पपेट्स…..सेकंड करिअर. एक Turning point.
मुन्नी बदनाम हुई…..गाण्यावर वाढदिवस साजरा केला जातो…मोठ्यांनी हेच गाणे लावले तर छोटे पण हरवलेच….माझ्या शेजारची डॉ. जावडेकर खूप वैतागून म्हणत होती. त्यांच्या लेकीच्या शाळेला सुट्टी सुरु होणार होती. त्या निमित्ताने तीच्या सर्व मैत्रिणींना एकत्र आणून संध्याकाळ फक्त छोट्यांची साजरी करण्याचे निमित्त होते. पपेट्स… हा एक कार्यक्रम छोट्यांची संध्याकाळ आनंदात साजरी होण्याकरता आयोजिला होता. पपेट्स मध्ये पण बऱ्याच ठिकाणी ही मुन्नी त्यांनी पहिली होती पपेट्स म्हणजे निखलस आनंद देणारा एक निरागस रूपाचा खेळ रूपी अविष्कार असतो. अशा ह्या पपेट्स मध्ये पण मोठ्यांनी छोट्यांना अर्थहीन बनवले. पण ह्या परिस्थितीत पण अपवाद शोधणारे असे माझे शेजारी आहेत. डॉक्टरांनी एक अतिशय सुंदर पारंपारिक गोष्टी सांगणारी ,कथेत मुलांना रमवून ठेवणारी, छोट्यांच्या गाण्यात मोठ्यांना पण ताल धरायला लावणारी, पपेट्स कार्यक्रम करणारी गृहिणी शोधली. पपेट्स चे उत्पन्न किती मिळते हा आर्थिक वेध घेणारी ही गृहिणी नव्हती तर मुलांच्या करता संस्कार करणारी ती एक आई होती. स्वतःची आवड ही विकसित करून पपेट्स घेऊन त्या मुलांकरता ठिकठिकाणी जातात. संध्याकाळ अविस्मरणीय बनवतात. डॉक्टरांनी लेकीची, तीच्या मैत्रिणींची आणि मोठ्यांची पण संध्याकाळ आनंदी केली. हा कार्यक्रम सर्वांची दाद मिळवता झाला.
अगदी साधीशी गोष्ट मी खीर खाल्ली तर….बुड घागरी, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक….नाच रे मोरा… जुनेच पण नवीन स्वरुपात पाहायला आवडले. खोटे बोलणे पकडले जातेच पण आपल्या हुशारीने ते कसे पकडायचे ही गोष्ट खिरीने भरलेल्या मांजरीच्या पोटाची आज वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यास मिळाली. सुरेखशी मांजर, खोडकर माकड मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटवून गेली. लेकीकडे जाणारी आजी खुपच छान आजी वाटली. मोठा भोपळा त्यात बसणारी आजी म्हणजे संकटात स्वःताची काळजी कशी घ्यायची हे सांगणारी गोष्ट पपेट्स ने मनावर ठसली गेली. नाचणारा मोर, पडद्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नाचत जाणारा मोर मुलांना पण डोलवत होता. अर्धा तास पपेट्सचा होता पण जमणाऱ्या प्रत्येक छोटूकल्यांच्या हृदयापर्यंत पोहचला. त्यांनी तो आपल्या वर्णनांनी घरोघरी नेला.मुले तर भारावून गेलीच होती पण मी तर चक्क पपेट्स च्या प्रेमात पडले.
खूप वर्ष मोठ्यांना शिकवले आत्ता मी मोंटेसरीचा कोर्से करण्याचे ठरवले आहे हा परिणाम पपेट्सने केला. पपेट्स सादर करताना आवाजाच्या विविध छटा द्वारे गोष्ट पुढे पुढे जात असते. हातांचे कौशल्य शिकण्यास मिळते. हल्लीच्या संगणकाच्या युगात अजूनही छोट्यांचे मन छोटेच असते जरी ते संगणकावर खेळ खेळत असले तरीही, मोबाईल वापरण्यात तरबेज असले तरीही…मी सुरवातीला साशंक होते कि मुले अशा पपेट्स मध्ये रमतील का? पण मुलांच्याच रमण्याने माझे प्रश्न मनातून कधीच विरळ होऊन नाहीसे झाले.
