वाळवंटी जीवनशैलीच्या संग्रहणीय कलाकृती…….

गडकोट किल्यांचा महाराष्ट्र माझा, कौलारू घरांचा, शेतात डोलणारा महाराष्ट्र माझा, मिळेल का पहावयास पुढच्या पिढीस असा महाराष्ट्र माझा, घराच्या शोकेस मध्ये ठेवण्यास शोधते महाराष्ट्र माझा…. इथे अशा प्रतिकृती पाहून आठवलं ते महाराष्ट्रच असीम सौंदर्य, भक्कम किल्ले, आदिवासी जीवन…..कोल्हापूरला ग्रामीं जीवन शैलीच संग्रहालय पाहण्यास आहे. आपण दीपावलीत किल्ले करतो आणि मोडून पण टाकतो. बाजारात जे तयार किल्ले मिळतात त्या प्रतिकृती तंतोतंत नसतात. अशा काही प्रतिकृती मराठी तरुणानी बनवल्या तर एक आगळावेगळा व्यवसाय निर्माण होवू शकतो. घरात आपल्यालाला कायम स्वरूपी असा छोटेखानी संग्रह ठेवण्यास मिळाला तर निश्चित अभिमान वाटेल. संकृती साहित्यांनी, प्रत्यक्ष पाहून पुढच्या पिढीस संक्रमित निश्चित करता येते. पण कदाचित चीन अशी मॉडेल्स आणून आपल्यालाच विकतील…. इतिहासाच्या गाढ अभ्यासकांनी मनावर घेतले तर तंतोतंत किल्ले बनवणे अशक्य नाही…मला सुचले, इथे पाहून आपल्या करता काही करता येईल का? कोणाला कल्पना सुचवली तर??? माझ्या कडून हा अल्पसा प्रयत्न…. ग्राम विकास साठी पण निश्चित विचार करता येईल.. अभिप्राय जरूर कळवा…….

घरात एक कोपरा विहिरीचा असावा.ओमान मध्ये बऱ्याच आधुनिक सुखसोईच्या अद्यावत बंगल्यांच्या बाहेरील अंगणात छोटेसे गाव साकारलेले असते. अशा विहिरी ह्या त्यांचा अभिमान आहे म्हणून त्यांना खास उभारलेले असते.

मध…मधुमक्षिका पालन ओमानचे.

अरब देशांमध्ये मधाचा वापर स्वयंपाक ते आरोग्य यासाठी अधिक केला जातो. ओमान चा मध हा अत्यंत पारंपारिक पद्धतीने बनवलेला असतो. निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचा वापर प्रामुख्याने असतो. मधुमक्षिका पालन येथे वेगळ्या पद्धतीने केले जाते. येथे प्रामुख्याने खजुराची झाडे प्रंचंड प्रमाणत लावली जातात. खजुराच्या झाडाचे आयुष्य संपल्यानंतर त्याचा बुंध्याचा वापर मधुमक्षिका पालनासाठी केला जातो. बुंधा आतून पोकळ केला जातो. त्यात मधुमक्षिका पालन करतात. नारळ , पपया, पाम, आणि अनेक सुवासिक झाडांचे बुंधे वापरून मधाचे उत्पन्न घेतात. वेगवेगळ्या झाडानुसार सुवासाचा आणि चवीचा मध येथे उपलब्ध आहे. मध प्रक्रियेत मधाला त्या विशिष्ट झाडाचा सुवास लाभतो. असा फ्लेवर्ड मध इथे खूप लोकप्रिय आहे.

Apis millifera and Apis florea. ह्या दोन जातीच्या मक्षिका येथे पालनासाठी उत्तम मानल्या जातात. परदेशी जातीच्या माशा पाळणे इथे कायद्याने बंदी आहे. ह्या जातीच्या माशा इथल्या जातीय आहेत. माऊंटन बी म्हणून ह्या इथल्या हवामानास पोषक मानल्या जातात. ह्या जातीच्या माशा आकाराने छोट्या परंतु खूप कामसू असतात आणि उच्च प्रतीचा मध गोळा करून आणतात. रुस्ताक आणि सलाला ह्या भागात अनेक फळ झाडे आणि फुल झाडे , शेती हि विस्तृत प्रमाणात आहे. ह्या ठिकाणी अशा मधुमक्षिका कॉलोनी खूप आढळतात. तसेच अति डोंगराळ भागात रानटी झुडुपे फुलांची दिसतात. अशा अति उन्हाळी भागात ह्याच माशा अनुकूल आहेत. ह्या जातीच्या मधू मक्षिका राष्ट्रीय संरक्षण प्राप्त आहेत. ओमानला ह्या जातीच्या माक्षिकांचा अभिमान आहे. संपूर्ण आखाती देश ओमान मध्ये येवून मध घेऊन जातात.

खजुराचा बुंधा पोकळ केला जातो त्यास ‘tubl’ असे संबोधतात. अशा टूबल एकमेकावर रचून मक्षिका पालनाच्या विस्तृत अशा मधू मक्षिका कॉलनी येथे आहेत. मध काढून घेण्यासाठी हा बुंधा मागच्या बाजूने उघडत्तात. मधुमक्षिका पालनासाठी सरकार कडून खास मदत दिली जाते. मक्षिका करता येथे डॉक्टर पण आहेत. स्वतःचा व्यवसाय असला तरी हा खूप सन्मानीय येथे मानला जातो. सरकारकडून मटेरिअल, सर्विस उत्पादनाकरीता दिली जाते.

मध पालनाची परंपरा कुराण काळा पासून प्रचलित आहे. पूर्वीच्या इथल्या राजमहालात मध असलेली खजुराची झाडे ठेवण्यासाठी खास खोल्या होत्या. ह्या खोल्या मधून एकेका खळगीत एकेक झाड ठेवून, ते नंतर प्रेस करत त्यातील मध पन्हाळी मार्फत गोळा केला जात असे. अशा खोल्या आजही किल्ले, महाल यांना भेट दिली कि उत्तम स्थितीत बघण्यास मिळतात.

ओमान मध्ये एकंदरीत ३५००० मधुमक्षिका कॉलनी आहेत. जून ते नोव्हेंबर काळात उत्पन्न घेतले जाते. २००८ मध्ये ९६,०२६ किलो मधाचे उत्तपन शेती खात्यात जमा झाले. संपूर्ण आखाती देशात ओमान चा मध निर्यात केला जातो. उच्च प्रतीचा मध तेही सुवासाचा हे मधाचे वैशिट्य…

मधू मक्षिका पालनाची अशी पद्धत वेगळी असल्याने लिहिली.

जागतिक महिला दिन…..

