झुला ताकाचा…..ओमानचा.

मस्कत पासून २४० किमी अंतरावर ‘सहाम (saham ) हे खेडेगाव सदृश असा ग्रामीण भाग आहे. ह्या गावात प्रत्येकाच्या अंगणात झुला तीन काठ्यांच्या आधाराने बांधलेला दिसतो. लहान मुल झोपलेले असावे असे वाटते. घरोघरी ग्रामीण भागातल्या अनेक स्त्रिया आपल्या हाताने पाळणा झुलावताना, तसेच हळुवारपणे गाणे गुणगुणताना पाहण्यास मिळतात. आपण जर त्यांच्या शेजारी बसलो तर लक्षात येते की गाणे हे अंगाई सारखे हळुवारपणे म्हंटले जाते परंतु हळू हळू हाताने झुल्याचा वेग वाढत जातो.

तीन काठ्यांच्या आधाराने बांधलेला हा झुला शेळी ,मेंढी च्या कातडी पासून बनवलेला असतो. हा झुला पारंपारिक असून तो बरेच वर्ष टिकतो. ह्या झुल्यात त्यांनी पाळलेल्या गाईचे दुध त्या पासून बनवलेले दही पाणी घालून ठेवलेले असते. हाताने झुला हलवून ताल सुरात लोणी काढले जाते. हे लोणी काढलेले पातळ ताक मीठ घातलेले असते

ओमानमध्ये ‘अलमराई’ म्हणून अति गाढ म्हणजे लस्सी एव्हढे ताक ‘लबान’ म्हणून प्रत्येक ठिकाणी विकण्यास १०० मिली पासून २ लिटर पर्यंत प्लास्टिक कॅन मध्ये उपलब्ध आहे. इथे अशा ताकाची फार सवय चटकन लागते. ह्या ताकाचे लोणी निघत नाही तसेच ते आंबट पण अजिबात नसते.

आपले घरचे पांढरे लोणी इथे दुर्मिळ आहे. अमूल बटर, तूप मिळते पण थालीपिठावर, गरम भाकरी वरचे लोणी फक्त भारतात आल्यावरच पाहायला मिळते. असे असताना मला फार आनंद झाला. वाळवंटी प्रवासात ताक हे खूपच उपयोगी असते. ह्या ग्रामीण लोकांचा प्रवास पण एका गावातून दुसऱ्या गावापर्यंत पारंपारिक पद्धतीने उंटावरून केला जातो. खारवलेले भाजलेले सुके मासे व ओमान चा खास ग्रामीण भागातला guruz al gamar ( ओमानी ब्रेड) असा सरंजाम प्रवासासाठी असतो.

हा ब्रेड हा ताकाच्या बरोबरीने खाल्ला जातो. जमिनीवर निखारे पसरवून त्यावर अल्युमिनिअम चा पत्रा ठेवतात त्यावर गव्हाच्या पिठाचा गोळा पसरवून ब्रेड चा आकार करून भाजला जातो. हा ब्रेड महिना ते दोन महिने पर्यंत टिकतो. ग्रामीण भागात ही परंपरा अजूनही सांभाळली जाते.

गाई, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, उंट, गाढव असे प्राणी इथल्या खेडेगावात पाहून मला जाणवले की, परंपरा ह्या देशाच्या सीमा रेषा पलीकडे पण एकमेकांकडे फार पूर्वीच सरमिसळून गेल्या आहेत. बुरुड काम, लोकरीचे (शेळ्यांची लोकर) काम तसेच तिथली पद्धत, रूढी परंपरा ह्या जवळच्या वाटल्या. घरे कौलारू नसून धाब्याच्या पद्धतीची होती. साधारण पणे राजस्थानशी साधर्म्य दर्शवणारी होती

इथे मॉल मध्ये किंवा छोट्या फूड स्टफ मध्ये मिळते ते ‘लबान’ पण ह्या पातळ ताकाला ‘लबेन’ (laben ) असे म्हंटले जाते. साधारणपणे इथे मार्च पासून कडक उन्हाळा सुरवात होते. ५० ते ६० डीग्री पर्यंत उन्ही पारा चढत जातो. अशा प्रखर वातावरणात हे ताक म्हणजे जगण्यासाठी वरदान ठरते. हे लोणी गाईच्या दुधापासून काढलेले असल्याने पिवळसर झाक असेलेले होते. मीठ घालून हे लोणी साठवून ठेवतात, सध्या फ्रीज प्रत्येकाकडे आहे पण पूर्वी आपल्यासारखे मातीच्या भांड्यात साठवून ठेवले जायचे.

