दीपावली झाली म्हणून हुशः करून बसले. दीपावली करिता म्हणून काढलेले रांगोळीचे डबे, लायटिंग च्या माळा, पणत्या…..एक न दोन अशा सर्व गोष्टी पुढील वर्षापर्यंत नीट राहाव्या म्हणून कपाटात ठेवण्याकरिता कपाटाचे दार उघडले, अरे ! हे काय कपाट भरलेले.आपणच भरतो, आणि पुन्हा अगम्य असे रहस्य वाटून कपाटासमोर स्थितप्रज्ञ होतो. मी ही असच केले होते, आलीया भोगासी……असा दीर्घ श्वास घेत आता आवरायला पाहिजे अशी जाणीव प्रकर्षाने होऊ लागली, आणि कपाटात जागा निर्माण करण्यासाठी, घरभर माझी पळापळी सुरु झाली. घरातल्या शोकेस ने तोंड वेंगाडले, मुलांच्या कपाटाने अंग झटकले. पोटमाळ्याने पण मला झिडकारले. ह्यांचे कपाट तर माझ्या पर्स मधल्या सामानासारखे अस्ताव्यस्त असते. खिन्न झाले.काय करावे ? कसे आवरावे ? सुचेना काही.
माझ्या कपाटा समोर योध्या सारखी सामोरी गेले. एक भली मोठ्ठी पिशवी, रंगीबेरंगी दिसली म्हणून उघडून पहिली, तर दीपावलीच्या भेटवस्तू होत्या. त्यांचे आकर्षक वेष्टन सुद्धा दूर करू शकले नव्हते. मुकेपणाने.अडगळीत पडल्या सारख्या केविलवाण्या भासल्या. कधीही न लागणाऱ्या,गरज नसलेल्या,भारी किमतीच्या,बेताच्या दर्जाच्या टिकाऊ ,टाकाऊ भेटी होत्या आपल्या मालकांचा दर्जा दर्शविणाऱ्या, भावनांपेक्षा, औपचरिकता अधिक होती.माझे घर ‘ जगत मित्र ‘ प्रमाणे तुपातल्या पिठीसाखरे सारखे सण आले कि, पाहुणे, आप्त, स्नेही, कार्यालीन ओळखीचे ह्यांचात रमते. माणसांची ओढ त्यांच्या भेटवस्तू मुळे अशी अंगावर येते.काहीही आणू नका असे निक्षून सांगितले तरि,हातात ठेवले जाते.पुन्हा त्यांच्या कडे जाताना त्यांच्या भेटवस्तू च्या किमतीचा विचार करून रिटर्न गिफ्ट देणे भाग पडते. अभिमन्यू चे चक्र आठवते.
कपाटाचे खूप झाले कि काय मला फ्रीज आठवला, धावले तिकडे ह्यावेळी मिठाई व चौकलेट यांनी गर्दी केली होती, सुकामेवा महाग झाल्याने हा पर्याय ! फ्रीज च्या बाहेर ठेवणे शक्य नाही. कसे निस्तरायचे सगळे , विचारांचे चक्र गरागरा फिरत होते.
उचलून देऊ का कोणाला? कामवाली, सोसायटीचा राखणदार, दुधवाला, पोस्टमन सगळे दीपावलीचे पैसे मागतात, तुमच्या वस्तू घेऊन ठेऊ कुठे विचारतात. खरे आहे. ह्या भेटवस्तूंच्या व्यापात फराळाचे ताट आठवले, प्रत्येका कडून प्रेमाने ताट यायचे, कौतुक, जिव्हाळा जाणवायचा,कितीही खाल्ले तरि कंटाळा नाही यायचा, कॅलरीज चा विचार स्पर्श पण करत नव्हता.नात्यांना उब मिळायची. हं गेले ते दिवस ! हे तर दिवाळीचे, पण गणपती म्हणजे मोदकांचे ढीग, फळांची रास, नका हो ठेऊ तर भावनांचा प्रश्न ? एक मस्तक, दोन हस्त, चांगले मन पुरेसे नाही का सणांना ? घर सोडून बाहेर जाता ही येत नाही कारण घरी सण असतो मग हे वेळच्या वेळी संस्थाना पाठवणार तरी कसे ? शोकेस च्या वस्तूं चा आश्रमांना काय उपयोग ? घरचे एवढे सारे तर सार्वजनिक ठिकाणी ? कोण आवर घालणार ? भावनांच्या मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
लग्न समारंभात ‘ कृपया, आहेर आणू नका, पुष्प पण नको,आपली उपस्थिती हाच आमचा आनंद ‘ असे आमंत्रण मिळते. अशीच शुभेच्छा पत्रे आमंत्रणाची सणांना मिळतात का? आपणच तयार करावी हे बरे होईल.फटाके करिता जनजागृती होतीय, मग भेटवस्तू करिता काहीतरी असेलच……. की नाही. सुरवात आपण करावी,थोड्या फार फरकाने ह्या परिस्थितीत सगळे कधी ना कधीतरी असतोच. विचारांचे चक्र, मनात आंदोलन देते झाले.
