बस्ता जिव्हाळ्याचा………….भरजरी आठवणींचा

‘शालू हिरवा,…………. साजणी बाई, येणार साजण माझा……….

लग्न घटिका ही मनात अशीच ध्रुव पदासारखी अढळ जागा करून स्थिरावलेली असते. अक्षता, आशीर्वाद यांच्या जोडीला साज शृंगार सांभाळून, वधू भांबावलेली असते. त्यात ‘शालू’ आवरून, सावरून दमणूक होते. सध्या ‘शालू’ ला आधुनिक पर्याय स्वीकारले जावू लागलेत. पण लग्नाचा शालू हे अनुभवणे हे, ‘जावे त्याच्या वंशा’, सारखे असते. अतिशय संवेदनाक्षम अशी ही खरेदी असते. जोडीदार निवडणे हे एक वेळ सोपे ठरेल पण तिचा शालू…….तिची भावना ह्यात माहेर व तिचे होणारे सासर, (प्रेमविवाह असो की, पसंती विवाह) गुंतलेले असते. कधी ज्या, त्या ,पार्टीने आपापली खरेदी करायचे ठरते, तर तुम्ही खरेदी करा, आम्ही पैसे देतो असा समंजस पणा असतो. बदलत्या विचार प्रवाहात वाग्दत्त वधूवरा वर तुमच्या आवडीप्रमाणे घ्या असा व्यापक दृष्टीकोन असतो. अजूनही, ‘लग्नाचा बस्ता’ म्हणजे कपडेपटा सहीत देणे-घेणे काही ठिकाणी ठरवतात. हा बस्ता पुणे, नगर. जळगाव भागात दुकानाच्या जाहीरातीत अधिक दिसून येतो.

पांढऱ्या शुभ्र चादरी, लोड, गुबगुबीत गाद्यांवर घालून, थंड सरबताने आपले स्वागत दुकाने करतात. मी पण बस्ता करता मैत्रिणीच्या लग्नासाठी तिच्या सहीत सहभागी झालेले होते. कसे काय ठरवतात हे पाहण्याची मला जाम उत्सुकता होती. कारण ही विवाहवेदी मला सुद्धा चढावी लागणार होती. इकडच्या गादीवर १५ जण मुलीचे, तिकडे पण तेवढेच. मध्ये दुकानाचा इवेन्ट मालक बसला होता. घरातल्या मानाचे वैगरे कपडे निवडले गेले. आता शालू चा गठ्ठा मलमललीच्या वेष्टनातून उलगडला गेला.

एकेक, शालू सर्वांच्या हातातून फिरत होता. पैठणी, शालू, हिऱ्याची निदान एक छोटीशी अंगठी ही राजेशाही स्वप्ने मुलींच्या मनात नैसर्गिक असतात. माझीही होती. वर वधू त्यांचे नातेवाईक, त्याचा मित्र, तिच्या मैत्रिणी ह्यांच्या हातातून शालू फिरत होता. हा नको, तो नको करत, सर्व संमतीने एक शालू निवडला. पुन्हा तो सर्वांच्या हातातून फिरला. माझी चुळबुळ चाललेली होती. हिला आवडला का कधी विचारणार? सासर्यांनी विचारले, सुनबाई पसंत आहे का शालू? तिने हो म्हटले, आणि मुंबईच्या, तुमच्या मैत्रिणी त्यानला पसंद पडला की नाही. मी पण मान डोलावली. मला ही एक साडी त्यांनी निवडली.

तिला मी एकटी आहे असे पाहून विचारले, खरच आवडला का? ‘हो’, असे ठामपणे बोलली. अग, तू त्याला विचारलेस का? त्याने मला तेंव्हाच सांगितले. कधी? मी गोंधळले! कारण, तो फक्त हसून गेला मग बोलला कधी? तुझे लग्न ठरले की, कळेल तुला. मी गप्पच झाले. लग्न, सोन्याच्या तारा नी बनवलेल्या शालूत पार पडले. बाईसाहेब मला बाय करून पळाल्या.मी मात्र हे कोडे कधी उलगडेल ह्या विचारात जयश्री गडकर, सीमा देव, अगदी अलका कुबल पण आठवत राहिले. शालू चा नखरा, त्याचे सौंदर्य, त्याचे हळवेपण सिनेमातून माझ्या मनात बिंबले होते.