इथल्या खेडेगावाची तरुण पिढी शहरात काम करायला गेली आहे. परंतु प्रत्येक आठवडी सुट्टीला गावात येतात. जेष्ठ स्त्रिया ह्या पुढच्या पिढीला पारंपारिक गोष्टी आवर्जून शिकवतात. ह्या कातडी पिशवीत थंड पाणी घालून स्वच्छ केली जाते. साधारणपणे एक दिवसाआड लोणी काढले जाते. इथे मैद्याच्या पिठात अंडे घालून आपल्या सारखी ‘कोर रोटी’ बनवतात. ही रोटी किंवा ब्रेड हा हाताने तव्यावर पीठ पसरवून केला जातो. गरम तव्यावर पातळ असा हा ब्रेड अनेक महिने टिकतो. हा पण ताक किंवा लोण्या बरोबर खाल्ला जातो.

ओमानी स्त्रिया ह्या परंपरेवर अधिक भर देताना दिसतात पण त्याच बरोबर काळाची गरज ओळखून नवीन ज्ञान पण घेताना दिसतात. मला भावली ती फोटो मधील ‘दहीवा हमद’ ही मधयम वयीन ओमानी स्त्री. आपल्या पुढच्या पिढी करता खेड्यात राहिली, त्यांना परंपरा शिकवत आहे पण त्याच बरोबर गेले २० वर्ष ती शाळेकरता बस ड्रायव्हर म्हणून काम करीत पण आहे. इथे मार्केट मध्ये ओमानचे पारंपारिक लोणी विकत घेण्यासाठी मिळत नाही. पण लबान व लबेन मात्र उपलब्ध आहे. अशी ह्यांची लोणी काढण्यासाठी झुल्याची पद्धत, त्यासाठी म्हंटले जाणारे गाणे हे मुला एव्हढेच परंपरेवर प्रेम असावे हे पटवून देते झाले. नकळतपणे मी कृष्णाच्या रंगपंचमी निमित्त दही, ताक व लोणी ह्या ओमान च्या परंपरेत अजून एक प्रेमाचा रंग शोधू लागले.

18 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. सुहास
    मार्च 10, 2010 @ 13:35:16

    वाह…खूप दिवसानी पोस्ट टाकलीस.
    जसा तू वर्णन केलस ते लोणी, ताक काय सही लागत असेल नाही? मला हवय ते 🙂

    उत्तर

    • anukshre
      मार्च 10, 2010 @ 14:23:55

      सुहास,
      ह्नं, खरय बऱ्याच दिवसांनी पोस्ट लिहिली कारण लेकाची वार्षिक परीक्षा आज संपली. मला लोणी काढण्याची ही पद्धत वेगळीच वाटली, बाकी गाव मात्र भारतातील राजस्थान ची आठवण करून देणारे असते. बोकोबा, भारतात मिळणाऱ्या लोण्यावरच ताव मारावा,कारण त्याला आईच्या हाताची चव असते.

      उत्तर

  2. महेंद्र
    मार्च 10, 2010 @ 14:24:43

    अजुनही इतके गरीब लोकं आहेत तिथे? आम्हाला तर शेख म्हंटलं की पैसे वाला असंच वाटतं.

    उत्तर

    • anukshre
      मार्च 10, 2010 @ 14:37:24

      महेंद्रजी,
      ही लोक युएइ ची शेख मंडळी नाहीत. गरीब आहेत असे म्हणता येणार नाहीत कारण सरकारी पदे व खाजगी कंपनीत काही टक्यात ह्यांच्या नोकऱ्या कायद्यांनी निश्चित केलेल्या आहेत. भरपूर पगार असतात. शिवाय इथे प्रत्येक व्यवसायात त्यांना पार्टनर करून घ्यावेच लागते. गावातील घरे साधीच आहेत, कारण त्यांची वर्षानुवर्षाची परंपरा घरांची आहेत. साधी राहणी आहे. दुबई सारखा रुबाब दाखवत नाहीत.

