घरोघरचे न्यूटन………

‘न्यूटन’ हा नामवंत प्रख्यात शास्त्रज्ञ, ‘गुरुत्वाकर्षणचा’ जगविख्यात शोध लावला.पण गाजला त्याच्या मांजरामुळे… कथा साधीच त्याच्या कडे मांजर होती. तिला पिल्ले झाली, ती पिल्ले आणि मांजर घरात ये जा करू लागली कि, त्याला कामात व्यत्यय येऊ लागला . मोठ्या मांजरीची उडी मारण्याची क्षमता पाहून त्याने दाराला मांजरी करता एक मोठा , आणि छोट्या मांजरी करता छोटा गोलाकार आकार केला. मांजरीने आणि तिच्या पिल्लांनी दार बंद असले तरी गोलातून त्याला व्यत्यय न आणता सहज ये, जा करावी. मांजरांचा आकार आणि त्यांची शारीरिक उडी मारण्याची ताकद ह्यांचे निरीक्षण करून आपला उद्देश पूर्ण केला.

तेंव्हा पासुन न्यूटन गाजला कारण मोठ्या आकारातून लहान मांजर पण गेले असते, अशा हास्यापद कोटया केल्या गेल्या आणि त्या तहहयात त्याला ऐकाव्या लागल्या असतील. नंतर हि ह्या कोटया जो पर्यंत पृथ्वी आहे तो पर्यंत राहतील असेच खेदाने म्हणावेसे वाटते. खर तर मांजरांच्या उडी मारण्याच्या क्षमते नुसार त्याने दोन उपाय केले.

आपण बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी मोठ्या क्षमतेच्या पण लहानांना चालू शकतील, असे असले तरी त्यांच्या करता लहान गोष्टी घेतो. सगळ्या बाबतीत असे म्हणता येणार नाही पण कधीतरी न्यूटन कुठूतरी हसत असेल. असे न्यूटन हे घरोघरी असतातच. लहानांना आणि मोठ्यांना हि न्यूटन ची बिरुदावली लावली जाते.

साधारण पणे घराचा पुरुष वर्ग ह्या बाबतीत स्त्रियां कडून भूषविला जातो. घरी जर इंजिनीअर असले तर, हे प्रमाण अधिकच असते. कंपनी मध्ये ज्या व्यक्ती मोठ्या पदांवर कामे करत असल्या तरी घरी मात्र जी गृहिणी असेल तिच्या कडून, एव्हढे साधे काम पण कसे अवघड करून ठेवतात असे बोलताना मनात, आणि हमखास मैत्रिणी बरोबर हे म्हणजे अगदी न्यूटन आहेत, असे नक्कीच बोलतात. मग तिच्या घराचा न्यूटन पण बोलण्यात कधीच ओढला जातो.

ह्या न्यूटन ची परंपरा आजी च्या पिढी पासून चालत आलेली असावी, कारण आजोबांच्या फजित्या सांगताना, आजोबांचा न्यूटन म्हातारपणी पण तरुण भासे. कधीतरी आईला गप्पा करण्याचा किंवा खट्याळ पण करण्याचा मूड आला तर बाबांचा किस्सा ऐकताना आम्ही मुले पण रमून जायचो. जणू काही रक्तातला गुणधर्म असल्यासारखा हा न्यूटन प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावून जातो.

जेंव्हा मुलाला शाळेत न्यूटन शिकवला गेला पण नसतो त्या काळात त्याला हा, न्यूटन होईल असेच वाटते अशी कोणीतरी सहज गंमत करून जाते. ज्या ठिकाणी डोके चालवून युक्तीने काम करावयाचे असते तेथे हा न्यूटन फजिती झाल्यास सगळ्यांना हसवतो. जगमान्य हा शास्त्रज्ञ मूर्खपणा पण हसत पचवतो आणि पुन्हा ह्यातून काहीतरी शिका असा नकळत संदेश देऊन जातो.

ह्या न्यूटन चा परिवार हा इंजीनियर पुरता सीमित राहिलेला नाही तर तो काळाच्या ओघात सर्व शिक्षणात पसरला. काय तुम्ही वकील हो, तुम्हाला कधी फसवले हे कळले पण नाही, अशा युक्तिवादापुढे हा वकील घरच्या कोर्टात हरतो. डॉक्टर ला मुलांच्या पोटातील कळ हे चाचपडून पहावी लागते पण, आईला ती खाण्यामुळे झाली का? किंवा अभ्यासामुळे आली का हे पटकन समजते. अशा दुखण्याने घरातील डॉक्टर हतबल होतो. लबाडी, मूर्खपणा, फसणे ह्या नकारात्मक घटना सकारात्मक कशा घ्याव्यात हे शेवट हसण्यात करून न्यूटन पण खुश होतो.

गुरुत्वाकर्षणाचा आकर्षित करण्याचा नियम, हा मानवी जीवनात पण फजितीला हसण्याकडे आकर्षित करतो. एकदा न्यूटन हि बिरुदी चिकटली कि, कायम कुठलीही गोष्ट करण्यास घेतली कि, सतर्क राहण्यास भाग पाडते आणि पूर्ण व्यवधानाने काम होऊन मन आणि बुद्धी ह्यांची फारकत होण्याचे टळले जाते. उत्तेजन जसे मिळते तशी न्यूटन ह्या नामांकनाची चीड पण कायम तयार होण्याची भीती पण मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेली असते. मुलां पुढे न्यूटन अशा पद्धतीने समोर आणू नका. न्यूटन च्या आयुष्यात ह्या मांजरी मुळे किती प्रवाद निर्माण झाले असतील हे त्यालाच माहिती असेल पण आपले मन मांजरी सारखे न्यूटन च्या गोष्टी मुळे होऊ शकते.

न्यूटन हा पुरुष वर्गाला सहज संबोधला जातो. पण स्त्रिया करता अशी ‘न्यूटनि’ ऐकिवात नाही. स्त्रियांना एकावेळी अनेक व्यवधाने हुशारीने पार पडण्याचे जन्मतःच कौशल्य प्राप्त असते. शक्ती पेक्षा युक्तीच्या बाबतीत ती निसर्गतःच अग्रसेर आहे. तरीही तिला, एव्हढे साधे पण कळले नाही असे ऐकायला लागते. कारण समाजातला न्यूटन हा स्वतःचा इगो सांभाळत असतो.

पुरुष आणि स्त्री ह्यांच्यात कोण न्यूटन आहे हे महत्वाचे नाही तर आपल्यातला न्यूटन, आपल्या मनातला न्यूटन, हा वरकरणी हास्यास्पद कोट्या करून हसवत हसला तरी, नकारात्मक घटनांना सकारात्मक करून घेण्याचे मन तयार करायला मदत करतो. मांजरी आणि न्यूटन ची हि घटना पूर्ण संदर्भ सहित मुलांना सांगा कारण त्यांच्यातला न्यूटन हा सशक्त मनाच्या बांधणी करता खूप गरजेचा आहे. न्यूटन च्या मृत्यू नंतर हि हा असा न्यूटन कालांतरित अबाधित राहून जीवनाचे आकर्षण कायम ठेवेल.

.

ओबामाच्या ओठांची जखम…..आणि पौगंड संवाद.

पौगंडावस्था हे नाव पण कस जीभ वळवून म्हणावे लागते. कुठलीही गोष्ट हि ह्या वयात खूप कळत असते असा अविर्भाव असतो. मोठ्या माणसा सारखे वागायचे असते पण वयाचा अल्प अनुभव भन्नाट विचारांची मंथने घडवत असतो. विचारांना योग्य दिशा हि नाही मिळाली तर भरकटण्याची शक्यता असते. ह्या वयाची मुले/मुली जास्तीतजास्त वेळ समवयस्क मंडळी बरोबर असतात त्यामुळे पालकांशी संवाद करण्याच्या वेळा कमी होतात. परदेशात मात्र हि मुले पालकांसमवेत जास्तीत जास्त असतात. त्यामुळे पालकांची जवाबदारी खूप वाढते. पालकांना पण खूप स्पष्ट आणि मैत्री पूर्ण राहावे लागते. अशाच वयातील हे काही संवाद….