माझे लग्न ठरले. आंम्हाला दोघांना खरेदी साठी पाठवायचे ठरले. दादर ची निवड केली. शालू घेवूया, मस्त जेवूया असा फर्मास बेत मी केला. प्लाझा चा भाग तसा फिरण्या करता मस्तच आहे. आता दुकानाची नावे आठवत नाहीत पण अलंकारिक, भावूक नावे असतात. हे दुकान झाले, ते पण पाहूया…….असे करत करत आम्ही फिरत राहिलो.

सगळ्या नट्यांच्या जागी मी मला पाहत होते. सोपे असते, असा माझा समज होता. गेले दुकानात घेतली साडी, बाहेर पडले, हा सरळ हिशोब मी करत होते. ह्यांची कपडे खरेदी करता निवड चांगली आहे. ही माझ्या जमेची बाब होती. शालू निवडला, ‘हे’ विचारात होते की, आवडला का? हो, नाही, म्हणायच्या आत, माझे मात्र डोळे पाण्याने डबडबले. आज प्रथम मी फक्त माझ्याकरता साडी घेतली. आईच्या साड्या बिनदिक्कत उचलून नेसत होते. आज आईशी वाद घालता येणार नव्हता. आईने तुझी निवड छान असेलच असा विश्वास ठेवून पाठवले, पण त्या वेडीला कळेल का? तिचे कपाट मला उचकायला आवडते.

ह्यांनी विचारले आईची आठवण आली का? भोकाड पसरून जोरात रडावेसे वाटले. ‘हे’, समंजस पणाने म्हणाले, आपण उद्या पुन्हा येवूया, आईला घेवून चालेल?. मी बुक करून ठेवतो. आईला फोन केला, तर ती ओरडली, रिकाम्या हातानी परत यायचे नाही. (इतकी का ही दुष्ट झाली? आज मला ती हवी आहे) तर म्हणते, जावयांच्या आवडीचा घे. चांगला असेल, खोड्या काढू नकोस. मला लग्नाचा बस्ता आठवला, माझ्या बरोबर कोणी नाही. घरी गेल्यावर आईशी भांडायचे ठरवले. दादर चौपाटीवर भटकून आलो. घरी येई पर्यंत रात्र झाली.

सकाळी पहिले तर, मला मावशी उठवत होती. गाईच्या डोळ्यात कशी तृप्तता दिसते तशी मला आईच्या चेहऱ्यावर दिसत होती. ती अतिशय प्रेमाने शालू वरून हात फिरवत, माझ्या सासूबाई ना शालू दाखवत होती. नंतर अनेक वेळा, तो शालू अनेक हातात फिरत होता. प्रत्येक वेळेला तिचे डोळे तसेच असायचे, प्रत्येक हात आपले स्वप्न पुन्हा स्पर्श करून पाहत होता. बहिणी, आपला जोडीदार असा असेल, अशी स्वप्न माझ्या शालूत डोकावून पहायच्या. आईचा प्रेमाचा बस्ता अनेक वेळा मी अनुभवला.

माझ्या जोडीदाराला माझ्या डोळ्यातला ‘होकार’ मी न बोलता कसा कळला?, हा मैत्रिणी बद्धल चा प्रश्न मला आज उत्तर देता झाला. लग्नात, ह्यांनी, फुलांच्या ताटातील मोगऱ्याचा गजरा हळूच पणे हातात दिला, आणि हिऱ्यांचा मुकूट मला मिळाला.

माझा शालू तसा तो लग्नानंतर पडूनच होता. अजून खराब होईल, कोणीतरी वापरेल असा माझा विचार होता. शालू द्यायचा नसतो. वधूवस्त्र असते. ही भावना जपतात.