महिला दिन जस जसा जवळ येउ लागतो तसे अनेक लेख महिलांच्या प्रगतीचा आढावा घेणारे वाचण्यास मिळतात. क्षेत्र कुठलेही असो तिने तिच्या जबाबदारीची, कर्तुत्वाची छाप पाडलेली दिसते. घर, शेती, विविध तंत्रद्यान तिने सहज काळाप्रमाणे आणि तिच्या गरजेप्रमाणे आत्मसात केले. तिच्या आवडीप्रमाणे तिचे कामाचे, आवडीचे क्षेत्र पण वेगळे असते. कोणाला घराची चौकट…पती, मुले आणि संसार तर कोणाला आकाशाची भरारी….एव्हढी अफाट कुवत तिच्यात आहे.

आकाशात भरारी घेणारी एखादी पायलट, शेजारच्या गृहिणीची जवाबदारी पार पडणाऱ्या आपल्या मैत्रिणी बरोबर पण रमते, त्यांच्या मैत्रीमध्ये कर्तुत्व आड येत नाही. घराचा उंबरा, पारंपारिक चौकट पण तिला हवीशी असते आणि आकाशात झेप घेणाऱ्या पंखाची पण तिला ओढ असते. हा सहज स्वभावातला बदल स्वीकारणे हे स्त्री च्या रक्तातच आहे. तिच्या प्रकृतीत आहे. जशा संधी येतील, तशा स्वीकारत आपली जवाबदारी पार पडणे आणि तेही हसत मुख राहून, हे वैशिष्ट्य. असे लेख म्हणजे प्रोत्साहन देणारे, कर्तुत्वाला सलाम करणारे, अंतर्मुख करणारे ठरतात. अनेक दिवस मनात ठाण मांडून बसतात. स्त्रीच्या प्रगतीच्या ह्या आलेखात तिला कधी कोणाची साथ मिळते तर कधी ती एकाकी असते. घर ते आकाश ती स्वतः भोवती फिरवत राहते. त्यातच ती आनंदी राहते. जेव्हढे मिळाले त्या संधीचा पुरेपूर मनसोक्त आस्वाद घेण्याची कला तिज जवळ निश्चितच आहे.

एकात एक अशा मावणाऱ्या बाहुल्यांच्या मध्ये पण तिला द्वितीय स्थान असते. प्रथम दर्शनी असते हि पुरुषाची बाहुली. कदाचित हेच दृढ असे जीवनाचे सत्य सर्वसंमत असावे. घरातील सदस्य तिचा सहज आधार घेतात.आतल्या कोशात राहूनही तिच्या आत्मबला मुळे सहज सर्व जवाबदारीवर पूर्णतः यशस्वी होते. ग्राम स्तरावर आणि शहरी वातावरण ह्या प्रमाणे स्त्री च्या व्यक्तीमत्वात, जवाबदारीवर फरक असतो पण कुठेही ती घर दारासाहित सर्वाना सांभाळून घेते. जसा हा सकारात्मक बदल अनुभवास येतो तसेच काही प्रमाणात अजूनही तफावत हि आढळते. उदा. घरचे कितीहि शिकवायला तयार असले तरी ( मागच्या पिढीतील )आई… संगणक चटकन शिकण्यास राजी होत नाही. स्वतःचा इमेल आयडी हि पूर्णतः अगदी घरगुती स्वरूपावर असला तरी सुद्धा प्रत्येकाची वैयातिक बाब आहे. समजा ती गृहिणी असली तर इमेल आयडी चा पासवर्ड सुद्धा ती अतिशय प्रामाणिक पणे मुलां कडून किंवा पतीला तयार करून देण्यास सांगते. पतीचा, मुलांचा आयडी आमचे अतिशय महत्वाचे काम असते उगाच डिलीट काहीतरी होईल म्हणून ते तिला सांगत नाहीत. खरे तर घरात असे काहीच नसते.तिला तिच्या सर्व वैयक्तिक बाबी सुद्द्धा कुटुंबा बरोबरच आवडतात. माझ्या ह्या पिढीतल्या बऱ्याच मैत्रिणी ह्या अशा आहेत. अजूनही असे वातावरण पाहून आश्चर्य वाटते. घरची आणि आजूबाजूची परिस्थिती शिकवण्यास सकारात्मक असेल तरीही हि स्वतः भोवती कुंपण आखून घेते. पासवर्ड न सांगण्याचा घरच्यांचा मुद्दामहून खोडसाळ नसतो. मी व्यवस्थित पाहू शकते हा तिचाच आत्मविश्वास कुठेतरी अजून वाढण्यास हवा. स्त्री ला स्व:ताची झेप ओळखता येते. पूर्णतः आत्मनिर्भर होण्यासाठी अधिक आत्मबल ओळखण्याची गरज अजूनही कुठेतरी जाणवत रहाते. अर्थात सर्व ठिकाणी असे विरोधाभास दिसत नाहीत हि जमेची बाजू.

ज्या प्रमाणे संगणक माहिती करून घेणे हे आजच्या युगात चटकन संपर्क साधण्याकरता खूप गरजेचे आहे तसाच मोबाईल सुद्धा महत्वाचा आहे. माझी आई तर ७० वर्षाची होती. मोबाईल नीट राहावा म्हणून डब्यात घेऊन जात असे मग कुठले कनेक्शन मिळणार?? रस्त्यावर जात असे घरात आम्हाला मात्र ती सुखरूप दिसे पर्यंत चैन पडत नसे. मागच्या पिढीला हे तंत्रज्ञान नवीन होते. माझ्या गृहिणी मैत्रिणी घरात त्यांचा मोबाईल कुठे आहे? तो चार्ज आहे का नाही ह्याचा काहीही थांगपत्ता त्यांना नसतो. नेहमीचे बोलणे ऐकवतात तू नोकरी करतेस म्हणून तुला सवय आहे ह्या गोष्टींची, आम्ही काय घरातच..घरचा न आहे, मग कशाला उगाचच मोबाईल चा त्रास सहन करायचा. हे आणि मुल ठेवतात लक्ष. कमाल वाटते मला अशा बोलण्याची, घरात सर्व सोई उपलब्ध करून दिल्या आहेत न, मग त्या आत्मसन्मानाने स्वीकारायला शिका!!!! काळाची गरज म्हणून तरी निदान!!!

दागिने हा स्त्री चा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असतो अर्थात आवड असेल तर. बाजारातले भाव मधले चढ, उतार ह्याची तिला अद्यावत माहिती असते. अनेक प्रसंगाच्या निमित्ताने दागिने घेतले जातात. ते कधी घेतले?? त्याचा तेंव्हाचा भाव काय होता?? ते किती वजनाचे आहेत ह्या सर्व गोष्टी तिच्या मनात कधीही विचारल्या तरी अचूक माहितीनिशी तयार असतात. ह्या दागिन्याचा कागदावर हिशोब, किवा संगणकावर नोंद, बँक च्या लॉकर मध्ये एक प्रत तिने तयार करून ठेवली तर…तिलाही आणि पुढच्या पिढीलाही उपयोगी पडेल.