—आई आणि तो
— अरे जरा मी बातम्या पाहते बर का? आज न ओबामाच्या ओठाला जखम झाली आणि बारा टाके पडले.
तो—- अग, आता ओबामा पप्पी कशी घेणार?
—-उडालेच!!!!
तो—–अमेरिकेच्या विमानतळवर पोहोचल्या बरोबर त्यांनी मिशेल ची पप्पी घेतली होती न.
—-हं!! ठीक आहे. लहान आहेस का पप्पी म्हणायला? पप्पी आई ची असते.
तो—–तेच म्हणतोय न, पप्पी कशी एक मिनिटात संपते, तशी होती.
—–अरे त्यांच्या कडे आनंद असाच व्यक्त करतात.
तो—–लांबलचक घेतात त्याला किसिंग म्हणतात. मी काय बोलयला चुकलो? उगाच बोलतेस हल्ली.
—-ठीक आहे. आज प्रोजेक्ट कुठला दिला तो करत बस.
तो——आज एड्स वर प्रोजेक्ट दिला. आता वांदे झालेत. —–नेट वर माहिती असते, त्यातील घे.
तो—– आई, ते न होण्याचे उपाय पण लिहायचे आहेत. नेट वरच्या साईट पाहत बसलो तर तू चीडशील. तूच सांग कसा पूर्ण करू?
—–बर बर मी बघते आधी, मग तुला सांगते,
तो—–मी काही उपाय आता सुट्टीत पुण्यात रस्त्यावर पडलेले पाहिलेत. तसंच लिहायचे का?
—–एव्हढे काही लिहायची गरज नाही. मुलांना ह्या आजाराबद्धल माहिती असावी बस.
तो—आई, फ्यामिली प्लानिंग करता पण ह्याच कॉमन अक्सेसरीज आहेत.
——ह्याचा काय संबंध?
तो—-अग. प्रोजेक्ट चार पाने हवा म्हणून पॉईन्ट वाढवतोय.
तो—- आई आम्ही आज वर्गात खूप हसलो, टीचर पण हसल्या.
—– काय झाले एव्हढे!!
तो— टीचर पर्स मध्ये आमचे पेपर ठेवायला विसरली, खूप वेळ शोधत होती, आणि म्हणाली—-मी रात्री प्रीकोशन घायला हवी होती. सॉलिड न मग काय वर्गात एकच हसाहसी झाली. आम्हाला वाटल प्रोजेक्ट तसा विचित्र आहे पण टीचर नि खूप हसवले.
—–झाल असेल विसरल्या असतील खरच. आपण प्रोजेक्ट बद्धल बोलूया का? काय काय मुद्दे तुम्हाला लिहायचे ते शाळेत सांगितले नाहीत का?
तो —उद्या सांगणार आहेत. तो पर्यंत आम्हीच विचार करायचा आहे.
—–ठीक आहे. आपण चांगल्या शब्दात लिहूया. मी माझ्या शाळेत पण हा विषय विद्यार्थ्यान बरोबर चर्चा करत असे. मी सांगते तुलाही समजावून मग लिही.
तो —-आज फेस बुक वर धम्माल येणार, आमचा प्रोजेक्ट.आणि ओबामा, सॉलिड वांदे झालेत त्याचे.
सगळे कसे सुटतील बघ.
आई, डोन्ट वरी मी बघतो. तुमच्या सारखे आता राहिले नाही. बाबा गावावरून आले कि, तू त्यांची दारात दृष्ट काढतेस. मी म्हणत नाही कि मी ओबमा सारखे करीन पण जरा तरी बदल न ग.
——-चल रे टोणग्या पळ आता.
विषय खरच सामाजिक जाणीवेचा होता पण ह्या वयातील मुलांना कळणे हि गरजेचे असते. सध्या टीव्ही माध्यमाने मोठे आणि छोटे वय ह्यांच्यातील अंतर फार कमी केले आहे.

दुसरा संवाद—

तो आणि बाबा. निवांत गप्पा करत होते.

तो—-बाबा, तू होस्टेल ला शिकलास न. तेंव्हा तु मुलीला प्रपोज केले होते कारे?
——आमचे होस्टेल फक्त मुलांचे होते आणि इंजिनिअर शिकायला कमी मुली असायच्या त्या सुद्धा अभ्यासू.
तो——तुला कोणीच भेटले नाही???
( लेकाच्या चेहऱ्यावर भला मोठा प्रश्न, आणि बाबांचे डोळे आईकडे रोखले होते.)
—–तसं काही नाही होत्या तशा दोन चार बऱ्या पण अरे अभ्यास एव्हढा होता कि वेळच मिळत नसे.( बाबांची सारवासारव)
तो—-मग काय बाकी काही विचारायला नकोच.
——अरे विचार दुसरे काही. मी पण आई सारखे सगळ छान सांगू शकतो.
तो——तसं नाही रे. पहिला प्यार, तो पहिलाच असतो. तूला काय प्यार चा काहीच अनुभव नाही.
——-प्यार काय लग्न ठरल्या नंतर पण होते. मला तुझी आई आवडली म्हणूनच मी तिच्याशी लग्न केले न.
तो—–तुझ काय अरेंज लग्न होत. मी पाहतो न, तू खूप वेळेला नेट वर असतोस ऑफिस चे काम करत, आणि आई शेजारी बसून पुस्तक वाचत असते. लाईफ असे बोअरिंग करू नका रे.
——बच्चमजी, म्हणत बाबांनी लेकाचे गाल ओढले आणि म्हणाले.—–लाईफ नुसतेच प्यार प्यार नसते… काम पण करावे लागते.

तिसरा संवाद—

तो आणि त्याचा मित्र.

तो—– अरे यार बातम्या बघतोय. आपण इथे परदेशात पण तिकडे भारतात अजून कसाब ला फाशी नाही. वाटत जाव आणि धाडधाड गोळ्या घाल्याव्यात.
——-मला तर ह्या सगळ्या पॉलीटीशन न घरी पाठवावेसे वाटते. इतके वर्ष नुसते पोलिटीक्स शिकतो पण हे बदलत नाही.
तो—–मनसे चा राज काय भारी दिसतो रे! मला तर आवडतो. तुला कोण आवडत?
——- तोच बरा आहे रे, स्मार्ट आहे. कुठे काही जमवलाय का रे त्यांनी? माहिती आहे का तुला?
तो—–कल्पना नाही पण सीधासाधा वाटतो. अजून त्यांनी त्यांच्या पार्टीत सॉलिड हिरोईन घेतली नाही मग बघ कसा बकरा होतो.

असेच भरभरून बोलतात. प्रेम विषय असो नाहीतर राजकारण, घरातील नाते संबंध ह्यावर पण त्यांची मते तयार होत असतात. हेरी पोटर पासून ते प्रत्येक विषयात ते समरस होतात. जागरूक राहण्याची सवय पालकांना करून घेण्यास हवी. ओबमा ते गांधीगिरी हे विषय पण समान पातळीवर बोलले जातात कारण अपरिपक्व मनाची बांधणी होत असते. कधी मजेशीर तर कधी अंतर्मुख करण्यास हि मुले पालकांना भाग पाडतात. समाजाभिमुख एकटे जाण्यासाठी भक्कम आधार तर, कधी मित्रत्वाचा हात आणि सगळ्यात महत्वाचे पालकांचा मायेचा स्पर्श आपली पुढील पिढी हि जागरूक, समजदार करेल

छोट्याशा पोस्ट मधून पौगंडावस्था उलगडून सांगणे अवघड आहे. हा छोटासा प्रयत्न पण सुजाण पालकांना निश्चित आवडेल.

ढ……ढ……..ढगांचा

बाराखडीच्या ओळीत येणारा ‘ ढ’…… हा वर्गातील ‘ढ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलाचा पण असतो हे कळण्याचे ते बोबडे वय नसते. आईने दाखवलेला ढ……..म्हणजे ढगाचा. आकाशात खूप दूर असणाऱ्या ढगाचा. आई, इतक्या दूरचे दाखवते कि, बाळाचा ढगा कडे बघताना ‘आ’ होतो आणि हातातला घास भरवला जातो. ‘ढ’ शब्द तसा लिहिण्यास सोप्पा आणि जेंव्हा चित्रकला सुरवात होते तेंव्हा तर ढगाचे चित्र ढगा सारखा कापूस बोळा घेऊन कागदावर धबाधब ढग काढणे सुरु होते. मग हात कालांतराने स्थिर होतो आणि आडव्या रेषेवरचे गोल गोल काढलेले ढग पानभर हसू लागतात. त्यांनाच चेहरे काढण्याचे शिकवले जाते आणि खेळ सुरु होतो ढगातून आकार शोधून काढण्याचा हा एक उद्योगच होतो.

ढग कसा निर्माण होतो हे शाळेत हळू हळू कळते. प्रत्येक आवडीला स्वःताचे एक वय असते. कुठल्या तरी वयात ढग बघण्याचे वेड लागते. नकळत गच्चीत, ग्यालरीत जाणे झाले तरी आकाशाकडे एक नजर टाकली जाते. अचानक भावंडाची हाकारी सुरु होते, लवकर या आणि बघा काय अफलातून आकार तयार झाला आहे. कधी ससा, तर कधी राक्षस, पऱ्या, पक्षी अशी विविध मनोरूपे ढगात दिसू लागतात.

बालपणीच्या राज्यात ढगात परी असते, देवबाप्पा तर ढगात असतो. चांदोमामा आणि ढग यांचा पाठशिवणीचा खेळ तर भल्या भल्या लोकांना सुद्धा मोहवितो. कधी एखादी सुरेल तान चंद्राचे ढगातून डोकावणे प्रेम व्यक्त करते तर, कधी तान्हुल्याला आनंदित करते. ‘कभी तनहाहियो मे हमारी याद आयेगी’…असे ढगातून नटी पृथ्वीकडे पाहते तेंव्हा ढग पण व्याकूळ दिसतो.

ढगाचा खेळ हा मनाच्या अनेक प्रक्रियांचा आलेख आहे. एखाद्याला एखादा आकार दिसला तर तोच शेजारी असलेल्याला दिसेल याची खात्री नाही. कधी ढग उडणारा पक्षी वाटतो तर तोच ढग क्षणात अक्राळविक्राळ रूप धारण करतो. या मध्ये सुद्धा पांढरा ढग हा छान आकार दाखवतो तर काळा ढग हा चंद्राला गोरे करतो आणि सूर्याला झाकून टाकतो. मन पण असेच काळे गोरे होते. संध्याकाळचे ढग तर सूर्यास्ताची मजा काही और करतात.

ह्या ढगांची तुलना आपण आपल्याबरोबर केली. ढगात गेला…..ढगासारखा दिसतोयस……..ढगात नेतो काय?…….ढगात जाऊन बैस…… ढगात तरंगू नकोस ह्नं…….ढगोब्बा आणि अग्गबाई!!!! ढग्गुबाई!!!!…….. ढगात वार करू नकोस…. ढगासारखे कपडे का आहेत….पोटात ढगासारखे गुडगुडते…. असे आणखी बरेच काही. मित्रांच्या यादीत एखादा तरी ‘ढग्या’ असतोच. तर मैत्रीणीत एक तरी अगदी ‘ढग्गुबाई’ असतेच. मोठ्यांची मजा मोठ्यांना आणि लहानपणाला मात्र ढग्गुबाई चे गीत ताल धरायला लावते. आहे? कि नाही? ह्या ढगांचे आणि आपले नाते.