भेटवस्तू सणाच्या देणे,घेणे चालू ठेवायचे तरी किती,
हे सारे थांबावे ,पैशांचा अपयव्य टाळण्यासाठी,
घरापासून सुरवात आपण करणार तरी कधी ?
भेटवस्तू ह्या प्रेमाच्या,जिव्हाळ्याच्या निदर्शक असतात. चांगल्या संकल्पनेचा अतिरेक होऊ नये. पुस्तके,कुटुंबाकरिता खरेदी कुपने, ग्रंथालयाची फी, प्रवासाचे प्रवासी चेक, आरोग्य तपासणी फी अशा अनेक माध्यमातून आपण भेटवस्तू देऊ शकतो. फक्त परिवर्तनाची तयारी दाखवली पाहिजे.
ऑक्टोबर 23, 2009 @ 10:05:33
अभिनन्दन… पहिली कॉमेंट माझी या ब्लॉग वर..
मी स्वतः तंबी दुराईचं दोन फुल एक हाफ हे पुस्तक बऱ्याच लोकांना भेट दिलंय. जर कधी बजेट कमी असेल तर उदासबोध – पाडगांवकरांचे हे पण एक चांगलं पुस्तक आहे भेट म्हणुन द्यायला. नविन लिखाणासाठी शुभेच्छा…
ऑक्टोबर 23, 2009 @ 13:59:54
@महेंद्र, राजेश, आणि तन्वी- प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद……. सुरवात तर केली आहे.
ऑक्टोबर 23, 2009 @ 12:45:44
good start. keepit up. i think spelling of anukshre should be anukshare.
ऑक्टोबर 23, 2009 @ 13:12:06
मस्त झालीये सुरुवात…..आता keep blogging……
ऑक्टोबर 23, 2009 @ 14:30:53
चला आजपर्यंत फक्त कमेंट वाचायला मिळायाच्या. . . .आता ब्लॉग!!!! क्या बात है!!!! Keep Blogging!!
ऑक्टोबर 23, 2009 @ 15:06:27
मनमौजी जी प्रतिक्रिया हीच प्रेरणा असते. आपले स्वागत आहे.
ऑक्टोबर 24, 2009 @ 06:42:31
अनुक्षरे अनेक शुभेच्छा! मीही बरेचदा पुस्तकच भेट देते.[:)]देणारा व घेणारा दोघेही आनंदी.
ऑक्टोबर 24, 2009 @ 07:51:52
भानस, प्रतिक्रिये बद्धल धन्यवाद, विषय तसा नवीन नाही, बऱ्याच वेळा चर्चिला गेला आहे. एक प्रयत्न लिहिण्याचा केला. आपले ‘अनुक्षरे’ मध्ये स्वागत आहे.