एकाच वेळेला अनेक गोष्टींचे भान ठेवून सर्व बाबी पूर्ण करण्याची तिला जन्मतःच क्षमता आहे. अनेक टप्प्यातून ती प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकत असते. स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन तिने तिच्या करता व्यापक करण्यास हवा. ह्या सर्व तारेवरच्या कसरती करताना ती सुपर वूमन बनण्याचा अट्टाहास करत असते. सर्व गोष्टी मीच माझ्या हातानीच पूर्ण करणार. अशा हाताने केलेल्या गोष्टी नेहमीच नीट नेटक्या होतातच पण तिच्या स्वतःच्या बाबी कडे दुर्लक्ष होते. ज्या गोष्टी यंत्राच्या मदतीने करता येणाऱ्या असतील तेंव्हा आधुनिक मशीन ची मदत घ्यावी. सर्व कामे मीच करणार ह्या मध्ये दमणूक मात्र होते. ह्या सर्वाचा परिणाम तिच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. स्त्री ची वैद्यकीय तपासणी नियमित करून घेणे खूप गरजेचे आहे. अकारण जीवतोड मेहनत केल्या मुळे शारीरिक त्रास लवकर सुरु होतो. दर्जेदार आयुष्य जगण्यासाठी ह्या तिच्या यंत्रे किंवा कोणाच्या मदतीने काम करून घेणे पण आज काळाची गरज आहे. अनेक गोष्टी करताना ती स्वताकडे पण तेव्हढेच लक्ष ठेवत असेल तर उत्तमचं परंतु अजूनही अशा मैत्रिणी आहेत. जमेल तेव्हढे समजावून सांगावे.

स्त्री च्या अफाट कर्तुत्वाला एकाच पोस्ट मध्ये सामावणे शक्य नाही. आजच्या युगात आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या मैत्रिणीना माझे विचार सांगावेत म्हणून आजची पोस्ट……..स्वःताचे आत्मबल वाढवा…आजच्या युगात आपल्या घरच्या स्त्रीला आपल्या बरोबर ठेवा. तिने स्वतः भोवती कोश गुंडाळला असला तरी एक व्यक्ती म्हणून सर्वानी निदान घरापासून तरी सुरवात केली तरी माझ्या संगणकावर नियमित येणाऱ्या कोणातरी घरच्या बहिणी, आई, आजी मला आवर्जून सांगेल…बयो..माझ्या मुलाने, नातवंडाने मला तुझ्याशी बोलण्यासाठी तयार केले. तुझी पोस्ट मला वाचण्यास दिली. बस्स….अजून काय हवे??? हि छोटीशी विंनती संगणकावर नियामित् येणाऱ्या वाचक वर्गासाठी….

स्त्री भोवती विश्व सामावलेले असते. आध्यत्मिक प्रांतात पण आईला म्हणजे देवेतेला अग्रस्थान आहे. ती माता….जगन्माता आहेच. ती शक्ती आहे, प्रेरणा आहे….ती मोठी आई आहे.. माझ्या आईला, मोठ्या जगन्मातेला माझ्या गुरु माऊलीला, माझ्या सखींना त्यांच्या भोवतीच्या त्यांच्या जगाला माझा प्रणाम आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!!!

एकच प्रार्थना….स्त्री च्या शक्ती रुपासाठी..

||जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी,
दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा सुधा नमोस्तुते||

शेतकऱ्यांचा मित्र……. जी.पी.एस.

आधुनिक तंत्रज्ञान हे नेहमीच उपयोगी असते. ओमान चा शेतकरी तंत्राद्यानाची मदत घेऊन आपले शेतीचे उत्पन्न नुकसानीत होऊन देत नाही. इथे सरकार दरबारी शेतकरी खूप सन्मानित केला जातो आणि सरकारकडून सर्व मदत दिली जाते. खजुराच्या लाखोंच्या संख्येत असणाऱ्या झाडांवर, शेतीवर दुबास किडीचा प्रादुभाव खूप वाढला आहे. खेडोपाड्यातील शेती ची किडी करता मोजदाद करण्यासाठी शेती विभागाकडून शेतकऱ्यांना जी. पी. एस. सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अति अंतर्गत भागात किंवा दुर्गम भागात सरकारी अधिकारी पोहचे पर्यंत शेतकऱ्याचे अपरिमित नुकसान होते. तसेच कागदोपत्री अशी मोजदाद ठेवणे पण अवघड होऊन बसते. अशा अडचणी येथे पण आहेत. ओमान च्या शेतीचा मुख्य आधार म्हणजे खजुराची झाडे होत. येथील सरकारने त्वरित शेतकऱ्यापर्यंत किंवा किडीचा पादुर्भाव असलेल्या भागापर्यंत योग्य ती उपाय योजना जलद मिळण्यासाठी हि आधुनिक सेवा शेतकऱ्यांना दिली आहे.

लाखोंच्या संख्येत झाडे आहेत आणि किडीचा प्रभाव, वाढ पण तितक्याच संख्येत आहे. हि कीड येथे ‘दुबास’ नावाने संबोधिली जाते. प्रत्येक भागात अगदी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खजुराच्या झाडांची पण मोजणी काटेकर पणे केली जाते. हि कीड झाडातील रस शोषून घेते आणि झाड शेवटी मृत्युमुखी पडते. संपूर्ण देशात युद्धपातळीवर योजना अमलात आणली जात आहे. येथील शेतकरी हे राष्ट्र करता सन्मानीय आहेत.

पिवळसर असलेल्या ह्या किडीची मोजदाद नजरेस पडली आणि येथील वृत्तपत्रातून त्वरित शेतीवर आलेले अस्मानी संकट आणि उपाय योजना सविस्तर सर्वाना जाणवून दिली. अनेक संस्था येथे सरकारच्या बरोबरीने मदत करत आहेत.

प्रत्येक वेळी कीटकनाशके फवारणी हि मार्गदर्शनाने केली जाते तसेच अजूनही काही उपाय आहेत का ह्याची चाचपणी केली जाते. कीटके एकत्र गोळा करण्यासाठी बादली सदृश असा एक वेगळ्या प्रकारचा फासा झाडाच्या बुंधापाशी ठेवण्यात येत आहे. कीटके आतच पकडली जातात आणि आतील विशिष्ट प्रकारच्या वासामुळे आकर्षित होऊन बादलीच्या आतच मरतात.

सरकारने दिलेल्या जी पी एस वर त्या त्या भागाच्या शेतकऱ्यांनी किडीचा पादुर्भाव किती प्रमाणात आहे ह्याची नोंदणी करायची असते त्या साठी हे तंत्रज्ञान त्यांना शिकवण्यात आले आहे. एकत्र येवून आपल्या भागाची चोख पाहणी करणे आणि डेटा एन्ट्री करणे. लगेच तिथपर्यंत
सरकारी अधिकारी आणि शेती तज्ञ पोहचतात. किडीचा पादुर्भाव प्रखर असलेल्या भागाची नोंद मिळत राहते आणि देशभर पसरलेल्या लाखो शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचविले जाते.