लेक सासरी सुखी आहे, हे शालू जेंव्हा जिरतो, विरतो तेंव्हाच आईला समाधान मिळते. सांभाळून ठेवला आहे. कन्या म्हणून जन्मून मी, भरजरी शालूत सासरी राहते.

11 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. Ashwini
    नोव्हेंबर 17, 2009 @ 07:09:33

    ekdam chan lihila aahe ……… mana pasun awad la 🙂

    उत्तर

  2. anukshre
    नोव्हेंबर 17, 2009 @ 07:26:06

    thank u dear.

    उत्तर

  3. sahajach
    नोव्हेंबर 17, 2009 @ 07:45:33

    मस्तच लिहीलयेस ताई……मला माझा शालू आठवत राहिला….
    आमच्या लग्नाच्या बस्त्याची खरेदी २५ मिनीटात संपली होती….त्यात माझ्या साड्या, आणि अमितचे कपडे सगळे पटापट आवरले होते आम्ही कारण औरंगाबादला पोहोचायचे होते लगेच…..तरिही ते कपडे मनाच्या खूप जवळ आहेत….

    उत्तर

  4. महेंद्र
    नोव्हेंबर 17, 2009 @ 10:21:44

    हे शालू जेंव्हा जिरतो, विरतो तेंव्हाच आईला समाधान मिळते.

    Good post.. 🙂

    उत्तर

  5. महेंद्र
    नोव्हेंबर 17, 2009 @ 18:39:13

    ते शेवटलं वाक्य अतिशय सुंदर आहे.. अगदी मनापासुन आवडलं. अहो शालु चा परकर होतो मुलगी १२-१४ ची झाली की. मग नंतर जेंव्हा तो परकर लहान होतो तेंव्हा तो फेकुन देतांना खरंच डोळ्यात पाणी येतं. मी दोनदा पाहिलंय.. आईला आणि बायकोला..

    उत्तर

    • anukshre
      नोव्हेंबर 17, 2009 @ 20:49:21

      आई स्वताचे बालपण पुन्हा पाहते आणि लेक सासरी जाणार आहे. हे मनाला बजावते.असाच भरजरी ठेवा ,पुढील पिढी करता असावा असा त्या अनुभवी शालूचा आशीर्वाद लाडली करता देते.
      नवीन जन्मलेल्या बाळाला घरी आणताना भावंडाचे अंगडे घातले जाते. त्यामागे हीच भावना हाही असाच मोठा होऊदे. विषयांतर होते,
      पण हीच परंपरा जिव्हाळ्याची आहे. पुन्हा आवर्जून आपल्या भावना दिल्यात, छान वाटले.

      उत्तर

  6. HEENA
    नोव्हेंबर 18, 2009 @ 10:22:41

    हिरवागार शालू छान वाटला आणि लेख वाचून आठवणींची सोनेरी पानं भराभर उलटली गेली. आईबाबांचा प्रेमळ चेहेरा, ताई ची थट्टा-मस्करी आणि बराच काही ….जे शब्दाद सांगता येणार नाही. फक्त एवढेच सांगते माझाही हिरवाच शालू गुपचूप आईचा कपाटात मलमली वस्त्रात बांधून ठेवला आहे. आता सुट्टीत जाईन तेव्हा परत एकदा काढून पाहीन …….व आठवणीत रमून जाईन …..हो तुझीही आठवण काढीन तेव्हा ……

    उत्तर

  7. bhaanasa
    नोव्हेंबर 19, 2009 @ 19:51:57

    अनुक्षरे आमची खरेदी आठवली…..:) एक वेगळेच जग असते त्यावेळी आपले. अगदी आनंदाच्या लहरींवर लहरी. माझ्या आजीचा शालूही अजून आहे.अप्रतिम. खरेय गं…..या शालू सोबत् किती आठवणी जोडलेल्या.
    लेख छान.

    उत्तर

Leave a reply to महेंद्र उत्तर रद्द करा.