      उत्तर

  3. आनंद पत्रे
    मार्च 10, 2010 @ 17:23:07

    छान… बरीच नविन माहिती मिळाली

    उत्तर

  4. Ashwini
    मार्च 11, 2010 @ 09:01:00

    asha padhticha zoka ethe pan bandhatat …….. maze Baba sheti kartat aani tithe kama la yenarya bayaka hyach padh ticha zoka (3 kathya) tyacha bala sathi karatat …………. baki post mast mag kadhi yenar bhartat 🙂

    उत्तर

    • anukshre
      मार्च 11, 2010 @ 11:19:10

      अश्विनी.
      अगदी बरोबर आहे आपल्याकडे असा झुला पाहायला मिळतो तो बाळांचा पण इथे फक्त ताकाचा असतो. मी जून ला भारतात येणार.

      उत्तर

  5. देवेंद्र चुरी
    मार्च 11, 2010 @ 21:14:33

    तिथल्या संस्कॄतीची चांगली ओळख करुन दिली आहे तुम्ही इथे…

    उत्तर

    • anukshre
      मार्च 13, 2010 @ 15:03:02

      धन्यवाद देवेंद्र. ओमान बद्धल खूप काही अजूनही माहिती आहे. पाहून बराच काळ झाला की विसरायला होते म्हणून सध्या तरी अशाच पोस्ट द्यायच्या ठरवल्या आहेत. आवर्जून वाचता म्हणून खूप छान वाटले.

      उत्तर

  6. गौरी
    मार्च 13, 2010 @ 20:01:50

    अगं आईकडून ऐकलं होतं की आफ्रिकेमध्येसुद्धा ताक करण्यासाठी दही / साय चामड्याच्या पिशवीत घालून हलवतात म्हणून … अर्थात तिथे (केनिया / टांझानियामध्ये) असा झुला असतो का ते माहित नाही. मस्तच माहिती दिली आहेस पोस्ट मध्ये.

    उत्तर

    • anukshre
      मार्च 14, 2010 @ 14:29:35

      आईकडून अजून माहिती मिळवून लिही की, इथे खूप ओमानी लोकांची कायमची घरे टांझानियात आहेत. त्यांच्या खूप पत्नी असतात बऱ्याच जणांचा घरोबा आहे त्यातूनच पद्धती इकडून…तिकडून एकमेकांकडे सरमिसळ झाल्या आहेत.

      उत्तर

  7. Nilima
    मार्च 14, 2010 @ 12:26:24

    wow taka cha zhula!!!! agdi vegali mahiti aahe devandrani mhantlya pramane kharch tumhi oman chi changali aolakh karun dili mala tar mana pasun vattay ki oman la bhet dyavi baghu kadhi vel yete 🙂 aani tumhi june la janar indiat mhanje purn june tumchi ek hi post rahanar nahi 😦 hmmm mi may la jate aahe indiala 🙂

    उत्तर

    • anukshre
      मार्च 14, 2010 @ 14:57:38

      नीलिमा, बऱ्याच दिवसांनी आलीस खूप छान वाटले. तू मुंबईत आहेस का जून मध्ये मग आपण भेटू शकतो की. इथे शेजारी देशात राहूनही भेट मुश्कील होते हरकत नाही तिकडे भेटू…. जून च्या पोस्ट नसतील कारण घरचे आधी मग नेट इकडे आल्यावर… सगळ्यांशी खूप गप्पा करायच्या आहेत नेट मध्ये वेळ का द्यायचा?? तू तुझा तिकडचा मोबाईल नंबर मला मेल कर. मी जरूर भेटेन…. काळजी घे, आईचे सर्व ऐक( ताई म्हणून न विचारता दिलेला सल्ला) ….