अनेक संस्था शेतीच्या कामाकरता पुढे येवून, काही शेतकरी जर दत्तक घेऊन त्यांना आपली अशी खाजगी सेवा देवून काही प्रमाणात तरी शेतीच्या समस्या कमी करण्यास मदत होईलच आणि शेतकऱ्यांना फार मोठा आधार मिळेल.

कदाचित आपल्या ग्रामीण विकासाकरता आपले हे योगदान म्हणजे राष्ट्राचा विकास ठरेल.

मला हि योजना पटली फक्त गरज आहे अशा प्रकारच्या संस्थांची आणि आपल्या शहरी नागरिकांची शेतकरी आणि शेती करता असलेल्या जबावाबदरीच्या जाणीवेची…..कोणी तरी, कुठली तरी संस्था ह्या लेखातून प्रेरणा घेऊन अशी सुरवात करेल हीच अपेक्षा आणि एक चांगली योजना आपण माहिती करून घेण्यासाठी….

ओमान चे प्रसिद्ध गुलाबपाणी …….

ओमान मध्ये जबल अख्तर म्हणून बारा महिने सदा हरित अशी डोंगर रांग आहे. येथेच डिसेंबर महिन्यात बर्फ वृष्टी होते. गुलाबी रंगांची विलक्षण मधुर सुवासाची ओमानी गुलाब शेती येथे प्रसिद्ध आहे. साधारणपणे किंबहुना त्यापेक्षा अधिकच पण ७००० ते ९००० एवढी गुलाबाची झाडे आहेत, ते सुद्धा तेव्हढ्याच समुद्र सपाटी उंचीवर…..मार्च मध्यापासून ते मे अखेरी पर्यंत पूर्ण परिसर हा गुलाबी आसमंताचा होतो. गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क काढणे म्हणजे गुलाब पाणी हि प्रक्रिया असली तरी ती येथे सहज पाहण्यास मिळाली म्हणून जरा वेगळी वाटली. असे गुलाब पाणी म्हणजे ऊर्ध्व पतन प्रक्रिया करून मिळवलेला गुलाबाचा अर्क असतो पण इथल्या पारंपारिक पद्धतीत बघण्यास अनेक पर्यटक मुद्दामहून येतात.

गुलाबाच्या झाडापासून ह्या मोसमात १५ ते २० किलो पाकळ्या मिळतात. दोन किलो पाकळ्या पासून ७५० मिलीलीटर अर्क मिळतो. गुलाबाची फुले भल्या पहाटे तोडली जातात आणि ती स्वच्छ असा पांढरा रंग वस्त्राचा घेऊन त्यात फुले ठेवली जातात. अल दुहाजान म्हणून मातीची बनवलेली चूल असते, त्यावर अल बुरमः म्हणून मातीची सुरई सदृश भांडे असते त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या रचल्या जातात. ह्या पाकळ्यांवर तांब्याचे खास बनवलेले भांडे ठेवून, चुलीवर मातीचे भांडे ठेवून त्यामध्ये थंडगार पाणी भरले जाते पाणी भरलेले मातीचे भांडे मातीने सील ( मातीचे लिंपण करून हवाबंद करणे ) केले जाते. जवळ जवळ चार तास मंद चुलीवर फुले ऊर्ध्व पतन केली जातात. नंतर अल करास म्हणून मातीच्या मोठ्या उभट भांड्यात तीस दिवस झाकून ठेवतात. मग ते पाणी गुलाब पाणी म्हणून तयार होते.

जशी मातीची चूल गरम होऊ लागते तसे अल बुरमः गरम होण्यास सुरवात होऊन आतील तांब्याचे भांडे गरम होते आणि तांब्याच्या भांड्यात पाकळ्यांचा अर्क गोळा होऊ लागतो. एका गुलाबाच्या झाडापासून मोसमात पंधरा ते वीस किलो पाकळ्या मिळतात. दोन किलो पाकळ्या पासून सातशे मि. ली. अर्क मिळतो. जवळ जवळ सर्व अरबी पदार्थात गुलाब जल हे प्रामुख्याने असतेच.

इथे गुलाब जल बनवण्याची प्रक्रिया जबल अक्थर येथे सहज बघण्यास मिळते. ह्या व्हीडीओ मध्ये गुलाब पाण्याची प्रक्रिया दाखवली आहे……..

ओमान मधील बर्फवृष्टी……………….

ओमान मध्ये जबल अख्तर म्हणजे हिरवा पर्वत…..ओमान मध्ये निझवा भागात हा पर्यटकांचा अतिशय लाडका पर्वत आहे. बारा महिने हिरवीगार राहणारी हि डोंगर रांग आहे.
समुद्र सपाटीपासून साधारणपणे दहा हजार फुट उंच आहे. सध्याच्या दिवसात ओमान मध्ये पाऊस पडतो. राजधानी मस्कत मध्ये १४ पर्यंत तापमान खाली गेले आहे तर ह्या पर्वत भागात तापमान उणे दोन झाले आणि बर्फवृष्टी होते. दरवर्षी हा अनुभव येतो. पन्नास पर्यंत तापमान अनुभवयास मिळते तसेच बर्फवृष्टी चा पण आनंद घेण्यास मिळतो.

हाच बर्फ काही फोटो च्या माध्यमातून पोस्ट साठी…….
ओमान मध्ये वाळवंट असूनही इतर आखाती देश पेक्षा हेच ओमान चे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे कि इथे अप्रतिम निसर्ग, डिसेंबर आणि जानेवारीत जबल अख्तर आणि मस्कत मध्ये भरपूर पाऊस, तसेच एकही झुडूप नसलेला अगणित डोंगर प्रदेश,सलाला सारखा भाग तर प्रती आशिया आहे. ओमान मधील प्रत्येक भाग हा स्वतःचे स्वतंत्र भौगोलिक वैशिष्ट्ये असणारा आहे.

बर्फवृष्टी हि दरवर्षी होतेच हि येथील निसर्गाची किमया आहे. वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना, अप्रतिम निसर्ग सौंदर्य अशी एकता येथे आहे. आखाती देशातून, युरोप मधून पर्यटक ओमान बघण्यासाठी खास येतात.

जबल अख्तर हा भाग अतिशय समृद्ध आहे. येथे वर्षभर पूर्णपणे थंड हवामान असते. हा भाग येथील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे डोंगर रांगातून पायऱ्याची शेती केली जाते. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे हिरवेगार डोंगर, वर्ष भर कोसळणारे धबधबे, गुलाब पाणी आणि अत्तरासाठी येथे खास गुलाबी रंगाच्या गावठी जातीच्या पण अत्यंत सुवासिक अशा गुलाबाची शेती अक्खा परिसर सुगंधित करते, तसेच येथील डाळिंबे पण जगात अव्वल आहेत. असंख्य फळझाडे, फुले, शेती आणि उंच डोंगर रांगा ह्यामुळे वर्षभरपर्यटक येत असतात.