काही दिवसापूर्वी मी भारतातून मस्कत ला परत आले. दरवर्षी पावसाळ्यात जाणे आणि येणे त्या मुळे ढगांच्या वरून विमान गेलेले कळत नाही पण ह्या वेळी मात्र मी विमानाच्या खिडकीतून खाली असलेले ढग मनसोक्त पहिले. ढगांच्या दुलईत उतरून गुढगाभर पाय रोवून चालावेसे वाटले. खाली डोकावून मला ढग दाखवणारी माझ्या घराची ग्यालरी शोधावी असे काहीसे झाले होते. जमिनीवर पावसाळी वातावरणात ढगातून खाली येणारे इंद्रधनुष्य मला ढगात आई कडे नेणारा जिना वाटतो.

मनाची पण गम्मत ढगासारखी आहे, कधी गोरी परीसारखी तर कधी काळ्याकुट्ट ढगांसारखी. हेच काळे ढग पाहून मात्र मोर आणि बळीराजा सुखावतो. कोणाला हे ढग दिलासा देत असतात तर कोणाला वादळाची भीती घालतात. ढगांचे हे गूढ पण रम्य नाते भारतातच पाहण्यास मिळते. वाळवंटात रात्री ढग हे कोरडे वाटतात आणि दिवसा उन्हामुळे हे दिसेनासे होतात.समुद्र किनाऱ्यावरून, किल्ल्यावरून आणि शेतातून शेतकऱ्याने ढग धुंडाळणे हे जावे त्या ढगांच्या गावा तेंव्हाच कळते.

ढगा मधला चंद्र ईद ला व्याकूळ करतो तर ढग दूर झालेला आणि दिसलेला चंद्र हा पती दर्शनाचे पुण्य विवाहितेला देतो. धार्मिक बाबतीत पण मौल्यवान असणाऱ्या चंद्राला ढगाला दूर होण्याची विनंती तर करावी लागत नसेल. असा हा ढग आयुष्याच्या कुठल्या तरी आकाशात दिसत असतो. ढग जेंव्हा विहार करतात तेंव्हा ते रिकाम्या पोटी असतील तर मनोरम्य वाटतात. मात्र काळ्याकुट्ट ढगांचे पाणी ओतप्रत भरून एकमेकांवर आपटणे हे विजेची ललकारी देते. कधी कधी हाच ढग फुटून हाःहाकार करतो. अनेकांचे प्राण घेतो, होत्याचे नव्हते करतो.

ढगांचे प्रकार भूगोलात शिकण्यास मिळतात. ढगांचे वर्गीकरण वातावरणाच्या टप्प्यानुसार केले जाते. शास्त्र विषयात सुद्धा फार मोठा व्यापक अभ्यास ढगांचा आहे. ढगांचा अभ्यास हा प्रकाश, हवा आणि तापमान ह्या घटकांशी जोडलेला आहे. प्रत्येकाचा मराठी शब्द नीटसा आठवत नाही म्हणून इंग्लिश मधील ढगांचे वर्गीकरण कल्पना यावी म्हणून देत आहे.

ढग न्याहाळणे हे प्रत्येकाने अनुभवलेले असतेच आणि हाच अनुभव आपल्याला मनातील विचारांचे ढग दूर करण्यास किंवा विचारांच्या ढगात नेमकेपणा बघण्यास शिकवतात.

ढगांचे आणि आपले नाते उलगडून दाखवण्यासाठी हे ढगू विचारांची हि पोस्ट आता मात्र ढगासारखी पसरू लागली आहे. तेंव्हा ढगांचा हा विहार येथेच थांबवते.

किल्ल्यांची दीपावली …… सकाळ समूहाची स्पर्धा किल्ल्यांची

सहा वर्षांनी भारतात दीपावलीला असण्याचा योग जुळून आला. अजिंक्यने लहानपणी पाहिलेली दिवाळी विसरून गेला होता. पुण्यात राहणे म्हणजे किल्ले स्पर्धा पाहणे हे निश्चित केले होते. सोसायटीच्या अंगणात एक कोपरा कायम किल्ल्या करता राखून ठेवलेला असायचा. प्रथम किल्ला कुठला करायचा हे ठरवले जायचे. आमचं काळी काही नेट नव्हते ना झेरॉक्स चे मशीन होते. किल्ल्याचे चित्र इतिहासाच्या पुस्तकातून शोधून काढायचो. मग त्या नुसार दगडांची निवड, दगड दुसऱ्या ठिकाणाहून चोरून आणायचे, मग माती गोळा करून किल्ल्यावरची चित्रे गोळा करायचो.

ज्याच्या कडे शिवाजी असायचा त्याला काही काम नाही बाकीचे सर्व मावळे हा समजूतदार पणा मनात चिडचिड करत जपून ठेवायचे. मातीवर पेरण्यासाठी अळीव दुकानातून आणले जायचे. हात, पाय कसे मातीमुद्द होत असत. घरातील मोठ्यांकडून किल्ल्याचे परीक्षण केले जायचे. विहीर आणि शेत हा अविभाज्ज घटक त्या मध्ये असत. हि विहीर कोणी कशी केली आहे हे पाहण्यासाठी रात्री दुसऱ्या वाडीत किंवा सोसायटीत हळूच चोरून जात असू आणि आपली कशी अधिक चांगली करता येईल यावर फार मोठी खलबते होत.

विहिरी करता एक प्लास्टिक डबा प्रत्येकजण घरातून आणायचा त्यातील सर्वानुमते निवडून मातीत खड्डा करून डबा त्यात ठेवून पाणी भरले जायचे. सुई दोऱ्याच्या रिकाम्या रिळाचा उपयोग रहाट करण्यासाठी केला जात असे. प्रत्येक गोष्ट घरातून आणली जायची आणि त्याचा कल्पकतेने विचार करून किल्ला सजवला जायचा. हुबेहूब परिसर करण्यात जो तो मेहनत करत असे. तेंव्हा किल्ल्यांची कुठलीही स्पर्धा वैगरे नसायची. आम्ही सर्व जण एकमेकांचे किल्ले बघायला जात असू आणि मोकळेपणाने दुसऱ्या किल्ल्याचे कौतुक पण केले जायचे.किल्ल्यावरची भुयारे, चोर दरवाजे, शत्रू करता केलेले खंदक, किल्ल्यावर जंगलात असणारे प्राणी… यात वाघ, सिंह यांना वरचढ मान असे. हळूच डोकावणारे ससे… किती किती रचना ह्या शिवाजीमय बनवायच्या. चार फुटात महाराजांचा किल्ला बनवण्यासाठी सोसायटीतले चाळीस जण मावळे पण दमत असू. संध्याकाळ झाली कि उद्याच्या कामाचे वाटप ठरवत असू. झोप कधी लागायची पत्ताच लागायचा नाही.

किल्ला नंतर फटाके त्या मध्ये ठेवून उडविला जात असे मला हि कल्पना फार दुखःदायक असायची.पण सोसायटीतील टारगट मुले काही केल्या ऐकायची नाहीत. मग आई मला घरात ओढून नेत असे. तो दिवस किल्ला का मोडला??? म्हणून रडण्यात घालवला जायचा. पुढच्या वर्षी आपण आपल्या घराच्या ग्यालरीत किल्ला करू मग तू तो कायम ठेव असे वचन मला बाबा द्यायचे पण त्यात मज्जा ती काय?? सोबतच्या सर्वांसहित किल्ला करणे हेच तर खरे अप्रूप आणि सोहळा असायचा.

किल्ले म्हणजे दीपावली हे दृढ समीकरण होते. किल्ल्यांचा आणि दीपावलीचा काय सहसंबध असा प्रश्न मला अजिंक्य ने विचारला. ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. आम्ही लहानपणापसून करायचो म्हणून तुला पण हे समजावे ह्या करता आपण किल्ल्यांची स्पर्धा पाहायला जाऊया असे बळेबळे तयार केले.

किल्ल्यांचे सादरीकरण हे मुळी एक प्रोजेक्ट होते. त्याची मोजमापे, त्यावरची हुबेहूब रचना दरवर्षी आम्ही हातानी केली त्यामुळे आम्हाला इतिहासाचा कंटाळा येत नाही आणि अजूनही जसेच्या तसे आठवते. आम्ही शिवाजी राजे आणि मावळे वर्षानुवर्षे कागदात फक्त पुढच्या वर्षीच्या किल्ल्या करता जपले नाहीत तर आम्ही प्रत्यक्ष किल्ले जगलो. असे लंबे चौडे भाषण मी अजिंक्य ला सुनावले. शेवटी नको नको करत आमची जोडी किल्ले स्पर्धा बघण्यास गेली.


पुणे आणि किल्ले यांचे समीकरण आहेच त्यात हि स्पर्धा सकाळ समूहाने ठेवली होती. पालकांचा पण क्रियाशील सहभाग असायला परवानगी होती. नवीन मराठी शाळेत हि स्पर्धा होती. शाळेच्या दरवाजावरच छान असा शिवकालीन दिंडी दरवाजा केला होता. ढाल, तलवार यांच्या द्योताकासाहित भव्य अशी भवानी माता पाहून मन कधीच शिवरायान पाशी पोहचले. अजिंक्य हि ते वातावरण पाहून रमला होता. मला सार्थकी वाटले.

पुढे छान अशा मेण्यात शिवाजी राजे बैठक करून बसले होते. पारावर मेणा होता. त्यापाशी आई वर्ग ठिय्या ठोकून बसला होता, आम्ही विनंती केली, आम्हाला फोटो काढायचे आहेत जरा उठता पण आमचे म्हणणे त्यांच्या कानावर पडले नाहीच शेवटी तसेच फोटो काढले. मी अजिंक्यच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे टाळले. पण त्याने विचारले, आई ह्यांना रिस्पेक्ट देता येत नाही का?? माझ्या मागे परदेशी नागरिक होते, मी मागे वळून पहिले तर ते त्रस्त चेहऱ्यानी पुढे निघून गेले.