ऑक्टोबर 24, 2009 @ 17:35:27
नाव “अनुक्षरे” खूप आवडले आणि लिखाण नेहमीच आवडते…या विषयावर अजुन एका ठिकाणी पण मी लिहिलं होतं तेच इथे. सगळीकडे आता गिफ़्ट कार्ड मिळतात ती दिली तर मालक त्याला हवे ते घेऊ शकतो. पुस्तकांसारखं दुसरं चांगलं गिफ़्ट नाही. सगळ्यांना कळत फ़क्त वळवताना मला वाटतं आपण ते विसरतो. ही पोस्ट खूप छान आहे…सामान आवरण्याच्या माझ्या पळापळीत नेहमीच आठवेल. आणि हो सगळ्यांची कपाटं आपल्यासारखीच ही भावना खूप छान वाटते. या विकेन्डला तरी घर आवरणे नाही…..:) आता नेहमीच लिहित राहा…
ऑक्टोबर 24, 2009 @ 20:34:53
अपर्णा, तुझ्याच प्रतिक्रियेची वाट पाहत होते. मलापण कपाट आवरताना हि पोस्ट सुचली. विषय तसा जुनाच होता.पण प्रत्येकवेळी आवारा आवरीत नवीन अनुभव येतो. आपणच आपली समजूत काढायची, सुचलेल्या कल्पनेमध्ये खुश व्हावयाचे आणि लिहायचे. तुला नाव आवडले, मी खुश झाले. अनुक्षरे मध्ये स्वागत.
ऑक्टोबर 24, 2009 @ 18:05:10
अनुजा, नवीन ब्लॉगबद्दल अभिनंदन! मीही बहुधा पुस्तकंच भेट देते … ‘The Little Prince’ तर इतक्या लोकांना भेट दिलंय !
ऑक्टोबर 24, 2009 @ 20:37:22
गौरी, तुझे मनापासून स्वागत. तू भेट देशीलच याची खात्री होती.
ऑक्टोबर 25, 2009 @ 10:29:35
congrats!! for ur new blog.I like the topic “bhetvastu”. I feel that some gifts r very special and so also the person who gives gift to u. DOESNT’ matter how valuable the gift is..but it’s a token of love which u can remember rest of ur life…whether its a book,greeting or even some flowers…flowers may dried or colours may feaded some r keeping it inside a special book secretly ….thus we recall the memories of beloved one. likewise I also gives gifts to others and thinks that they may keep it in their house or in the overloaded cupboard…even if there is no plce to keep it but may be some place in their hearts for that gift.
ऑक्टोबर 28, 2009 @ 11:45:01
अभिनंदन, शेवटी स्वतःच्या ब्लॉगचे आपण मनावर घेतलेत तर. माफ करा, कमेंट साठी थोडा उशीरच झाला. असो. छान जमली आहे पोस्ट
मला वाटतं भेटवस्तु देण्यात गैर काही नाही, फक्त ती औपचारीकता असु नये, मनापासुन दिलेली असावी. उदा. क्रोकरी. इकडुन आलेली तिकडे द्यायची देण्याऱ्याने तोंड वाकडं करुन द्यायची आणि घेण्याऱ्याने शिव्या देत स्विकारायची याला काही अर्थ नाही.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा
नोव्हेंबर 02, 2009 @ 09:04:27
हीना, अनिकेत,
पुढील पोस्ट लिहिताना मागोवा घेतला. आपल्या माणसांच्या प्रतिक्रिया हीच अनमोल भेट आहे. अशीच भेट मला आपल्याकडून नेहमी घेण्यास आवडेल.
डिसेंबर 03, 2009 @ 23:39:47
अनुक्षरे उर्फ़ अनुजा …बरं झाले लिंक दिलीत … (मागे महेंद्रदादाने मला तुमच्याबद्दल सांगितले होते.. होय तुमच्याबद्दलच बहुदा.) कश्या आहात? ठाण्याची माणसे भेटत आहेत हे पाहून बरे वाटते.. आता तुमचा ब्लॉग सुद्धा वाचून काढतो … 🙂
डिसेंबर 04, 2009 @ 10:28:29
रोहन,
होय. मीच अनुजा, महेंद्रजी नी तुला सांगितले होते. प्रथम माझ्या ब्लॉग वर तुझे स्वागत! ठाणेकर भेटलो की कित्ती बरे वाटते. माझा ब्लॉग वाचून कळव कसा वाटला. भित्यापाठी……पोस्ट लिहिताना तुझी आठवण आली. तुझ्या पोस्ट वरची खादाडी पाहून माझा लेक हे कराच म्हणून मागे लागतो. ठाण्याची माहिती वाचून घरी गेल्यासारखे होते.नक्की कळवत रहा. तुझ्या अभिप्रायांची वाट पाहते.