येथील दरवर्षी होणारी बर्फ वृष्टी पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी खास पर्यटक निवास उपलब्ध आहेत. येथे फक्त मोठी गाडीच घेऊन जाता येते असा शासकीय नियम आहे कारण वळणाच्या, उंच कडे कपारीचा हा प्रदेश आहे. येथील बर्फ वृष्टी हि साधारणपणे महिनाभर टिकते इतका घट्ट थर बर्फाचा जमलेला असतो.

ह्या वर्षीचा पहिला बर्फ कालच पडण्यास सुरवात झाली. तापमान उणे दोन असे होते. आत्ता हळूहळू बर्फाचे थर वाढत जातील आणि महिनाभर तरी हा बर्फ वृष्टीचा आनंद घेता येतो. उन्हाळ्यात ५० अंश पर्यंत उन्ही पारा वाढतो आणि थंडीत बर्फही ओमान मध्ये नवीन वर्षाच्या स्वागता करता हजर होतो. अशी तापमानातील, वातावरणातील विविधता अनुभवण्यासाठी आखाती देशामधील एकमेव ओमान.

माळ्यावरची ट्रंक…….एक पूर्ण विद्यापीठ.

माळ्यावरती एक ट्रंक कायम असते. तिचा रंग उडून गेलेला असतो तरी पण तिच्यावर प्रेम कायम असतेच. घरातील बच्चे मंडळीची उत्सुकता कायम ह्याच ट्रंक भोवती रुंजी घालत असते. असत काय ह्या ट्रंकेच्या पोटात??? म्हणण्यास निरर्थक पण कधीतरी उपयोगी पडेल म्हणून साठवलेले बरेच काही. अशी ट्रंक आजीच्या/आईच्या काळात मुली लग्न करून सासरी जाताना घरी घेवून जात असत. मग तर काय त्या ट्रंकेला बहुत सन्मान असणे स्वाभाविक आहे.

पूर्वी घराची छोटी छोटी दुरुस्ती घरीच करत असत. जेंव्हा गरज पडत असेल तेंव्हा खास रविवारी अशी ट्रंक माळ्यावरून वडील आमच्या कडून काढून घेत. मग काय त्या ट्रंक भोवती आम्ही भावंडे डोकावून पाहत राहायचो. आई, स्वयंपाक घरातून म्हणायची माहेरून आणली आहे हि ट्रंक…एकदा रंग द्या तिला. ह्या ह्या अपेक्षित वाक्यामुळे वडील मिस्कील हसत.

ह्या जादुई पेटीतून असंख्य खिळे, निरनिराळे नटस्, पाने, जुन्या जुन्या वायरींची भेंडोळी, वापरात असलेले पण नवीन पद्धतीचे बसविले म्हणून पेटीत गेलेले पंख्याचे बोर्ड, जुनट अशा प्लास्टिक च्या पिशव्यातून भरलेले, बरेचसे गंजलेले असे स्क्रू… सुतळी, नायलॉन दोरखंड, निरनिराळे कटर्स, बोल्ट्स, पीव्हीसी पाईप चे लहान मोठे तुकडे, लाकडाचे चोकोनी,गोल तुकडे, करवत असे खूप काही.. आमच्या कॅरम ला चारही कोपऱ्यात हेच गोल तुकडे बसवून वडिलांनी दिले.

ह्या सर्व हत्यारांची रीतसर माहिती आणि यातील कुठली गोष्ट आता लागणार आहे हे वडील समजावून सांगत. मग ती ट्रंक पुन्हा नीट लावण्याची आणि माळ्यावर चढून ठेवण्याची जवाबदारी पूर्ण होई पर्यंत आई चा रविवारी आंघोळी करून घ्या हा तगदा, आपसूकच पुढे ढकलला जायचा. हत्यारांची पेटी असे गोंडस नामकरण ह्या पेटीला कधीच नव्हते तर ह्या ट्रंकेत असे खास कप्पे हि नसत. पुरचुंड्या करून, वायरी गुंडाळून कसेबसे ह्या ट्रंकेचे झाकण बसत. झाकण मात्र आतून त्याला काही पॉकेट दिल्यामुळे त्या त नेहमी प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळी करून ड्रिलिंगमशीन चे ड्रिल बीट ठेवलेले असत. ट्रंकेच्या खाली तळाला वर्तमान पत्र दर वेळी बदलून ठेवत असू. पत्र्यावर रुबाबदार पट्ट्या त्यावर लावलेले सदाफुलीच्या फुलाचे सोल्डर अजूनही भक्कम आहेत.

ट्रंक उघडली कि एक प्रकारचा हत्यारांचा, गंजलेला वास येई. तिच्या कड्या पण कशा भक्कम वाटायच्या. ह्या ट्रंकेच्या आकारात पण एक गुबगुबीत असा भास होत असे. दोन आण्याची ट्रंक अगदी नातवंडा च्या काळापर्यंत सुद्धा व्यवस्थित आहे. अजूनही तिला रंग देवून कोणी फारसे कौतुक केले नाही.

ट्रंक म्हणजे एक पूर्ण विद्यापीठ आहे. कचऱ्याला सन्मान देउन त्यातील पुन्हा वापरात येणाऱ्या गोष्टी पासून नवीन काही तरी बनवता येते. हे छोटे विद्यापीठ पूर्वीच्या काळी माळ्यावर असायचे. आता मात्र काळाच्या ओघात हि ट्रंक नाहीशी होईल अशी सुप्त भीती वाटू लागली आहे. ट्रंक जपणे, त्यातील वस्तू गरजेच्या काळी आवर्जून बाहेर काढल्या जात असत. बच्चे मंडळीना हि ट्रंक म्हणजे भावी आयुष्याचे विद्यापीठ होते. ट्रंक सांभाळण्यात जिव्हाळा असायचा, आठवणी दडलेल्या होत्या आणि मुख्य म्हणजे वस्तू निकामी असतील तर लगेच बाहेर टाकायच्या आणि उपयोगी पडणार असल्या तर योग्य वेळी त्यांचा वापर करणे हि शिकवण होती. सध्या काय हा कचरा?? पुन्हा कोण असल्या जुन्या गोष्टी वापरणार, घराला माळा पण नाही. हत्यारे असतील तर मुलांपासून दूर ठेवलेली बरी, पण त्यांच्या विश्वातील आवडीच्या वस्तू, पण आपल्या दृष्टीने कचरा वाटत असल्या तरी फटकन फेकून देवूया असे बोलणे म्हणजे प्रयोगशील वृतीला आपणच खीळ घालणे होय.