मैदानात सहभागी किल्ल्यांचा लक्षणीय आकड्यात प्रतिसाद होता. जणू काही शिवरायांचे किल्ले अंगण लुटुपुटूची लढाई, मोहिमा पार पडण्यास सज्ज झाले असावे. रायगड, राजगड, जंजिरा….. अनेक किल्ले आपापली जागा लक्ष वेधून घेत होते. कोणाचा खापरी लाल रंग, कोणाचा कडक शिष्तीचा करडा रंग, तर काळाकभिन्न रंग कणखर महाराष्ट्राचे वैभव लेऊन खाणाखुणा जपत होता. गडावर बाजारात मिळणारे मातीचे मावळे आणि आजूबाजूची गावठाणे खूपच छान वाटत होती. छोट्या छोट्या किल्लेदारांची उपस्थिती दुसऱ्या दिवशी नव्हती त्यामुळे मालक किल्लेदारविणा परिसर सुना सुना वाटत होता.

किल्ले बनण्यासाठी प्रसिद्ध इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन मुलांना दिले गेले होते. कल्पना खरच चांगली होती पण दोन दिवसांनी त्या किल्ल्याच्या रचनेला तडे जातात, त्यावर परिसराचा कचरा पडतो. प्रदर्शनाच्या वेळी तेथील मुलांचे समालोचन असावयास हवे, आम्ही आळीपाळीने वेळा वाटून आमच्या किल्ल्याचे संरक्षण करत असू. पानिपतची लढाई त्याचा लाईट आणि म्युझिक शो पण ठेवला होता. मग जी स्पर्धा आपण मांडली त्याचे चित्रीकरण दाखवावे. एखादे मूल हे पाहून प्रेरणा निश्चित घेवू शकेल.


सध्याच्या काळात रेडीमेड किल्ले मिळतात. त्यावर मातीचे तयार असलेले मावळे, भाजीवाली, पाण्याला जाणारी स्त्री, विहीर, संत मंडळी, सैनिक सर्व काही तयार मिळते. काहीच माहिती नसण्यापेक्षा हे हि चांगलेच आहे असा जरी सकारात्मक विचार केला तरी, मोठे झाल्यावर एकदा तरी स्वतःच्या हातानी किल्ला मुलां बरोबर बनवायला हवाच. स्वतःच्या हाताने बनवलेले किल्ले जेंव्हा जपले जातील तेंव्हाच खऱ्या किल्ल्यावर गेल्यावर आपण आणि पुढची पिढी पण ऐतिहासिक वारसा निश्चित जपेल.

सकाळ समूहाने किल्ले करणे ह्या संस्कृतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठींबा आणि स्पर्धा आयोजित करून परंपरा जपली आहे. अशा स्पर्धेच्या काळात मुलांनी जास्ती वेळ तेथे उपस्थित असावयास हवे असे निश्चित पणे सांगितले असणार. मुलांची आणि पालकांची पण जवाबदारी आहेच. आपल्याला जर उत्तेजन दिले जात आहे तर त्याचा सर्वंकष बाजूने विचार सर्वांनी करावयास हवा. प्रयत्न स्तुत्य आहेच गरज आहे अधिक नियोजनाची.

सकाळ समूह दरवर्षी अशा विविध स्पर्धा आयोजित करून सर्वाना सहभागी करून घेतात त्या बद्धल अभिनंदन आणि धन्यवाद कारण आमच्या सारख्या भारता बाहेर दूर गेलेल्यांना आपला समृद्ध वारसा पुढच्या पिढीला दाखवता तरी येतो. हि माहिती मी इथल्या सर्वाना कळावी आणि त्यायोगे किल्ले सर्वांपर्यंत पोहोचावे. काही माफक अपेक्षा ठेवून आणि आपले कौतुक ह्या पोस्ट द्वारे …. शिवरायांपाशी समर्पित.

खेळ अंधाराचे………वेध प्रकाशाचे.

परवा अजिंक्य ला सर्वपित्री म्हणजे काय ते सांगत होते. आकाशात आपले मृत्यू झालेले आप्त ह्या दिवशी मुक्त संचार करत असतात. ते ‘आत्मा’ ह्या स्वरुपात असतात. सर्वपित्रीला त्यांना जेवण ठेवतात. ह्या गोष्टीना पुरावा काही नाही परंतु ह्या दिवसा करता आमच्या लहानपणापासून भीती घातलेली होती. असे काही नसते, समजावून पण सांगत होते. कितीही न पटले तरी त्याचे चौदा वर्षाचे वय अशा गोष्टीत रमते. सध्या सी आय डी सारख्या सिरीज आमच्या कडे भक्तिभावाने बघणे होते. खून कसा झाला? का केला ह्या पेक्षा तो कसा शोधला हे खूप आवडते.

माझ्या लहानपणच्या गोष्टीत बाळ रमत गेले, बघता बघता रात्र झाली. जेवणे होतात न होतात तोच साडे आठ च्या सुमारास चक्क लाईट गेले. इथे हा अनुभव जवळ जवळ नाहीच. त्यामुळे घरात टोर्च पण एखादीच… सतत लाईट असल्याने इन्व्हरटर पण माहित नाही. मेणबत्ती चे दिवे गेल्या वर्षीचे दिवाळीचे घरात होते म्हणून बरे. हळू हळू अजिंक्य सोफ्यावर माझ्या जवळ जवळ सरकत होता.

आमच्या लहानपणीच्या अंधारात आम्ही कसे कसे वागायचो ह्या गोष्टीना सुरवात केली. घरात रात्री चिमणी, किंवा कंदिलाच्या उजेडात सर्व कुटुंब एकत्र बसायचो. आई रामरक्षा म्हणण्यास सुरवात करायची. आईचा शांत, अंधाऱ्या रात्रीतला एका लयीत येणारा गहिरा उच्चार पण किती आश्वासक असायचा.

‘चिमणी’ च्या उजेडात तिने केलेला गरमगरम स्वयंपाक. ताटात पोळी वाढताना मेणबत्तीचा तिच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश, राजा रवी वर्मा च्या चित्रासारखा वाटायचा. तेंव्हाच्या काळात सारखे लाईट जात नसायचे पण एकदा गेले कि खूप वेळ येत नसत. मग सोसायटीच्या गच्चीत आपल्या गाद्या, उशा घेऊन घरातून प्रत्येक जण यायचा. आई कधी यायची नाही ती छोट्या बहिणीला घेऊन घरात. मी, भाऊ आणि बाबा गच्चीत.. सगळे जमत मग काय अंधाऱ्या गच्चीत पण चांदण्याच्या उजेडात भुतांच्या गप्पांना जोर येत असे. तेंव्हा आम्हाला पण सकाळची शाळा होती पण आठवत नाही कधी ह्या गोष्टीचा कोणी बाऊ केल्याचे.. कसे मस्त होते ते लाईट चे जाणे.

माझ्या लहानपणी ब्ल्याक आउट होत असे. पोलिसांचे सायरन वाजायचे… पाकिस्तानी हल्ले होत. अशा वेळी वडील मिलिटरी मध्ये इंजिनिअर म्हणून काही काळ होते, त्या जीवनाचा त्यांना अनुभव असल्याने लाकडी खिडकीच्या काचांना काळा कागद आमच्या कडे बरेच दिवस टिकून होता, भीती कधी वाटली नाही पण लाईट आले आणि संकट टळले म्हणून निदान निम्म्या ठाण्यातून तरी उत्साहाच्या आरोळ्या ऐकू येत.

भावाचा ‘राजू’ चा चेहऱ्यावर टोर्च चा उजेड पडून भुताचा चेहरा आम्हाला दाखवायचा हा उद्योग व्हायचा. धाकटी ‘अंजू’ किंचाळली कि, हा टोर्च फक्त बाबा सांभाळायचे. मग वडील कॅरम काढायचे. अहाहा, मेणबत्ती चा प्रकाश बोर्ड वर पडला कि, राणी सोंगटी पण कशी लाल व्हायची. मुद्दामहून कॅण्डल लाईट डिनर, असे अंधारात खेळणे ह्या करता कुठेलेही हॉटेल, किंवा क्लब लागत नव्हते कारण तेंव्हा इन्व्हरटर नव्हते. आज गावाकडे सुद्धा अशी धम्माल कमी होत आहे असे वाटते. पत्ते तर आई लवकर ये न….. अशी आरोळी ठोकून वाटण्यास सुरवात करायचो.

रात्री ‘रम्मी’ खेळण्यास खूप मजा असते, दुपारी बदाम सात ठीक असे माझे पत्त्यांच्या खेळाबाबत काही ठोकताळे आहेत. ‘रम्मी’, ‘गाढव डाव’… खेचा खेचीचे,अडवणुकीचे खेळ खेळताना लबाड, चिंता हे भाव मेणबत्तीत अधिक ठळक उठून दिसतात. ‘बदाम सात’ कसा वामकुक्षीचा खेळ दुपारीच बरा असो, असा डाव रंगत जात असे. मेणबत्ती च्या उजेडात सावल्यांचा खेळ तर जोशात यायचा.

घरातील सर्व सदस्य निरनिराळे आकार भिंतीवर करून दाखवायचे. दिसते तसे नसते…भासमान खेळ आहे ह्या जाणीवे बरोबर हि पण एक कला आहे हे हि आवर्जून वडिलधाऱ्या कडून सांगितले जात असे. ह्या खेळात कुत्रा. हरण, ससा असे आकार भिंतीवर खूप छान दिसतात.

जस जशी रात्र रंगत जात असे तसा दिवसा आणि रात्री चालणारा गुढमय खेळ प्लांचेट मांडले जायचे. अर्थात त्याला हि सभ्यता असायची रात्री म्हणे आत्म्यांना बोलवायचे नसते, ते परत जात नाही. मला स्पष्ट आठवते, कि कोणीतरी मुल खाणारी हडळ घरी येते, म्हणून दारावर श्रीराम हे आम्ही त्या अफवेला घाबरून लिहिले होते. वडील आणि आई हे खोडून काढत पण वातावरण असेच असल्याने आम्हीही भरकटले जात असू.

