खूप मजा असते, दुपारी बदाम सात ठीक असे माझे पत्त्यांच्या खेळाबाबत काही ठोकताळे आहेत. ‘रम्मी’, ‘गाढव डाव’… खेचा खेचीचे,अडवणुकीचे खेळ खेळताना लबाड, चिंता हे भाव मेणबत्तीत अधिक ठळक उठून दिसतात. ‘बदाम सात’ कसा वामकुक्षीचा खेळ दुपारीच बरा असो, असा डाव रंगत जात असे. मेणबत्ती च्या उजेडात सावल्यांचा खेळ तर जोशात यायचा.
घरातील सर्व सदस्य निरनिराळे आकार भिंतीवर करून दाखवायचे. दिसते तसे नसते…भासमान खेळ आहे ह्या जाणीवे बरोबर हि पण एक कला आहे हे हि आवर्जून वडिलधाऱ्या कडून सांगितले जात असे. ह्या खेळात कुत्रा. हरण, ससा असे आकार भिंतीवर खूप छान दिसतात.
जस जशी रात्र रंगत जात असे तसा दिवसा आणि रात्री चालणारा गुढमय खेळ प्लांचेट मांडले जायचे. अर्थात त्याला हि सभ्यता असायची रात्री म्हणे आत्म्यांना बोलवायचे नसते, ते परत जात नाही. मला स्पष्ट आठवते, कि कोणीतरी मुल खाणारी हडळ घरी येते, म्हणून दारावर श्रीराम हे आम्ही त्या अफवेला घाबरून लिहिले होते. वडील आणि आई हे खोडून काढत पण वातावरण असेच असल्याने आम्हीही भरकटले जात असू.
अंधारात गच्चीच्या सज्जात हळूच सटकत असू, आधीच चमूची टोळी जमलेली असायची, मग तो काचेचा ग्लास, कोरा कागद. त्यावर ‘हो’ ‘नाही’ असे दोन वर्तुळे…सर्व काही दाखवून लहान भावंडाना थरथर करायला लावत असू……मग आमची आठवडाभर कामे कशी अलगद त्यांच्या कडून पूर्ण केली जायची. कामे कसली तर….. पेन्सिलीना टोक करून ठेवणे, पेनात शाई भरून ठेवायची…. तेंव्हा रविवारी अंघोळ करताना केस धुणे हा कार्यक्रम प्रत्येक घरी होत असे.. त्याच रविवारी पेन साफ करून ठेवणे हे काम प्लांचेट पहिल्याने भावंड करत . आईच्या लक्षात आले कि, काय बोलणी बसत असत. अंधारात कशाला कडमड करता? अशी दटावणी पण मिळे . तरी पण हे उद्योग काही थांबविले नाहीत. बर रात्री खरे प्लांचेट कधीच करत नसू कारण मनात आम्ही पण टरकलेले असायचो आत्मा परत गेलाच नाही तर… त्यातल्या त्यात आजीला बोलवायचो ती काही त्रास नाही देणार म्हणून..पण लाईट गेले कि खोटे प्लांचेट मांडून कोणी ताईगिरी, दादागिरी करण्याची संधी म्हणजेच अंधार…
आता लाईट गेले कि, एका मिनिटात इन्व्हरटर घर पुन्हा प्रकाशमान होते. अजूनही गावी कंदिलाची मजा, कंदील, चिमणी साफ करणे केरोसीन घालून नीट ठेवणे किती होते कोणास ठावूक कारण घरोघरची अंधाराची मजा आता इन्व्हरटर ने घालवली. घरात सदस्य कमी झाले. बिल्डींग मधले सगळेच माहित असतात असे नाही. ह्या शोधामुळे फायदे हि खूप झाले पण अंधारातले लहानपण कुठेतरी हरवत चालले.
अंधारात जाणवलेला वेध प्रकाशाचा… त्या जाणीवेत अनुभवलेले सात्विक भाव, खोडसाळपणा आमच्या ह्या छोट्या पिढीला समजावून सांगावा लागतो. अजिंक्यला सर्व धम्माल सांगताना हि पोस्ट तयार झाली कदाचित… हेच वाचून हि पिढी निदान व्हर्चुअल आनंद तरी घेईल.
गोष्टी सांगताना रात्र खूप झाली, वेध लागले होते सर्वापित्रीच्या गूढ रात्री नंतरच्या येणाऱ्या….. जागून काढलेल्या पुढच्या प्रकाशाच्या नऊ रात्रींचे.
.