      उत्तर

  8. ravindra koshti
    मार्च 14, 2010 @ 22:02:13

    अनुजा, तुमचा स्वभाव माझ्या सारखाच आहे. जेथे जाणार तेथे शोधात राहणार. मला अशी लोक खूप आवडतात. मी जपानला गेलो होतो तेव्हा तेथील कावळ्या कुत्र्या पासून घर दार सर्व बघत होतो. तेथील कावळे आपल्या कडील कावळयांपेक्षा वेगळ्या आवाजात काव काव करतात.हे सुध्दा निरीक्षण केले होते. हे असेच सुरु ठेवा.

    उत्तर

    • anukshre
      मार्च 17, 2010 @ 12:49:52

      धन्यवाद राविन्द्रजी,
      मला इकडे पण कावळ्यांच्या आवाजाचा हाच अनुभव आहे. दमदार कर्कश आवाज नाही, अशक्त आवाज वाटतो. इकडे जोरदार पाऊस , किंवा वाळवंटाची वादळे येणार असली तर शेकड्यांनी कावळे एक दिवस आधी विजेच्या तारांवर एकत्रित पणे बसलेले दिसतात. आपण माझा स्वभाव बरोबर ओळखलात, असे काही पहिले की सर्वाना सांगावयास पण खूप आवडते. आपले प्रोत्साहन पण लिहिण्याची उर्मी देणारे ठरते मनापासून आभारी आहे.

      उत्तर

  9. sureshpethe
    मार्च 23, 2010 @ 21:56:02

    हे छानच आहे ताकाला भांडे लपविणे वगैरे प्रकार नाही !! तीन काठ्यांवर सगळं कसं खुल्लमखुल्ला !

    …..

    कावळ्यां बद्दल काय म्हणलंत ? तिकडे पाव्हणे फार ये नाहीत का ?

    …..

    अच्छा तू ही जून मध्येच येणार काय….तन्वी पण येत्येय ना ? दोघी बरोबर येताय काय?

    उत्तर

  10. akhiljoshi
    मे 25, 2010 @ 16:33:36

    खूप दिवसांनी प्रतिक्रिया देतोय खरा, कदाचित काहीतरी चुकुचे लिहिले जावू नये हीच इच्छा..
    लेख वाचला.. असे नाविन्यपूर्ण लेख वाचायला बरे वाटते… कधी कधी असा उत्साह लोकांकडे कसा येतो…? याचाच
    प्रश्न पडायचा.. पण त्याचे उत्तर आपल्या आताच कुठेतरी दडलेले असते हे हि खरे..
    उत्साह हि एक आंतरिक उर्जा आहे…ती आतल्या विहिरीतूनच येते.. असो..
    खूप जुने दिवस आठवले…म्हणजे आता ते जुने घरही नाही आणि आजीही नाही..
    पण दही रवीच्या सहय्ये घुसल्याची… मग त्याचे टाक होताना लोणी यायचे ते आजी साठवायची.
    फक्त लोणीच नाही.. अगदी घरगुती श्रीखंडाची हि तयारी आठवली .. मग तिच्या हाताचा बरोबर ३ वाजता होणारा चहा..
    चहा हि हल्ली दुधाचा नाही काही.. पाण्यात चहा पावडर टाकून मस्तपैकी उकळी येवू द्यायची.. मग त्यावर झाकण ठेवून
    तो मुरु द्यायचा आणि मग दुध टाकून प्यायचा….. त्याची मजाच वेगळी.. (हल्ली बहुतेक दुधात पाणी आधीपासूनच असते त्यामुळे
    दुधाचा चहा करायची पद्धत रूढ झालेली दिसते..) एकंदरीत सगळ बालपण आठवल.. उन्हाळ्याची सुट्टी हि चालू आहे..
    ढप , गोट्या, लगोरी, आत्या पाट्या, कुणी खेळताना दिसत नाही.. जास्तीच उकडत म्हणून लोक बाहेर पडतात हल्ली….
    कुणी badminton खेळत असत इतकाच.. असो.. वाटलाच प्रतिक्रिया देताना भरकटेन म्हणून…
    छान वाटला लेख… बाकीचेही वाचीनच… आतापुरते एवढेच…

    उत्तर

Leave a reply to ravindra koshti उत्तर रद्द करा.