आमच्या काळी अशी विद्यापीठे नव्हती घर आणि घरातील सामन हे घरच्या सदस्य प्रमाणे जपले जात असत. हल्लीच्या विसाव्या शतकातील मुलांना असे प्रयोग शिकवणारे विविध माध्यमे सहज उपलब्ध आहेत. आपणही त्यात सहभागी झालो तर विरंगुळा आणि समाधान दोन्ही सहज मिळेल. आम्हाला आमची ट्रंक हेच विद्यापीठ होते. आयुष्य हे आव्हानात्मक आहे असे न मानता ते एक प्रयोगशील आहे हे सकारात्मक करून घेण्यासाठी महिन्यातून माळ्यावरून काढलेली ट्रंक अजूनही आधार देत आमचीच वाटते. बल्ब बदलणे, खिळा घरीच ड्रिल करून बसवणे, आईचा लाकडी पोळपाट, विळी घरीच दुरुस्त करणे, वडिलांना स्वीच बदलण्यास मदत करणे ह्यासाठी प्रयोग शाळा म्हणजे घर होते आणि साधने म्हणून ट्रंक होती. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तर असायचे पण ह्या गोष्टी करता बाहेरच्या मदती वाचून अडले नाही.

प्रत्येक मुलाची स्वताच्या आवडीच्या काही वस्तू असतात. रंगीत दोरे, गोट्या, मणी, प्लास्टीक चे आकर्षक आकार….इत्यादी अनेक अनेक. ह्या गोष्टीना पण त्यांच्या जवळ त्या वस्तूंची अशी खास ठिकाणे मुले तयार करतात. खेळता खेळता प्रयोगशील वृत्ती तयार होते आणि एखादा भावी काळातील संशोधक पण कदाचित जगाला मिळतो.

परदेशात गॅरेज अशी खास संकल्पना आहे जिथे फक्त कार करता सामान नसून ते घरातील अडगळीच्या पण लागणाऱ्या वस्तूंचे ठिकाण असते. ह्या ठिकाणी मुले खूप रमतात. आपण निदान त्यांच्या टेबल पाशी तरी अशी खास जागा करून दिली तर, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असेल.

माळ्यावरची ट्रंक ते जरा व्यापक स्वरूप म्हणून बोहरी आळी पर्यंत शास्त्र दडले आहे. मोडतोडीच्या सामनामधून एखादा अविष्कार पाहायला मिळू शकतो. ट्रंक आणि तिची माळ्यावरची जागा हा अविभाज्य घटक आठवणीचा आहे. आज विद्यापीठ म्हणून पुढच्या पिढी कडे ट्रंक सोपविली आहे.

एक जिव्हाळा, अतूट बंध आणि….माळ्यावरची ट्रंक

ओमान मधील आंतरराष्ट्रीय आतिषबाजी…….


चाळीसाव्या राष्ट्रीय दिनानिमित्त सहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत वीस मिनिटे आंतर राष्ट्रीय फायर वर्क्स ठेवण्यात आली होती. अमेरिका, इटली, युके, ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, होंगकॉग अशा सहा देशांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकाला आपली तारीख दिली होती. रात्री आठ वाजता हि आतिषबाजीची कोट्यवधी रुपयांची स्पर्धा वीस मिनिटे ठेवण्यात आलेली होती. इथे हा एक मोठा सोहळा होता. रोझ गार्डन च्या मागच्या बाजूस डोळ्यांचे पारणे फिडणारी हि नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी देव लोकांतून ३३ कोटी देव पण डोकावून पाहत असावे इतकी सुंदर!!! आणि विलक्षण अनुभव देणारी अशीच होती.


एका क्षणात आपणाला रिमझिम अशा पावसाचा अनुभव तर दुसऱ्या मिनिटाला कोसळणाऱ्या धारा दिसाव्यात असे आकाश, कधी प्रेमाचा अविर्भाव तर कधी जंगलाचा भास अशा विविध कल्पना साकारत डोळे फक्त आकाशाकडे विस्मयतेने पाहत, बोलण्याचे पण सुचत नाही.

लाखो जनसमुदायाच्या साक्षीने रिमोट वर फटाके नव्हे तर स्वर्गीय कल्पना प्रत्यक्षात जमिनीवरून आकाशाकडे झेप कधी घेत होत्या हे कळत पण नव्हते. प्रत्येक देशाकरता लोकांना वोटिंग करण्यास सांगितले होते. ह्या स्पर्धेत फ्रेंच देशाने प्रथम क्रमांक मिळवला.

ह्या स्पर्धे करता वातावरणाचे प्रदूषण किती होते ह्या वर पण मीटर बसवले होते. कमीत कमी प्रदूषण करणारे पण विलक्षण नयन सुख आणि विविध थीम सुयोग्य पद्धतीने आकाशात मांडणारे म्हणून फ्रेंच अग्रसेर ठरले. स्पर्धा खूपच अटीतटीची होती, प्रत्येक देशाने त्यांच्या कंपनीने सर्व कौशल्य पणास लावले होते. यु ट्यूब वर व्हीडीओ आहेत त्याची हि लिंक

अहाहा!!!! अप्रतिम!!!!! विलक्षण सुंदर…….असे काही अनुभव फोटोच्या रुपात ह्या पोस्ट साठी.

न बोलणारे, मस्त जेवणाचे…….मस्कतचे रेस्टॉरंट ‘राजधानी’.

हॉटेल राजधानी, भारतभर आणि परदेशात हि त्यांच्या शाखा आहेत. पूर्णतः शाकाहारी गुजराथी आणि राजस्थानी थाळी हे जेवणाचे वैशिष्ट्य. अत्यंत अदबशीर, हसतमुख कर्मचारी वर्ग आणि सुबक पद्धतीने जेवणाचे पदार्थ अर्धगोलाकार थाळीत वाढले जातात. थाळीत एकंदरीत बत्तीस प्रकारचे विविध पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात.

अनेक मानांकने, पुरस्कार राजधानीला प्राप्त आहेत. भारत आणि परदेशात जेव्हढ्या शाखा आहेत तिथले मेनू हे एकाच पद्धतीचे आणि सतत बदलत राहणारे असले तरी पदार्थ सगळीकडे सारखेच असतात. आतापर्यंत २२,४६४ पदार्थ, बहात्तर मेनूमधून जगभर राजधानीत देण्यात आले आहेत.

मस्कत मध्ये साधारण पणे दीड वर्षापूर्वी राजधानीने आपली शाखा उघडली. अडीचशे ते तीनशे थाळी रोजची आणि गुरवार, शुक्रवारी तर चारशे च्या वरती ह्या थाळीचा आस्वाद मस्कतीय घेतात. पूर्ण थाळी किंवा छोटासा मिल बॉक्स सुद्धा घरी, ऑफिस मध्ये पाठविला जातो. अशा छान रेस्टॉरंट मुळे इथेही परदेशी पर्यटक भारताची शाही जेवणाची लज्जत घेण्यासाठी गर्दी करतात. अनेक नामवंत व्यक्तीनी इथे आवर्जून भेट दिली आहे. सणावारी किंवा सप्ताहाच्या सुट्टीला वेटर चा दंगा, आवाज, गलका नसलेले हे रेस्टॉरंट जणू काही ‘वदनी कवळ घेता……,ची प्रचीती देते.