सगळ्या प्रकारचे खेळ हल्ली मुलांच्या कडे असतात. पपेट्स फार कमी दिसतात. कोणी भेट दिले तर ते फक्त हाताच्या बोटावर पकडून पाच मिनिटेच मुलांच्या हातात दिसतात. स्वतः गोष्ट सादर करणे ही कला मुलांना लहानपणीच शिकवली तर मेंदूचा तल्लख पण वाढीस निकोपदृष्ट्या वाढीस लागेल. छोटासा पडदा तयार करून , निकामी झालेली बाहुली पोटातून मोकळी करून त्यात हाताच्या बोटांनी बाहुलीला हालचाल करावयास लावणे. निकामी झालेल्या खेळण्याचा उपयोग तर होईलच पण हातांच्या हालचालीचे संतुलन साधले जाऊन बोटांची कार्यक्षमता निश्चितच वाढेल. निरागस हास्य होऊन स्नायूंच्या आणि मनाच्या सबलीकरणास उपयोगी होईल. बालमानस शास्त्र वाचून शिकून मुलांना मोठे करणे ह्या तंत्रापेक्षा सहज सोप्पे साधेसे वाटणारे हे पपेट्स मोठ्यातील पण मूल जपण्यास मदत करेल. पपेट्स शिकणे हे बघण्यास जेवढे सोपे वाटते तेव्हढे सोपे निश्चितच नाही परंतु अवघड पण नाही. जसे गर्भ संस्कार आवश्यक असतात तसेच सुजाण पालक होण्यासाठी आपल्या बाळाच्या साठी पपेट्स ही कला शिकायला हवी
सुट्टीत खूप काही मुलांना शिकण्यासारखे असते पण यंदाच्या सुट्टीत असाच एखादा पपेट्स चा कोर्स मुलांना शिकवता येईल ह्याचा विचार पालक आणि शिक्षिका म्हणून माझ्या मनात सतत घोळत आहे. आठवड्याच्या सुट्टीत मोठ्यांना छोटे बनवणारे असे कोर्सेस मिळाले तर प्रत्येक घरच पपेट्स जगणारे घर होईल. संस्कार म्हणून वेगळा विचार करण्याची गरज उरणार नाही कारण आजूबाजूला संस्कारहीन वातावरण असले तरी आपल्या बाळांचे मन तिकडे आकृष्ट होणार नाही. घरच्या घरी आपल्या मुलांना पपेट्स शिकवून त्यांच्या मित्र मैत्रिणींना बोलावून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करता येईल त्यातूनच मुलांचा सभाधीटपणा वाढेल आणि नियंत्रित विचार मार्गास लागतील.असे पपेट्स आमच्या छोट्या अवनी जावडेकर मुळे मला ही खूप काही शिकवून गेले मी ही माझ्यातील मूल जपू लागले आणि छोट्या मुलांमध्ये ह्या पुढचे करिअर करण्याचे ठरविले आणि पपेट्स शिकवून छोट्यांचे छोटे पण जपण्यास पालक म्हणून तयार झाले.
मुलांनाच काय मोठ्यानाही बऱ्याच वेळेला आपले कलागुण कुठेही व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. मुलांना तर स्पर्धात्मक जग आहेच पण हेच मोठ्यानाही आहे म्हणूनच आपणच मार्ग आपल्या छोट्यांकरता तयार करावयास हवा. जस जमेल तस कारण त्यातूनच आत्मनिर्भर पिढी तयार होणार आहे. जगात प्रत्येक वेळेला संधी मिलेलेच असे नाही तरीही मी माझ्या आनंदाकरता शिकणार हीच वृत्ती म्हणजे जीवनाचे आनंदी पपेट्स होतील असे मला तरी वाटते ह्यातूनच माझे सेकंड करिअर सुरु झाले






गडकोट किल्यांचा महाराष्ट्र माझा, कौलारू घरांचा, शेतात डोलणारा महाराष्ट्र माझा, मिळेल का पहावयास पुढच्या पिढीस असा महाराष्ट्र माझा, घराच्या शोकेस मध्ये ठेवण्यास शोधते महाराष्ट्र माझा…. इथे अशा प्रतिकृती पाहून आठवलं ते महाराष्ट्रच असीम सौंदर्य, भक्कम किल्ले, आदिवासी जीवन…..कोल्हापूरला ग्रामीं जीवन शैलीच संग्रहालय पाहण्यास आहे. आपण दीपावलीत किल्ले करतो आणि मोडून पण टाकतो. बाजारात जे तयार किल्ले मिळतात त्या प्रतिकृती तंतोतंत नसतात. अशा काही प्रतिकृती मराठी तरुणानी बनवल्या तर एक आगळावेगळा व्यवसाय निर्माण होवू शकतो. घरात आपल्यालाला कायम स्वरूपी असा छोटेखानी संग्रह ठेवण्यास मिळाला तर निश्चित अभिमान वाटेल. संकृती साहित्यांनी, प्रत्यक्ष पाहून पुढच्या पिढीस संक्रमित निश्चित करता येते. पण कदाचित चीन अशी मॉडेल्स आणून आपल्यालाच विकतील…. इतिहासाच्या गाढ अभ्यासकांनी मनावर घेतले तर तंतोतंत किल्ले बनवणे अशक्य नाही…मला सुचले, इथे पाहून आपल्या करता काही करता येईल का? कोणाला कल्पना सुचवली तर??? माझ्या कडून हा अल्पसा प्रयत्न…. ग्राम विकास साठी पण निश्चित विचार करता येईल.. अभिप्राय जरूर कळवा…….