अंधारात गच्चीच्या सज्जात हळूच सटकत असू, आधीच चमूची टोळी जमलेली असायची, मग तो काचेचा ग्लास, कोरा कागद. त्यावर ‘हो’ ‘नाही’ असे दोन वर्तुळे…सर्व काही दाखवून लहान भावंडाना थरथर करायला लावत असू……मग आमची आठवडाभर कामे कशी अलगद त्यांच्या कडून पूर्ण केली जायची. कामे कसली तर….. पेन्सिलीना टोक करून ठेवणे, पेनात शाई भरून ठेवायची…. तेंव्हा रविवारी अंघोळ करताना केस धुणे हा कार्यक्रम प्रत्येक घरी होत असे.. त्याच रविवारी पेन साफ करून ठेवणे हे काम प्लांचेट पहिल्याने भावंड करत . आईच्या लक्षात आले कि, काय बोलणी बसत असत. अंधारात कशाला कडमड करता? अशी दटावणी पण मिळे . तरी पण हे उद्योग काही थांबविले नाहीत. बर रात्री खरे प्लांचेट कधीच करत नसू कारण मनात आम्ही पण टरकलेले असायचो आत्मा परत गेलाच नाही तर… त्यातल्या त्यात आजीला बोलवायचो ती काही त्रास नाही देणार म्हणून..पण लाईट गेले कि खोटे प्लांचेट मांडून कोणी ताईगिरी, दादागिरी करण्याची संधी म्हणजेच अंधार…

आता लाईट गेले कि, एका मिनिटात इन्व्हरटर घर पुन्हा प्रकाशमान होते. अजूनही गावी कंदिलाची मजा, कंदील, चिमणी साफ करणे केरोसीन घालून नीट ठेवणे किती होते कोणास ठावूक कारण घरोघरची अंधाराची मजा आता इन्व्हरटर ने घालवली. घरात सदस्य कमी झाले. बिल्डींग मधले सगळेच माहित असतात असे नाही. ह्या शोधामुळे फायदे हि खूप झाले पण अंधारातले लहानपण कुठेतरी हरवत चालले.

अंधारात जाणवलेला वेध प्रकाशाचा… त्या जाणीवेत अनुभवलेले सात्विक भाव, खोडसाळपणा आमच्या ह्या छोट्या पिढीला समजावून सांगावा लागतो. अजिंक्यला सर्व धम्माल सांगताना हि पोस्ट तयार झाली कदाचित… हेच वाचून हि पिढी निदान व्हर्चुअल आनंद तरी घेईल.

गोष्टी सांगताना रात्र खूप झाली, वेध लागले होते सर्वापित्रीच्या गूढ रात्री नंतरच्या येणाऱ्या….. जागून काढलेल्या पुढच्या प्रकाशाच्या नऊ रात्रींचे.

.

‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ …….वाढदिवसाची भेट.

गाडीत घर घेऊन फिरतात. हे त्या गाडीत बसल्यावर लक्षात येते. मी ही ह्याच कुळातील आहे. गाडी म्हणजे चारचाकी होय. आमचा परिवार एकाच मुलाचा, टपरवेअर मध्ये घेतलेलं खाण, त्या खाण्याचे विविध डबे.. उदा. पोळी भाजीचा, हलकासा नाश्ता, बिस्कीट, गोळ्यांचा. असे. हे पण कमी काय म्हणून बाळ, मुंबई-पुण्या पर्यंतच्या प्रवासात झोपायचे म्हणून मागच्या सीट वर त्याची छोटी उशी, चादर. वाटेत गाडी अडकली तर…..तेंव्हा जलद गती मार्ग नव्हता. जुन्या घाटात हमखास वाहन कोंडी अनेक तासांची पण होत असे. नंतर जेंव्हा द्रुतगती मार्ग तयार झाला तरी पण अकारण गाडी भरण्याची माझी जुनी सवय काही गेली नाही.

प्रवास अनेक तासांचा झाला तर काय त्रास होऊ शकतो म्हणून अनेक कोरडे खाण्याचे प्रकार, औषध पेटी, माझी गाडी चार दिवस जरी अडकून पडली तरी काहीही अडणार नाही इतकी जय्यत तयारी करण्याची माझी खोड आहे. हि झाली गाडीच्या आतील तयारी, पुण्याहून किंवा कुठून हि परत येताना तेथील काही रोपटी, आकर्षक वस्तू ह्यांनी गाडी खचाकच भरत असे. माझा सहनशील नवरा संसारात पडल्याने हतबल होऊन जायचा. माझे आपले एकच म्हणणे असायचे हातात थोडीच घ्यायचे आहे, डिकीत ठेवायचे. जर काही इमर्जन्सी झाली तर मुल लहान आहे.

भारतात माझ्याकडे तेंव्हा ‘पोमेरीअन’ होता. ‘पोमेरीअन’ चे सर्व सामान खाण्याचे, पाण्याचे भांडे, पट्टा, त्याची खेळणी, कुत्र्याची पण औषधे, ते घरतील लहान मुलच होते.. कुत्र्याला ठेवण्याची सोय नव्हती असे नव्हते तर मला त्याच्या शिवाय चैन पडायचे नाही, म्हणून त्याच्या सकट जमेल तसा प्रवास. कोणाचे कशापासून अडू नये. चारही दिवस प्रवासाचे मजेत असावेत म्हणून माझा कोण आटापिटा असायचा. ह्यांना असला फाफट पसारा करून प्रवासाची आवड नाही.

‘मारुती ८००’ आणि ‘अल्टो’ ह्या आमच्या गाड्या घर च होत्या. गाडीत एव्हढे सामान असणे म्हणजे काही सुटसुटीत प्रवास नाही. गाडीची शान राखा. लहान मुला बरोबर प्रवास कोणी करत नाही का? ते कसे इतके सुटसुटीत प्रवास करतात. इतके जपलेस तर अजिंक्य बाहेर कसे शिकणार? इतकी बोलणी बसायची, पण प्रवासात आईकडे खाण्यासाठी काहीच नसल्याने हतबल झालेली बाळे मी पहिली आहेत. मुल लहान असेल तर बरोबर एखादा बिस्कीट चा पुडा आणि पाणी तरी निदान बरोबर असावे ह्या ठाम मताची मी आहे. मग प्रवास दहा मिनिटाचा असला तरी, तो कधीही जास्त होऊ शकतो हि शक्यता आईने नेहमीच लक्षात घ्यावी. माझा प्रवास चार दिवसाचा असला तर, सगळीकडे घर करून टाकले आहे असे म्हणत, ‘हे’ सर्व सामान घेत. अजिंक्य कधी एकदा माझ्या दृष्टीने मोठा होतो असे ह्यांना झाले होते.

लांबचा प्रवास असेल तर परतीच्या प्रवासात छोट्यांचे कपडे सीट च्या चहुबाजूनी वाळत घातलेल्या गाड्या पहिल्या कि, हे तर माझ्या पठडीतले आहेत. असे माझे मन भरून येते. घर आणि गाडी असा भेदभाव न करता मजल दर मजल प्रवास करत माझे बाळ मोठे झाले. आता सुद्धा मस्कत वरून येता, जाता, मी किती नको ते सामान घेऊन प्रवास करते हि, चिडचिड ह्यांची सुरु असते मस्कत मध्ये आलो तेंव्हा आमच्या प्रवासाचा पूर्व अनुभव असल्याने, मला आणि अजिंक्यला ‘ह्यांनी’ बऱ्याच गोष्टी गाडी करता समजावून सांगितल्या.

‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ म्हणजे ह्यांचे खूप काळापासून जपलेले स्वप्न होते. आम्ही अनेक गाड्यांच्या शोरूम मध्ये जाऊन आलो. पण ह्यांचे प्रेम ह्या गाडीवर इतके आहे कि, ह्या गाडीला जपणे म्हणजे ह्यांना अजून एक बाळ झाले अशीच भावना माझी व अजिंक्यची आहे. वर्षानुवर्षे जपलेले ‘ लॅण्ड क्रुझर प्राडो’ चे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले. सध्या असलेली आता असलेली ‘निसान सनी’ हि गाडी पण आम्ही बरीच वापरली आहे म्हणून गाडी बदलून ह्यांनी त्यांची ‘ लॅण्ड क्रुझर प्राडो’ घेण्याची इच्छा पूर्ण केली.

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला २०१० ची ‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ हि गाडी ह्यांच्या कडून भेट देण्यात आली. आम्ही दोघांनी गाडीत कसे बसावे ह्या करता ‘ह्यांनी’ शिकवणी घेतली….. नियमावली अशी आहे……..

१) दरवाजा हळू लावायचा.
२) गाडीत खाणे बंद.
३) पाय वर करून मांडी घालून बसायचे नाही.
४) अकारण बोलणे बंद.
५) पेपर चा कचरा करायचा नाही.
६) डिकी मोठी आहे म्हणून उगाचच सामान भरायचे नाही.
७) गाडी पूर्णपणे स्वयंचलित असल्याने, हे काय, ते काय, असे मध्ये मध्ये विचारायचे नाही.
८) गाडीत सीट मोठी आहे म्हणून लोळायचे नाही.
९) पाणी पिताना सांडायचे नाही.
१०) डोक्याला जास्त तेल लावुन गाडीत बसायचे नाही.
११) लांबच्या प्रवासाल गेलो तरी उशी, चादर घेऊन पसरायचे नाही.
१२) वाटेत मिळेल ते खाणे करायचे. खाण्याचा डबा बरोबर घेतला असेल तर शिस्तीत वाटेत थांबून खाऊन मग गाडीत बसायचे.
१३) गाडी मोठी असल्याने कुठे हि पटकन थांबा असे म्हणायचे नाही
१४) वेफर्स चे पुडे कारण नसताना गाडीत फोडून सांडासांड करायची नाही.
१५) सामान गरजेचे घेणे झाल्यास व्यवस्थित डिकीत ठेवणे.

अशा अनेक नियमांची पारायणे आमची होत आहेत. खूप जपलेले स्वप्न ‘धनंजय’ यांना मळके करायचे नाही, आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेचा सन्मान आपणच ठेवायचा असतो. अजिंक्य पण मोठा झाला आहे. आता प्रवासात मला काहीच काळजी करावी लागत नाही. हीच योग्य वेळ आहे अशी मोठी गाडी घेण्याची असे मलाही पटले.