आपले आगमन झाल्यावर हसत मुख कर्मचारी वर्ग अदबीने समोर येतो. प्रवेश दारापाशी ठेवलेल्या फुलांची आरास स्वागत पण सुगंधी करते. जेवण करण्याआधी, हात धुण्यासाठी पण राजेशाही थाट आहे. चकचकीत अशा पितळी सुरईतून उबदार पाण्याची धार आपल्या हातावर सोडण्यात येते. हात धूत असताना पाणी तबक सदृश भांड्यात आपल्या अंगावर न उडता गोळा होते. हात पण कसा राजधानीच्या डामडौलात धुतला जातो. पाण्याला पण सुगंधित केलेले असते.

जेवणात थेपला, छोटीशी भाकरी, फुलका, रोटला, पुरी आणि त्यावर अलगद विरघळणारे लोणी, अनेक प्रकारची फरसाण, विविध भाज्या, कोशिंबीरी, डाळ, कढी, खिचडी, साधा भात, दहीवडे,पॅटीस आणि मधुर चवीचे थंडगार ताक असा परिपूर्ण जेवणाचा छानसा मेनू खूप दिवस जिभेवर रेंगाळत राहतो. एव्हढे पदार्थ वाढताना आणि आपल्या थाळीतलं जे काही संपत ते नेमके एका मिनिटात आपल्या समोर पुन्हा वाढण्यासाठी अदबीने हजर केल जात. आपण तर काहीही सांगितले नाही आणि कोणाचा आवाज हि ऐकला नाही मग असे कसे काय एकदम आले. असा विचार करताना आजूबाजूला पहिले तर रेस्टॉरंट मध्ये आवाजच नव्हता. जो तो आपल्यात किंवा आपल्या कुटुंबात, मित्र मैत्रिणीत रमला होता, तेव्हढाच आवाज होता.

जागोजागी वेटर उभे असूनही तत्परतेने नेमके पदार्थ जात येत होते. टेबलाच्या भोवती वेटर ना कोणीतरी व्यक्ती काहीतरी बोटाच्या, हाताच्या खाणाखुणा करत सर्व ठिकाणी फिरत होती. ह्या खुणा म्हणजेच न बोलणारे, आपल्याला चटकन पदार्थ आणून देणारी राजधानीची खासियत आहे. हि प्रमुख व्यक्ती इथली कप्तान असते. ह्या व्यक्तीने टेबल पासून विशिष्ट अंतर ठेवून, जेवण करत असणाऱ्या व्यक्तीची समाधी भंग न करता वाढपी लोकांना अचूक संपलेले पदार्थ सांगणे हे अथीति देवो भव……….असेच वाटते. पदार्थ वाढताना वाढपी हातात प्लास्टिक चे ग्लोज घालतात. पदार्थ अत्यंत स्वछतेत बनविले जातात


उजव्या हाताचे पहिले बोट तिरके ठेवून चक्राकार पद्धतीने फिरवले कि चटणी. अंगठा दुमडून चार बोटे सरळ धरली कि भाजी, अंगठा दुमडून तर्जनी आणि मधले बोट दाखवले कि खिचडी किंवा पुलाव, पहिले बोट सरळ धरून मागे पुढे फिरवले कि साधा भात. चारी बोटे दुमडून अंगठा खाली झुकवला कि फिल्टर थंड पाणी, अंगठा मागे वळवला कि सामान्य तापमानाचे पाणी, अंगठा तिरका धरला कि मिनरल पाणी, तर्जनी आणि अंगठा जुळवून तीन बोटे सरळ ठेवली कि बिल, अंगठा झुकवून पहिल्या बोटाने वाकुली दाखवणे म्हणजे गोडाचे वाढप आणा, पाचही बोटांचा वर्तुळाकार आकार म्हणजे दही वाटी, पहिल्या बोटाचे फक्त पहिले पेर दाखवणे म्हणजे ग्राहकाला इथल्या टेबलवर तूप अजून वाढणे, अशा अनेक खाणाखुणा अत्यंत शिस्तीने रेस्टॉरंट चा कप्तान वाढप्यांना करत असतो.

स्वागत ते निरोप अशा बोटांच्या भाषेत बघताना काहीसे वेगळे पण जपले आहे हे जाणवते. तब्बल चाळीस च्या वर त्यांची कोड लँग्वेज आहे. अशा रेस्टॉरंट मध्ये नोकरी करायची झाल्यास हा अभ्यास करणे आवश्यक आहे. वाढपी लोकांचे कप्तान खाणाखुणांची उजळणी कायम घेत असतात.

हा खाणा खुणांचा तक्ता अभ्यासून त्या प्रमाणे जेवणासाठी आलेल्या ग्राहका पर्यंत तत्परतेने तो पदार्थ मिनिटात आणून देणे हे खरच कौशल्याचे काम आहे. जेवताना एखादी व्यक्ती कुठला पदार्थ तन्मयतेने समाधानाने पटकन संपवते हे लक्षात घेवून त्याप्रमाणे जर तोच पदार्थ अजून घ्यावा हा विचार मनात येतोच तोच पदार्थ हजर. मन कवडे खवय्ये यांना तर पर्वणीच असते.

इतके खुश झाल्यावर जर उत्तम सेवा ह्या साठी जर टीप देण्याची झाल्यास ती तिथल्या पेटीत जमा केली जाते. अदबशीर आणि हसत मुख स्टाफ लक्षात राहतो. इथला कर्मचारी वर्ग हा विविध भाषांमध्ये पारंगत आहे. मस्कत ची भाषा अरेबिक, फ्रेंच, सारख्या परदेशी भाषांबरोबर मराठी, मल्याळी, कन्नड, पंजाबी अशा भाषा इथले कप्तान सहज बोलतात. जेवणाची लज्जत हि भाषा माध्यमे अधिक वाढवतात. राजधानीचे हे अप्रूप अनुभवत लज्जतदार राजस्थानी, गुजराथी जेवण घेण्यास गर्दी वाढतच आहे.

मस्कत मध्ये MBD, OPP. KHIMAJI RAMDAS, BAIT AL AHLAM, RUWI.
TELE…..24811888. असा पत्ता राजधानी रेस्टॉरंट चा आहे.

राजधानी…. एक खानदानी परंपरा. मस्कत मध्ये भारताची परंपरा दिमाखाने जपत आहे.

खास आभार…..मस्कत च्या राजधानीचा कर्मचारी वर्ग. धन्यवाद.