अरब देशांमध्ये मधाचा वापर स्वयंपाक ते आरोग्य यासाठी अधिक केला जातो. ओमान चा मध हा अत्यंत पारंपारिक पद्धतीने बनवलेला असतो. निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचा वापर प्रामुख्याने असतो. मधुमक्षिका पालन येथे वेगळ्या पद्धतीने केले जाते. येथे प्रामुख्याने खजुराची झाडे प्रंचंड प्रमाणत लावली जातात. खजुराच्या झाडाचे आयुष्य संपल्यानंतर त्याचा बुंध्याचा वापर मधुमक्षिका पालनासाठी केला जातो. बुंधा आतून पोकळ केला जातो. त्यात मधुमक्षिका पालन करतात. नारळ , पपया, पाम, आणि अनेक सुवासिक झाडांचे बुंधे वापरून मधाचे उत्पन्न घेतात. वेगवेगळ्या झाडानुसार सुवासाचा आणि चवीचा मध येथे उपलब्ध आहे. मध प्रक्रियेत मधाला त्या विशिष्ट झाडाचा सुवास लाभतो. असा फ्लेवर्ड मध इथे खूप लोकप्रिय आहे.
मध पालनाची परंपरा कुराण काळा पासून प्रचलित आहे. पूर्वीच्या इथल्या राजमहालात मध असलेली खजुराची झाडे ठेवण्यासाठी खास खोल्या होत्या. ह्या खोल्या मधून एकेका खळगीत एकेक झाड ठेवून, ते नंतर प्रेस करत त्यातील मध पन्हाळी मार्फत गोळा केला जात असे. अशा खोल्या आजही किल्ले, महाल यांना भेट दिली कि उत्तम स्थितीत बघण्यास मिळतात.
महिला दिन जस जसा जवळ येउ लागतो तसे अनेक लेख महिलांच्या प्रगतीचा आढावा घेणारे वाचण्यास मिळतात. क्षेत्र कुठलेही असो तिने तिच्या जबाबदारीची, कर्तुत्वाची छाप पाडलेली दिसते. घर, शेती, विविध तंत्रद्यान तिने सहज काळाप्रमाणे आणि तिच्या गरजेप्रमाणे आत्मसात केले. तिच्या आवडीप्रमाणे तिचे कामाचे, आवडीचे क्षेत्र पण वेगळे असते. कोणाला घराची चौकट…पती, मुले आणि संसार तर कोणाला आकाशाची भरारी….एव्हढी अफाट कुवत तिच्यात आहे.
आकाशात भरारी घेणारी एखादी पायलट, शेजारच्या गृहिणीची जवाबदारी पार पडणाऱ्या आपल्या मैत्रिणी बरोबर पण रमते, त्यांच्या मैत्रीमध्ये कर्तुत्व आड येत नाही. घराचा उंबरा, पारंपारिक चौकट पण तिला हवीशी असते आणि आकाशात झेप घेणाऱ्या पंखाची पण तिला ओढ असते. हा सहज स्वभावातला बदल स्वीकारणे हे स्त्री च्या रक्तातच आहे. तिच्या प्रकृतीत आहे. जशा संधी येतील, तशा स्वीकारत आपली जवाबदारी पार पडणे आणि तेही हसत मुख राहून, हे वैशिष्ट्य. असे लेख म्हणजे प्रोत्साहन देणारे, कर्तुत्वाला सलाम करणारे, अंतर्मुख करणारे ठरतात. अनेक दिवस मनात ठाण मांडून बसतात. स्त्रीच्या प्रगतीच्या ह्या आलेखात तिला कधी कोणाची साथ मिळते तर कधी ती एकाकी असते. घर ते आकाश ती स्वतः भोवती फिरवत राहते. त्यातच ती आनंदी राहते. जेव्हढे मिळाले त्या संधीचा पुरेपूर मनसोक्त आस्वाद घेण्याची कला तिज जवळ निश्चितच आहे.