अजिंक्य ला ‘ह्यांनी’ वेगवेगळ्या गाड्याच्या शोरूम मध्ये नेऊन आपल्या बजेट मध्ये हि गाडी कशी बसते, आणि आपली गरज कशी पूर्ण होते . हि बाब पूर्णपणे समजावून सांगितली. मोठ्या होणाऱ्या मुलाकरता योग्य वेळी काही गोष्टी समजावून सांगणे म्हणजे आपल्याच स्वप्नाचा आनंद मिळतो. गाडीत अनेक सोई सुविधा आहेत. गाडी सांभाळून कशी ठेवायची हे पित्याचे कर्तव्य आजच्या ह्या फास्ट पिढी करता सांगणे खूप गरजेचे आहे. ह्या पिढीला अनेक गोष्टी सहज मिळतात पण आई- वडिलांनी त्या केंव्हा, कशा आणि कोणत्या वेळी सांगणे म्हणजेच सुरक्षित जीवन आणि आई वडिलांचे वर्तन सन्माननीय आदर्श ठरते.


माझा वाढदिवस म्हणून ह्यांनी ‘२०१० ची ‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणून मला बहाल केले. खरच!! ह्यांच्या ‘ह्या’ नवीन बाळाचा लळा आंम्हाला पण लागला आहे. आम्ही ‘ह्यांचे’ स्वप्न नीटपणे जपून खूप वर्ष पुन्हा नवीनच आहे असा अनुभव घेऊ.

गाडीतले घर किंवा घरा एव्हढी गाडी असली तरी ध्येयाने पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता होणे आणि त्यांचा आदर करणे हेच खरे घरपण आहे.

मला वाढदिवसाची ‘२०१० ची ‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ हि अनोखी भेट खूप आवडली आहे.

कातरवेळ, काहूर आणि सांजवात

हल्ली बऱ्याच वेळेला घडते. संगणकावर काम करत राहिले कि वेळेचे बंधन राहत नाही. अचानक लक्षात येते, घरात चारी बाजूनी अंधार आला आहे. विचारांचे काहूर काही संपत नाही. संध्याकाळ ची कातरवेळ मला खूप अपराधी बनवते. हुरहूर अधिक जाणवते. खिडकीतून आधार देणारी झाडे नकोशी वाटतात. खिडकीतून झाडां ऐवजी, माणसांचा आधार बरा वाटतो. थंड हवेच्या ठिकाणी, गर्द झाडातून मला मुंबईची आठवण खूप येते. घरात सुद्धा मनात कोंडलेले विचार आठवतात. घरी एकटे असले तर हे बरेच जाणवते. भित्रे मन नसून हि संवेदनाक्षम मनाची खुण आहे, ह्या खुणा मी खूप जपते. त्यातूनच मी मला पाहते. दूर गेलेली आपली माणसे घरी असावी असे जाणवते. त्यातूनच ” या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा” हे गाणे हमखास आठवते.

काम संपून मी मी टीव्ही पाहावा म्हणून बाहेर येऊन बसले, घर चौथ्या मजल्यावर. बाहेर गुलमोहराचे झाड, त्याचा फांद्या न्याहाळत दुपारी चहा घ्यावा. हा क्रम नित्याचा, फांद्यांचे आणि माझे नाते जुळले होते. नवीन आलेला अंकुर पण मला ते आवडीने दाखवायचे. संध्याकाळ मात्र हे नाते गडद व्हायचे. डास येऊ नये म्हणून मी मला कोंडून बसायचे. असंख्य चिमण्या परत यायच्या. अशीच वेळ अचानक चिमण्यांचा फडफडाट व गलका ऐकू आला . मनात शंका आलीच की, काही तरी विपरीत होत असणार. खिडकी उघडली तोच अंधार दाटून आला. मी टोर्च आणली व फांद्यान मधून फिरवत राहिले. दोन दाहक डोळे, व सरपटणारे अंग दिसले. काय करू मी, हैराण झाले. तो जहरी पुढे पुढे सरकत होता. मी जोरात हुशः हुशः आवाज काढत ओरडत होते. मागची बाजू कोण असणार? साप, साप ओरडावे तर ऐकून काय होणार. अपराधी वाटत होते. सापाची अन्ना करता धडपड, चिमण्यांची पिल्लं करिता फडफड व खिडकीत मी, देवा वाचव यांना, म्हणून टाहो फोडत होते. त्याने गिळले काही तरी, कारण शांतता झाली. मी पाहीले तो, उतरत होता. काळाने घास घेतला

सकाळी पुन्हा चिवचिवाट ऐकू आला. जीवन सुरु झाले. मी रात्री जेवू शकले नाही. मुलाला घट्ट मिठीत घेऊन झोपले. तो ही गोंधळला होता. एकटा झोप म्हणणारी, आई एकदम बदलली कशी. मी मात्र काही करू न शकल्यामुळे चिमण्यांची अपराधी झाले. ह्या छोटाश्या चिमण्या मला अंधार कसा स्वीकारायचा, प्रकाश कसा बघायचा शिकवून गेल्या. देश सोडला इथे चिमण्या पुन्हा मिळाल्या. खिडकीतून पुन्हा झाड डोकावते आहे. चिमण्या करता मी पुन्हा खिडकीतून जीवन बघत आहे.

काहूर दाटले गुलमोहरी छटांचे, रंग सोनेरी सांज वेळेचे, अजूनही मी ह्या वेळी घरी, माझ्या भारतात परतते. कवी बी. रघुनाथ ह्यांच्या सांज ह्या कविता संग्रहा ची आठवण झाली. माझ्या मातीच्या मायेसाठी प्रत्येक सांज मी चंद्र केली. घरी परतणारी गुरे त्यांच्या खुरांनी उडलेली धूळ, सांजेलाही उदी रंग मिळाला, एक शाश्वत गहिरा रंग.

अशा कातर वेळी सुखी मन पण तरल होते. मन भटके होते. मनाच्या स्थिरते करिता मी सांजवात लावते. छोटासा पण प्रकाश मला मनाने काय घेतले, ते मलाच परत करण्यासाठी शुभंकरोती म्हणून समर्पित करण्याचे शिकवून जातो. पुन्हा मी घरात रमू लागते, दूर असलेल्या भावनांना घरचा मार्ग स्पष्ट दिसावा म्हणून प्रकाश पणती दारात लावते. तन- मना च्या जोडीची ही सांजवात, तिळा सारख्या उबदार भावनेत रात्रभर तेवती राहू दे.

आई, गृहिणी म्हणून घरासाठी,तुळशीपाशी विश्वासाठी प्रार्थना ची परंपरा अजूनही चालू आहे. प्रत्येकाच्या मनाला अशी सांज आठवण ठेवून गेलेली असते. लेखन, कविता, ह्यासाठी तर ही खूप आवडती आहे. जे अनुभवू पाहतात त्यासाठी सांज अनुभूती देते.

चंद्राचा शांत, शीतल प्रकाश सांजेलाही उजळ करून गेला म्हणून माझी सांज मी चंद्र केली. अशा कातरवेळी प्रकाश निसटू पाहतो, अंधार अंगावर येऊ लागतो ह्या सीमा रेषेवर, मी सांजवातीचा आधार शोधते. ह्या काजोल वेळी उद्याचा येणारा पितांबरी रंगाचा प्रकाश मनाला नकळत पणे उदी रंग लेऊन जातो. पितांबरी सोनसळी रंगाने मी पुन्हा भरून जाण्याकरता सांज मी स्वीकारते. चिमणीरुपी दूर गेलेल्या मनाची आवर्तने रोखण्यासाठी पुनश्च एकदा सांज प्रकाश भरून मनात व्यापून राहिली.

कुठल्याही उत्सवात संध्याकाळी मन कसे तृप्त असते. गणपती बाप्पाच्या विसर्जन नंतर हि संध्याकाळ अशीच एकटी वाटते. बाप्पाच्या सहवासाने घर कसे भरून पावते तीच पोकळी कातर वेळ म्हणून जाणवायला लागते. माझ्या मनाला तरी असा आधार लागतो. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लावलेली तीच सांजवात बाप्पा असताना उत्साहाची वाटत होती, आता मात्र शांत निरामय अशी होते. शुभंकरोती चे आपलेच स्वर , बाहेर मस्जिद मधून कानावर पडणारी अल्लाची पुकार ह्यांचा एकत्रित नाद घरात गुंजन करू लागतो. भारताच्या बाहेर पडल्यावर हि वेळ फार जाणवायला लागली. बाप्पा नंतर येणारी नवरात्र पुन्हा एकदा संध्याकाळ उजळून टाकेल आणि नंतर येणारी दीपावली हि तर दिव्याची सम्राज्ञी… एकेक सणांनी पाठोपाठ सांज सजवली आहे.

संध्याकाळची अशी आवर्तने मनास पुन्हा पुन्हा मायदेशी….. आईच्या घरच्या उंबरठ्यावर अलगद नेतात. सांजेच्या ह्या दोलायमान विचारास एक दिशा नाही, एक विचार नाही कारण काहूर साठवून आले ते आजच्या दिवशी, मी आईकरता अजूनही लहानच असते, आज संध्याकाळी तिने मज साठी केलेले सांज औक्षण माझे वय लहानच ठेवते. आकाशात पसरणाऱ्या सांजेत चंद्र डोकावत असताना लेकीचे कौतुक चंद्रात सामावून जाते. प्रत्येक सांज अशी वेगवेगळ्या विचारांनी प्रकट होत असते.

विचारांची आवर्तने आणि सांज वेळ याची भूल मला हि पडली आणि जाणवली काहूर… कातरवेळ आणि सांजवात मनातली…..