घरोघरचे न्यूटन………

‘न्यूटन’ हा नामवंत प्रख्यात शास्त्रज्ञ, ‘गुरुत्वाकर्षणचा’ जगविख्यात शोध लावला.पण गाजला त्याच्या मांजरामुळे… कथा साधीच त्याच्या कडे मांजर होती. तिला पिल्ले झाली, ती पिल्ले आणि मांजर घरात ये जा करू लागली कि, त्याला कामात व्यत्यय येऊ लागला . मोठ्या मांजरीची उडी मारण्याची क्षमता पाहून त्याने दाराला मांजरी करता एक मोठा , आणि छोट्या मांजरी करता छोटा गोलाकार आकार केला. मांजरीने आणि तिच्या पिल्लांनी दार बंद असले तरी गोलातून त्याला व्यत्यय न आणता सहज ये, जा करावी. मांजरांचा आकार आणि त्यांची शारीरिक उडी मारण्याची ताकद ह्यांचे निरीक्षण करून आपला उद्देश पूर्ण केला.

तेंव्हा पासुन न्यूटन गाजला कारण मोठ्या आकारातून लहान मांजर पण गेले असते, अशा हास्यापद कोटया केल्या गेल्या आणि त्या तहहयात त्याला ऐकाव्या लागल्या असतील. नंतर हि ह्या कोटया जो पर्यंत पृथ्वी आहे तो पर्यंत राहतील असेच खेदाने म्हणावेसे वाटते. खर तर मांजरांच्या उडी मारण्याच्या क्षमते नुसार त्याने दोन उपाय केले.

आपण बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी मोठ्या क्षमतेच्या पण लहानांना चालू शकतील, असे असले तरी त्यांच्या करता लहान गोष्टी घेतो. सगळ्या बाबतीत असे म्हणता येणार नाही पण कधीतरी न्यूटन कुठूतरी हसत असेल. असे न्यूटन हे घरोघरी असतातच. लहानांना आणि मोठ्यांना हि न्यूटन ची बिरुदावली लावली जाते.

साधारण पणे घराचा पुरुष वर्ग ह्या बाबतीत स्त्रियां कडून भूषविला जातो. घरी जर इंजिनीअर असले तर, हे प्रमाण अधिकच असते. कंपनी मध्ये ज्या व्यक्ती मोठ्या पदांवर कामे करत असल्या तरी घरी मात्र जी गृहिणी असेल तिच्या कडून, एव्हढे साधे काम पण कसे अवघड करून ठेवतात असे बोलताना मनात, आणि हमखास मैत्रिणी बरोबर हे म्हणजे अगदी न्यूटन आहेत, असे नक्कीच बोलतात. मग तिच्या घराचा न्यूटन पण बोलण्यात कधीच ओढला जातो.

ह्या न्यूटन ची परंपरा आजी च्या पिढी पासून चालत आलेली असावी, कारण आजोबांच्या फजित्या सांगताना, आजोबांचा न्यूटन म्हातारपणी पण तरुण भासे. कधीतरी आईला गप्पा करण्याचा किंवा खट्याळ पण करण्याचा मूड आला तर बाबांचा किस्सा ऐकताना आम्ही मुले पण रमून जायचो. जणू काही रक्तातला गुणधर्म असल्यासारखा हा न्यूटन प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावून जातो.

जेंव्हा मुलाला शाळेत न्यूटन शिकवला गेला पण नसतो त्या काळात त्याला हा, न्यूटन होईल असेच वाटते अशी कोणीतरी सहज गंमत करून जाते. ज्या ठिकाणी डोके चालवून युक्तीने काम करावयाचे असते तेथे हा न्यूटन फजिती झाल्यास सगळ्यांना हसवतो. जगमान्य हा शास्त्रज्ञ मूर्खपणा पण हसत पचवतो आणि पुन्हा ह्यातून काहीतरी शिका असा नकळत संदेश देऊन जातो.

ह्या न्यूटन चा परिवार हा इंजीनियर पुरता सीमित राहिलेला नाही तर तो काळाच्या ओघात सर्व शिक्षणात पसरला. काय तुम्ही वकील हो, तुम्हाला कधी फसवले हे कळले पण नाही, अशा युक्तिवादापुढे हा वकील घरच्या कोर्टात हरतो. डॉक्टर ला मुलांच्या पोटातील कळ हे चाचपडून पहावी लागते पण, आईला ती खाण्यामुळे झाली का? किंवा अभ्यासामुळे आली का हे पटकन समजते. अशा दुखण्याने घरातील डॉक्टर हतबल होतो. लबाडी, मूर्खपणा, फसणे ह्या नकारात्मक घटना सकारात्मक कशा घ्याव्यात हे शेवट हसण्यात करून न्यूटन पण खुश होतो.

गुरुत्वाकर्षणाचा आकर्षित करण्याचा नियम, हा मानवी जीवनात पण फजितीला हसण्याकडे आकर्षित करतो. एकदा न्यूटन हि बिरुदी चिकटली कि, कायम कुठलीही गोष्ट करण्यास घेतली कि, सतर्क राहण्यास भाग पाडते आणि पूर्ण व्यवधानाने काम होऊन मन आणि बुद्धी ह्यांची फारकत होण्याचे टळले जाते. उत्तेजन जसे मिळते तशी न्यूटन ह्या नामांकनाची चीड पण कायम तयार होण्याची भीती पण मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेली असते. मुलां पुढे न्यूटन अशा पद्धतीने समोर आणू नका. न्यूटन च्या आयुष्यात ह्या मांजरी मुळे किती प्रवाद निर्माण झाले असतील हे त्यालाच माहिती असेल पण आपले मन मांजरी सारखे न्यूटन च्या गोष्टी मुळे होऊ शकते.

न्यूटन हा पुरुष वर्गाला सहज संबोधला जातो. पण स्त्रिया करता अशी ‘न्यूटनि’ ऐकिवात नाही. स्त्रियांना एकावेळी अनेक व्यवधाने हुशारीने पार पडण्याचे जन्मतःच कौशल्य प्राप्त असते. शक्ती पेक्षा युक्तीच्या बाबतीत ती निसर्गतःच अग्रसेर आहे. तरीही तिला, एव्हढे साधे पण कळले नाही असे ऐकायला लागते. कारण समाजातला न्यूटन हा स्वतःचा इगो सांभाळत असतो.

पुरुष आणि स्त्री ह्यांच्यात कोण न्यूटन आहे हे महत्वाचे नाही तर आपल्यातला न्यूटन, आपल्या मनातला न्यूटन, हा वरकरणी हास्यास्पद कोट्या करून हसवत हसला तरी, नकारात्मक घटनांना सकारात्मक करून घेण्याचे मन तयार करायला मदत करतो. मांजरी आणि न्यूटन ची हि घटना पूर्ण संदर्भ सहित मुलांना सांगा कारण त्यांच्यातला न्यूटन हा सशक्त मनाच्या बांधणी करता खूप गरजेचा आहे. न्यूटन च्या मृत्यू नंतर हि हा असा न्यूटन कालांतरित अबाधित राहून जीवनाचे आकर्षण कायम ठेवेल.

.

Previous Older Entries

Follow

Get every new post delivered to your Inbox.