एकात एक अशा मावणाऱ्या बाहुल्यांच्या मध्ये पण तिला द्वितीय स्थान असते. प्रथम दर्शनी असते हि पुरुषाची बाहुली. कदाचित हेच दृढ असे जीवनाचे सत्य सर्वसंमत असावे. घरातील सदस्य तिचा सहज आधार घेतात.आतल्या कोशात राहूनही तिच्या आत्मबला मुळे सहज सर्व जवाबदारीवर पूर्णतः यशस्वी होते. ग्राम स्तरावर आणि शहरी वातावरण ह्या प्रमाणे स्त्री च्या व्यक्तीमत्वात, जवाबदारीवर फरक असतो पण कुठेही ती घर दारासाहित सर्वाना सांभाळून घेते. जसा हा सकारात्मक बदल अनुभवास येतो तसेच काही प्रमाणात अजूनही तफावत हि आढळते. उदा. घरचे कितीहि शिकवायला तयार असले तरी ( मागच्या पिढीतील )आई… संगणक चटकन शिकण्यास राजी होत नाही. स्वतःचा इमेल आयडी हि पूर्णतः अगदी घरगुती स्वरूपावर असला तरी सुद्धा प्रत्येकाची वैयातिक बाब आहे. समजा ती गृहिणी असली तर इमेल आयडी चा पासवर्ड सुद्धा ती अतिशय प्रामाणिक पणे मुलां कडून किंवा पतीला तयार करून देण्यास सांगते. पतीचा, मुलांचा आयडी आमचे अतिशय महत्वाचे काम असते उगाच डिलीट काहीतरी होईल म्हणून ते तिला सांगत नाहीत. खरे तर घरात असे काहीच नसते.तिला तिच्या सर्व वैयक्तिक बाबी सुद्द्धा कुटुंबा बरोबरच आवडतात. माझ्या ह्या पिढीतल्या बऱ्याच मैत्रिणी ह्या अशा आहेत. अजूनही असे वातावरण पाहून आश्चर्य वाटते. घरची आणि आजूबाजूची परिस्थिती शिकवण्यास सकारात्मक असेल तरीही हि स्वतः भोवती कुंपण आखून घेते. पासवर्ड न सांगण्याचा घरच्यांचा मुद्दामहून खोडसाळ नसतो. मी व्यवस्थित पाहू शकते हा तिचाच आत्मविश्वास कुठेतरी अजून वाढण्यास हवा. स्त्री ला स्व:ताची झेप ओळखता येते. पूर्णतः आत्मनिर्भर होण्यासाठी अधिक आत्मबल ओळखण्याची गरज अजूनही कुठेतरी जाणवत रहाते. अर्थात सर्व ठिकाणी असे विरोधाभास दिसत नाहीत हि जमेची बाजू.
एकाच वेळेला अनेक गोष्टींचे भान ठेवून सर्व बाबी पूर्ण करण्याची तिला जन्मतःच क्षमता आहे. अनेक टप्प्यातून ती प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकत असते. स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन तिने तिच्या करता व्यापक करण्यास हवा. ह्या सर्व तारेवरच्या कसरती करताना ती सुपर वूमन बनण्याचा अट्टाहास करत असते. सर्व गोष्टी मीच माझ्या हातानीच पूर्ण करणार. अशा हाताने केलेल्या गोष्टी नेहमीच नीट नेटक्या होतातच पण तिच्या स्वतःच्या बाबी कडे दुर्लक्ष होते. ज्या गोष्टी यंत्राच्या मदतीने करता येणाऱ्या असतील तेंव्हा आधुनिक मशीन ची मदत घ्यावी. सर्व कामे मीच करणार ह्या मध्ये दमणूक मात्र होते. ह्या सर्वाचा परिणाम तिच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. स्त्री ची वैद्यकीय तपासणी नियमित करून घेणे खूप गरजेचे आहे. अकारण जीवतोड मेहनत केल्या मुळे शारीरिक त्रास लवकर सुरु होतो. दर्जेदार आयुष्य जगण्यासाठी ह्या तिच्या यंत्रे किंवा कोणाच्या मदतीने काम करून घेणे पण आज काळाची गरज आहे. अनेक गोष्टी करताना ती स्वताकडे पण तेव्हढेच लक्ष ठेवत असेल तर उत्तमचं परंतु अजूनही अशा मैत्रिणी आहेत. जमेल तेव्हढे समजावून सांगावे.
आधुनिक तंत्रज्ञान हे नेहमीच उपयोगी असते. ओमान चा शेतकरी तंत्राद्यानाची मदत घेऊन आपले शेतीचे उत्पन्न नुकसानीत होऊन देत नाही. इथे सरकार दरबारी शेतकरी खूप सन्मानित केला जातो आणि सरकारकडून सर्व मदत दिली जाते. खजुराच्या लाखोंच्या संख्येत असणाऱ्या झाडांवर, शेतीवर दुबास किडीचा प्रादुभाव खूप वाढला आहे. खेडोपाड्यातील शेती ची किडी करता मोजदाद करण्यासाठी शेती विभागाकडून शेतकऱ्यांना जी. पी. एस. सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


किडीचा पादुर्भाव प्रखर असलेल्या भागाची नोंद मिळत राहते आणि देशभर पसरलेल्या लाखो शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचविले जाते. 