श्रावण मासी हर्ष मानसी…………

अजूनही आठवणारी हि छान कविता!!! कविता म्हणायचे का? निसर्गाचे गाणे का? मनाचा आवाज!!! हा संभ्रम कधी पडलाच नाही. शाळेत ओळख झाली आणि जीवनाचे गाणे हे प्रत्येक टप्प्यावर जाणवू लागले. बालपणीचा रम्य काळ हा ह्या श्रावणाच्या अनेक दिवसांशी घट्ट पणे अजूनही नाते जोडून आहे. श्रावण हा सर्वांशी निगडीत असा आहे. चातुर्मासाच्या ह्या कहाण्या आज्जी च्या भोवती रुंजी घालू लागतात. नात का नातू हा भेदभाव नाही, श्रावणात आजी चे राज्ज्य असायचे आणि आई सर्व गोष्टी काटेकोरपणे अमलात आणायची.

श्रावण महिन्याचा पहिला दिवस कोणत्या वारी येतो ह्या करता कालनिर्णय पाहत नव्हते तर श्रावण प्रथम दिवसा ची चर्चा, हितगुज घरी केंव्हाच सुरु झालेले असायचे. आषाढ महिन्याचा प्रथम दिवस हा ‘मेघदूत’ म्हणून साहित्यात बराच परिचित आहे. आषाढी एकादशी, आषाढ अमावस्या ह्या पुढे घरी फारसा सहसंबंध आषाढ महिन्याशी नव्हता. कौतुकाचा, मायेचा, व्रतवैकल्याचा, देवळात खूप वेळा जाण्याचा हा एकमेव महिना म्हणजे श्रावण आला….श्रावण आला.

श्रावणात जेवणाची गम्मत काही औरच असायची. रोज कुठल्यातरी देवाचा वर असतो आणि त्या प्रमाणे जेवण केले जायचे. सोमवारी शंकर देव ते शनिवारी हनुमान इथपर्यंत चंगळ, रविवारी काय बेत असायचा ते मात्र आता अंधुकसे पण आठवत नाही. परिचित, नातेवाईक , स्वतःच्या घरी नेहमी पूजा असत. नवीन कपडे, नटणे, सजणे म्हणजे धम्माल!! असे समीकरण दृढ होते. हा महिना म्हणजे होली मंथ का? असे आताच्या पिढीला समजावून सांगावे लागते.

निसर्गाच्या बदलाप्रमाणे आहार, विहार, विचार ह्यांना सुसंगत अशी जीवन शैली बनविणे म्हणजे श्रावण. हा महिना बऱ्याच जणांकडून मांसाहार , आणि मद्य वर्जित करून पाळला जातो. खूप जणांना हा महिना जवळ आला कि धस्स होते कारण महिनाभर भाजीपाला खाऊन दिवस ढकलणे कठीण होते.

श्रावणातील जिवत्या, घरातील पूजेचा मस्त सुगंध, पुरणपोळी, पापड कुरडया,अळूवड्या ह्या ह्याच दिवसात छान वाटतात. जसे दिवाळीतील फराळ दिवाळीतच मस्त वाटतो. असा हा श्रावण कोणाला हवासा, कोणाला नकोसा वाटतो. आता ह्याच दिवसात फक्त देव असतो का? तो आपल्या मनात कायम असावयास हवा तरच मनाचा श्रावण सगळीकडे हिरवळ दाटे चोहीकडे असा निसर्गाने परिपूर्ण असलेला अनुभव देता होईल.

श्रावणाची प्रकर्षाने आठवण होण्याचे कारण कि मस्कत मध्ये होली मंथ ‘रमादान’ च्या खुणा जाणवायला लागल्या आहेत. आपल्या भारतीय शाळा सुद्धा एक तास आधी सोडतात. अरेबिक शाळांना तर सुट्टीच असते. ऑफिस मध्ये ओमानी लोकांना सुट्टी नाहीतर अर्धा दिवस काम ठेवतात. दिवसभर बाहेर कुठे हि खाण्यास मिळत नाही. काही हॉटेल मध्ये पार्सल दिले जाते पण तिथे बसून खाण्यास बंदी आहे. येथे दिवसा मोकळ्या जागी तुम्ही खात असाल तर तुम्हाला कायद्याने शिक्षा आहे. संध्याकाळी ‘अजान’ म्हणजे प्रार्थना झाल्यावर मात्र जवळ जवळ रात्रभर ओमानी कुटुंबीय समुद्र किनारे, बागा इत्यादी ठिकाणी जमून एकत्रितपणे होली मंथ चा आहार घेतात. मॉल मधून फार मोठ्या प्रमाणात सेल असतात, ते सुद्धा रात्री खूप वेळ चालू असतात.

दिवसभर प्रचंड शांतता जाणवते. येत असतो तो फक्त दिवसभरच्या त्यांच्या प्रार्थनेचा आवाज, तो पण ऐकावासा वाटतो कारण आंम्ही सुद्धा त्यांच्या देवाला सुद्धा मनोमन नमस्कार करतो. ओमानी संस्कृती भारतीय संस्कृतीला आदर व्यक्त करते. होळी, गणपती सार्वजनिक पणे साजरा करण्यासाठी इथे खिमजी कुटुंबीयांनी मोठी मोठी दोन देवळे बांधलेली आहेत. त्या ठिकाणी मनसोक्त सण साजरा करता येतो. परिचयात नवविवाहित जोडपे असल्यास आम्ही येथे मंगळागौर सुद्धा मैत्रिणी एकत्रित पणे येऊन साजरी करतो. शंकराच्या मंदिरात आवर्जून जातो.

भारता पासून दूर राहूनही जेव्हढे म्हणून करता येईल तेव्हढे मनापासून सण मनापासून साजरे करतो. कालनिर्णय पाहत बेत बनवतो. आईच्या घरातील ‘तो तिच्या पदराचा’ श्रावणी दरवळ इथून मिळतो का याचा खटाटोप करतो. पण मन मात्र हिरवळ होऊन कधीच सैह्यांद्री च्या कुशीत सामावले गेले असते.

निसर्गातील ताजेतवाने पणा, मनाची प्रसन्नता, आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावण असणे होय. समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्या करता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला एक छोटासा ब्रेक दिला आहे. विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा हि पोषक पणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. शेतकऱ्याला सन्मान व प्राण्यांना आराम मिळण्यास जणू काही श्रावण येत राहतो.

असा श्रावण पोथ्यात शोधून त्याची पारायणे करण्या पेक्षा आधुनिक जीवनाशी सांगड घालून जीवनभर नुसता………. आला ग वनी, असे न म्हणता ………आला ग मनी असे झाले तर श्रावण वाळवंटात पण अनुभवता येतो. घराघरातील दरवळ समुद्रा पलीकडे पण पोहचवतो.

हरवले………सापडले…………लक्षात कायमचे राहिले.

हरवले…….सापडले ह्या मधील अंतर मी शाळेत शिक्षिका असे पर्यंत कधी फार लक्षात आले नाही. शाळेतील मुलांच्या कंपास, डबे, पाण्याच्या बाटल्या ह्यांचे नेहमीच ढिगारे लटकत ठेवलेले असत. प्रत्येक वर्गात हरवले सापडले चा प्रतिनिधी शोध घेऊन वस्तू सुपूर्त करत. मध्यंतरी च्या काही काळात काही शुल्क दंड म्हणून ठेवली गेली तरी सुद्धा विसरभोळी मुले कधीही काम नाही असे ठेवत नसत. वस्तू मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान देत असे. बहुतेक वेळी मात्र पालक लगेच वस्तू आणून देत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा बेदरकारपणा सुद्धा प्रकर्षाने जाणवायचा हे संमिश्र भावानुभव मिळत असल्याने हरवले……सापडले चे फारसे लक्षात कधीच घेतले नाही. शारीरिक शिक्षण शिक्षकांकडे हे खाते असल्याने दरोरोजची हजेरी घेतली कि, ह्या खात्याचे विद्यार्थी प्रतिनिधी वर्गात यायचे त्यामुळे हजेरी पटाची गोळा बेरीज करण्यास हक्काचा वेळ मिळायचा हाच काय तो क्षणिक दुरान्वये सहसंबध वर्गशिक्षक म्हणून लक्षात आहे.

शाळेतील आठवणी जशा विद्यार्थी म्हणून कायमच्या मनावर कोरल्या जातात तसेच शिक्षक म्हणून सुद्धा शाळेतील विद्यार्थ्याचा चेहेरा मोहरा बदलला तरी त्या विद्यार्थ्याचा स्वभाव सहसा शिक्षक विसरत नाहीत. शाळेत नोकरी केली म्हणण्यापेक्षा शाळा आमचे घर होते. शाळेतील कोपरा न कोपरा आठवतो. असाच एक कोपरा हरवले……सापडले चा प्रत्येक शाळेत असतोच.आपले काहीही हरवले नसले तरी एक वेळा तरी हा कोपरा प्रत्येक जण न्याहाळून पुढे जातो.

मध्यंतरी पुण्यात एका मॉल मध्ये फिरताना माझ्या शेजारी एक आजी पण काही वस्तू घेत होत्या, अचानक त्यांना अस्वस्थ वाटून त्या पटकन जमिनीवर बसल्या. बिपी ची गोळी विसरल्या होत्या. गोळी त्यांच्या कडे होती पण त्या पाण्याची बाटली विसरल्या होत्या. माझ्याकडे पाण्याची बाटली होती मी त्यांना दिली. हे सर्व काही मिनिटात झाले, मी पण तिकडून लगेच निघाले. पैसे भरण्यास रांगेत उभे राहिले.

एक तिशीतली संसारी तरुणी माझ्याकडे पाहून हसली. मी पण उगाचच हसले, पुढे येऊन म्हणाली, मला ओळखले नाही का? कोणीतरी विद्यार्थिनी नक्कीच असणार. कशी ओळखू मी? कसेनुसे हसून म्हणाले, नाही ग. मला दुसरा काहीही संदर्भ ती देत नव्हती. मी अजून गोंधळून गेले. पुढे तीच म्हणाली, मी तुम्हाला ओळखले आणि पाण्याची बाटली पण अजूनही तुमच्या पाशी कायम असेलच ह्याची पण खात्री आत्ताच पटली. आत्ता हा काय पाण्याचा सहसंबध? मी दर महिन्याला पाण्याची बॉटल शाळेत विसरयाची आणि हरवले मध्ये शोधायची. तुम्ही पाणी नेहमी जवळ ठेवावे असे सांगायच्या. आज तुम्ही पाणी दिलेत म्हणून माझ्या सासूबाईना त्रास झाला नाही. पुन्हा कधीही विसरणार नाही. हरवले चा कोपरा आज मला काही देता झाला

भारताच्या रम्य आठवणी मनात ठेऊन परतीच्या प्रवासाकरता मुंबई विमानतळ गाठले. सामान ट्रोली वर टाकून मी स्कॅनिंग साठी मशीन शोधत होते. स्कॅनिंग बंद केले आहे असे सांगितले. काळजाचा एक ठोका चुकला. सर्व प्रवाशांकडे हे पण नक्कीच संसारी असतील व त्यांच्या सामानात वावगे काहीच नसेल. असे मनाला पटवत सामान चेक इन वर टाकले. मस्कत ला उतरल्यावर एक ब्याग येईनाच. सर्व प्रवासी गेले. मुलाचा चेहरा पार बदलला, घाबरा झाला. ते सामान त्याचे होते. आई, बहुतेक ब्याग हरवली!!!!! अरे, शुभ बोल रे!! म्हणून त्याला दटावले. थोड्याच वेळात सत्याला सामोरे जावे लागले कि, सामान हरवले!!!!!

मगाशी घाबरा झालेला, धिटाईने तक्रार करण्यास गेला. सामान कुठे गेले? हे एक मोठे प्रश्न चिन्ह आमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. दोन दिवस मुंबईला विमानतळावर फोन लावणे, मस्कत विमानतळावर सतत संपर्क साधणे. ह्यातच मला फारसा सहसंबध नसलेला हरवलेला शाळेतील कोपरा आठवला. अमिताभ चे सामान हरवले होते हा उगाचच काडीचा आधार वाटत होता. दोन दिवसांनी मस्कत विमानतळावरून मेसेज आला, तुमची ब्याग कराचीला गेली होती. आमच्याकडे पाठवली गेली आहे येऊन घेऊन जा. सापडले……सापडले!!!!!

भारतीय विमानतळावरच्या त्रुटी, हलगर्जी पणा प्रकर्षाने जाणवला. स्कॅनिंग नाही. ज्यांनी त्यांनी आपलेच सामान घेतले आहे ह्याची तपासणी नाही. जाताना नाही व परत येताना हि नाही. मस्कत ला काटेकोरपणे स्कॅनिंग आहे. पण प्रामाणिकपणा आणि कायदा कडक असल्याने चुकुनही दुसऱ्यांच्या सामानाला हातसुद्धा लावला जात नाही.

भारतीय विमानतळावर नियम बदलतात. आमचे सामान सहज बाहेर पडते म्हणून क्षणिक आनंद कधीतरी अतिरेकी हल्ला पण घडवून आणू शकतो. मग असे विदारक, बेदरकार अनुभव मन विषण्ण करतात. आम्ही पण निवांत सगळे सुरळीत पार पडले म्हणून साधा हरवले…..सापडले चा कोपरा फारसा लक्ष न देता नुसती नजर टाकून बाहेर पडतो.

मस्कत ला हरवल्याचा अनुभव घेतल्यावर असे लक्षात आले कि, मुंबई विमानतळावरचा ह्या खात्याचा साधा फोन नंबर पण टिपून घेतलेला नाही. खरतर आमची जवाबदारी नाही हे काम मस्कत चे विमानतळ चोख पणे पार पडते. मग आपण निदान सामानाचे टोकन स्लीप वरचा आकडा मुंबई विमान तळावर फोन करून तरी कळवू शकतो. आमचा बेदरकारपणा हरवले……सापडल्याच्या कोपऱ्याकरता असेलला आम्हालाच लाजवतो. पाण्याची बाटली कधीच विसरणार नाही असे वचन घेऊन सुखावणारी मी!!!!! शाळेतील एक छोटासा कोपरा हरवले ….सापडले चा माझ्याकडून दुर्लक्षिला कसा गेला? अनुभवाच्या पटावर गोळा बेरीज पूर्ण होण्यास अजून वेळ हवा आहे. हेच खरे आहे.

आज महत्व कळले कि, प्रत्येक कोपरा हा आपल्या आयुष्यात हरवले……सापडले चा अनुभव देणारा आहे.

एक आहे काऊ…………

एक होता काऊ आणि एक होती चिऊ पासून अनेक गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. कावळ्याच्या हुशारीच्या गोष्टी तर अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहणार आहेतच. प्रत्येक भाषेत हा काऊ आपल्याला भेटतच असतो. चिमणी आपल्या संसारात इतकी मग्न होती की दाराबाहेर मैत्री करता उभा असलेला कावळा तिने दार उघडून कधीही घरात घेतला नाही. तिला तिच्या पिल्लांची काळजी होती, एकदा का त्याला घरात घेतला तर तो आपल्यालाच हुसकावून बाहेर काढेल. चिऊची काळजी व्यर्थ नसावी.

‘पैलतोगे काऊ कोकताहे, शकून ग माये सांगताहे…..’ असा हा काऊ शुभ शकुना करता पण आहे. हाच जर जिवंत माणसाला स्पर्श करून गेला तर सूतक लागले म्हणून विधी धर्मात आहेत. नेहमी घराबाहेर राहणारा पण आईने ओळख करून दिलेला, बाळाच्या बरोबरीने हा पण घास खाणारा असतो. आईला न घाबरता बिनदिक्कत घास घेऊन जातो. आई हाच काळा, कर्कश ओरडणारा पक्षी प्रथम का बरे दाखवीत आली असावी.

रंगीत जग खूप सुंदर आहे पण काळा पण तितकाच सुरेख आहे. बाळाची नजर स्थिर व्हावी व कर्कश आवाजाने ऐकण्याची एकाग्रता शक्ती वाढावी असा हेतू असेल का? तोंडात दात नसताना ह्याची ओळख होते. आईला बिलगून घास खाताना हाच काऊ प्रथम भेटतो. मग छोटीशी चिऊ अवतरते, सुंदर नाजूक भावना आई दाखवते. मन धीट करण्याकरता काऊ खूप मदत करतो. आईच्या विश्वासहार्य आधाराने बाळ कठोर आवाज स्वीकारायला व काळा रंग ओळखायला शिकते.

घरी येणारा पाहुणा ह्याच्या मुळे आधीच कळतो. निसर्गात आपत्ती येणार असेल, किंवा ती ज्या झाडावर राहत असेल त्याच्या आजूबाजूला जर साप येत असेल तर अनेक कावळे एकत्र येऊन एकच कर्कश गलका करतात. अचानक प्रचंड संख्येने कसे व केंव्हा एकत्र हे आपल्याला कळतच नाही. ह्यांचे नेटवर्क खूप पावरफुल आहे. आपल्याला अंदाज येतो की अवकाळी पाऊस, वादळ, गारा तत्सम गोष्टी घडणार आहेत. हा स्वतः सतर्क असतो व इतरानाही सावध करतो. पक्षी किंवा प्राणी हे सूचक असतात पण हाच एक पक्षी आहे की एकत्रित ओळ करून मोठ्या संख्येने दिसतो.

आपल्या घरट्यात कोकिळेची अंडी पण उबवतो, त्याला अंड्याची संख्या मोजता येत नाही का? एखादे जास्तीचे अंडे आहे ह्याची जाणीव असूनही अतिशय प्रेमळ पणे त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येईपर्यंत आपल्या अंड्या सारखी काळजी घेतो. ह्याला कोणीही फसवू शकत नाही कारण ह्याच्या कडे बुद्धी आहे, मग कोकिळा कशी बरे निवांत राहते? कारण शोधले तर, माहित असूनही उगाचच एखाद्याच्या निष्पाप जीव घ्यायचा ह्याच्या तत्वात बसत नसावे. पण कोणी खोडी काढली तर डोक्यावर चोच मारून जखमी करण्याची नामी शक्कल पण स्वभावात दिसते. ह्याला पण मानवाचा स्पर्श झाला तर ह्याचे भाई ह्याला टोच मारून मारून जखमी करून मृत करतात. जखमी झाला तर त्याच्या भोवती जमून तो मरे पर्यंत एकच कर्कशाट करतात. मेलेला कावळा फारसा दिसत नाही कारण म्हणे ह्याला दीर्घायुष आहे.

सूतक कार्यात तर ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. दहाव्याच्या पिंडाला हा शिवलाच पाहिजे नाहीतर आत्म्याच्या इच्छा अतृप्त आहेत असे शास्त्रात मान्य आहे, असे अनुभव ही येतात. व्यक्तीच्या आवडीची गोष्ट नेमकी कावळ्या कडून उचलली जाते. अनेक कावळे तिथे घुटमळत असतात पण पिंड ठेवल्यावर एखादा पुढे येतो व झपाट्याने घास घेऊन जातो. आत्म्याच्या इच्छा अतृप्त असतील तर संबधित नातेवाईकांनी तिथे उच्चारून त्या पूर्ण करण्याचे जो पर्यंत वचन कावळ्याच्या कानात पडत नाहीत तो पर्यंत माणसाना ताटकळून रहावे लागते.

असा हा काऊ कधी नव्हे तर मला रोज सकाळी खिडकीच्या बाहेर झाडावर एक मिनिटा करता दिसू लागला आहे. हीच वेळ होती की मला आईचा भारतातून फोन यायचा. माझा आवाज फोन वर (मस्कत हून) कावळ्याने ऐकला आणि ठाण्यात पिंडाला कावळा शिवला. असा माझे व आईचे नेटवर्क काऊ च्या माध्यमातून सुरु झाले. हाच आधार मला फोन च्या ऐवजी तो भेटून देतो. आज मला हा काऊ उद्याचा विश्वास देत आहे. एक काउ माझ्याकरता आहे.

Previous Older Entries Next Newer Entries